ऊस दराची कोंडी फुटली
‘स्वाभिमानी’ आणि कारखानदार यांच्यात १०० रुपयांवर तडजोड
कोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी टनास किमान १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत, त्यांनी आणखी किमान ५० रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने कोंडी गुरुवारी फुटली. नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळुरु महामार्गावरील चक्काजाम आंदोलन ९ तासानंतर मागे घेतले.
मागील हंगामातील उसाला ४०० रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला ३५०० रुपये एकरकमी पहिला हप्ता या मागणीसाठी स्वाभिमानीसह अन्य शेतकरी संघटनांनी गेली २२ दिवस दक्षिण महाराष्ट्रात अत्यंत आक्रमक आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम ठप्प झाला होता.
ऊसदरासंदर्भात मुंबईत बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.अत्यानंतर ४०० चा आग्रह सोडून देवून संघटनेने टनास किमान १०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही, अशी भूमिका घेतली. एवढी रक्कम देण्याची कारखान्यांची तयारी आहे. ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळीही दर्शवली होती.
गुरुवारी पुन्हा जिल्हा प्रशासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली आणि अखेर तोडगा निघाला. या बैठकीला विविध संघटनांचे डॉ. जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, धनाजी चुडमुंगे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, दीपक कृष्णात पाटील, दत्तात्रय जगदाळे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
साखर कारखानदारांच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या लेखी आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेले आक्रमक ऊस बंद आंदोलन गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मागील हंगामाची रक्कम आणि पुढील हंगामासाठी एकरकमी ‘एफआरपी’ आणि जादा १०० रुपये द्यायचे अगोदरच मान्य केले असल्याचे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले, त्यामुळे आजपासून पूर्ण क्षमतेने साखर हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. हे पैसे दोन महिन्यांनंतर द्यायचे आहेत.
हा तोडगा सांगलीलाही लागू आहे. त्यांनीही त्यानुसारच दर दिला पाहिजे, असे सांगून शनिवारी राजारामबापू कारखान्यांवर आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.
ऊस दराच्या आतापर्यंतच्या चळवळीतला हा दीर्घ लढा होता. त्यात शेतकऱ्यांची अत्यंत भक्कम साथ मिळाली. अन्य संघटनांनीही हातात हात घातल्याने चळवळीचे बळ वाढले. त्याचा परिणाम म्हणूनच आंदोलनाला यश मिळाले. शेतकयांना घामाचे दाम मिळवून देण्याचे काम कुडीत श्वास असेपर्यंत सुरूच राहील, अशी ग्वाही राजू शेट्टी यांनी दिली.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
आंदोलनाला यश आल्यानंतर पंचगंगा पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. शेट्टी यांना कार्यकत्यांनी खांद्यावर उचलून घेत, शेतकयांशी एकच गट्टी… राजू शेट्टी अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
गेले सुमारे महिनाभर सुरू असलेला हा प्रश्न निकाली निघाला याचे समाधान आहे, आता हंगाम पूर्ण जोमत सुरू राहील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
कारखान्यांच्या वाट्याला येणारी अशी असेल आकडेवारी