व्यथा बळीराजाची

काय मी सांगु तुला आज
माझीच मला वाटे लाज
अरे शेतकरी मी कोरडवाहू
बंधा-याचं स्वप्न कशाला पाहू…
ऐकत निळवंड्याच्या गोष्टी
आज मी गाठली एकसष्टी
विकासाची उलटी गटारगंगा
जनसामान्य झाला नंगा…
पोरांनां शहराचा सोस
अहो गावं पडली ओस
गावात माणसं राहिना
शहरात आसरा मिळेना….
बुढ्याला पोरांच्या लग्नाची चिंता
त्याची गालफडं बसली आता
पहिल्यासारखं पिकत नाही,
पिकलं तर मग विकत नाही…
दलालांच्या हाती सगळ्या नाड्या
त्यांच्या दारात लाखोंच्या गाड्या
शेतीकर्जाच्या दुष्टचक्रांना,
आणि सामाजिक समस्यांना…
लाखो शेतकरी आत्महत्यांना
कृषिप्रधान देशात उत्तरच नाहीना….
आता बहुधा हे शेवटच्या
पिढीचे शिलेदार असतील
यांच्या नंतर कोण
मातीत हात घालतील….
यापुढे भविष्यात कोण
आणि काय पिकवतील?
पिकलंच नाही शेतात तर
कुणास ठाऊक काय खातील?….
नुसत्या नोटांनी भूक कशी भागेल
उशिरा जेव्हा जगाला उमगेल
तेव्हा फार उशीर झालेला असेल
बळीराजाचं जीवन धोक्यात असेल…
रचनाकार : आहेर वा.र. नासिक
बी.ई.एमआयई.बीओई.
९९५८७८२९८२