‘स्वाभिमानी’ उतरणार बिद्री कारखाना निवडणुकीत

कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाच्या सोबत जाणार नाही, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी केले.
तिटवे येथे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पोवार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत के. पी. पाटील हे भाजपसोबत गेले. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला केले. यंदा तसे होऊ देणार नाही. ‘बिद्री’चे रणांगण स्वबळावर जिंकू.
संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ५२८ कि. मी. पदयात्रेच्या नियोजनासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यात विजय यादव, बंडोपंत पाटील, संतोष बुटाले, बाळासाहेब पाटील, आनंदा पाटील, संजय देसाई, पांडुरंग जरग, सी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.