डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व
अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय कारकीर्दीची धडाक्यात सुरुवात झाली आहे..
डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे हा साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा, या सभासदांच्या मागणीनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते, मात्र अखेर यात तिरंगी लढत झाली.
या निवडणुकीत अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळ, राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखालील विकास मंडळ, आणि अमृत धुमाळ, अरुण कडू, अजित कदम, पंढरीनाथ पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव कृती समिती असे तीन पॅनल रिंगणात होते.
३१ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सुमारे ६० टक्के मतदान झाले होते. १ जून रोजी राहुरी कॉलेज येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. मतमोजणीची सुरुवात प्रथम कोल्हार गटापासून करण्यात आली. यामध्ये सोसायटी मतदारसंघ ब वर्गामधून जनसेवा मंडळाचे युवा नेते हर्ष तनपुरे यांचा प्रचंड मतांनी विजय होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे.
अंतिम निकालानुसार, अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने २१ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. विकास मंडळ आणि कारखाना बचाव कृती समितीला एकही जागा मिळवता आली नाही. सभासदांनी अरुण तनपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठा विश्वास दाखवला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि विजयी नेते अरुण तनपुरे मतमोजणी स्थळी येताच, जनसेवा मंडळाच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची आतिशबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली.
दिलदारपणे स्वीकारला पराभव
या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल स्वीकारत, विकास मंडळाचे नेते राजूभाऊ शेटे यांनी जनसेवा मंडळाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी विजयी मंडळाने येत्या वर्षभरात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा, शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या अडचणी सोडवाव्यात आणि शेतकरी कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाना सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींमध्ये आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जनसेवा मंडळाच्या विजयी उमेदवारांनी, निवडणूक काळात दिलेली आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण करून दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू करणे हे ‘शिवधनुष्य पेलण्यासारखे’ असले तरी, सभासदांना खात्री आहे की अरुण तनपुरे यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न होतील, कारण त्यांनी यापूर्वी मार्केट कमिटी आणि नगरपालिकेमध्येही चांगले काम केले आहे. अर्ज भरण्यापासून ते मतमोजणीपर्यंत ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या आणि लोकशाही पद्धतीने पार पडली. यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, त्यांचे सहकारी आणि पोलीस विभाव यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, राहुरीच्या कारखान्याच्या सर्व सभासदांचे, ज्यांनी जनसेवा मंडळाच्या २१ पैकी २१ उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून दिले आणि विश्वास टाकला, त्यांचेही आभार मानण्यात आले.