तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव

अहिल्यादेवीनगर – डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा ठराव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या विषयावर चर्चा होऊन तसा ठराव मंजूर करण्यात आला, असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी सांगितले.
दरम्यान, कारखाना किमान 15 वर्षे भाडेतत्त्वावर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बँकेतर्फे निविदा व करार प्रक्रिया करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पार्श्वभूमी
तनपुरे साखर कारखान्याच्या थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेतर्फे सरफेसी अॅक्टनुसार २ सप्टेंबर २०१४ रोजी कारखान्याची सर्व चल व अचल तारण मिळकत जप्तीची कारवाई करण्यात आली. शासनातर्फे कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. कारखान्यावर दोन वर्षे प्रशासकराज राहिले. सन २०१६ साली कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील मिळाली. परिवर्तन मंडळ सत्तेवर आले.
डॉ. सुजय विखे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सहकायनि बँकेच्या कर्जाचे पुनर्गठन केले. बँकेने जप्त केलेला कारखाना संचालक मंडळातर्फे चालविण्यासाठी ताब्यात घेतला. परिवर्तन मंडळाच्या सात वर्षांच्या काळात चार वर्षे कारखान्याचा ऊस गाळप हंगाम घेण्यात आला. संचालक मंडळाची मुदतवाढ संपल्याने कारखान्यावर पुन्हा शासनातर्फे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेतर्फे कारखान्याची मालमत्ता पुन्हा जप्त करण्यात आली.