ऊस क्षेत्राच्या तुलनेत गाळप क्षमता प्रचंड वाढली : माने पाटील

सांगली : राज्यातील साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढवली आहे, त्यामानाने ऊस क्षेत्रात अल्पवाढ झाली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुलनाना माने पाटील यांनी केले.
संघाच्या वतीने पेठ येथे आयोजित १२ व्या ऊस परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऊस कार्यभूषण आणि ऊस पत्रकारिता गौरव पुरस्कारांचे वितरण रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माने पाटील म्हणाले, ‘‘राज्यात काही कारखाने 70 दिवस, काही 80 दिवस ,काही 90 दिवस चालतील. त्यामुळे सगळ्यांना एकच प्रश्न पडला की ऊस पिका खालील क्षेत्र का कमी झाले? याला अनेक कारणे आहेत जसे की पाऊसमान कमी झाले, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, कोल्हापूर भागात पूर आला एक ना अनेक अशी कारणे आहेत, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस कमी आहे, ऊस विकास विभाग वेगळा नाही, अनेक वर्षात बेणे बदल झाला नाही, पायाभूत बेणे विकसित मळे विकसित झाले नाही, उच्च साखर उतारा देणाऱ्या आणि चांगले एकरी उत्पादन देणाऱ्या ऊस जातीचा प्रसार आणि प्रचार झाला नाही, शेतीत आधुनिक तंत्राचा वापर कमी, अती पाण्याचा वापर, जमिनीचा सामू यात बदल आणि जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली.’’
रासायनिक खतांचे प्रमाण जमीन न तपासता अतिरेकी वापर, मायक्रो न्यूट्रियंट यांचा आणि संतुलित खताचा वापर नाही , कारखाना कार्यक्षेत्रात कृषी मेळावे ,ग्राम सभा ऑफ सीझन मध्ये घेण्यात येत नाहीत , कारखाना कार्यक्षेत्रात एआय चा वापर नाही , ऊस नोंदी आणि ऊस तोडणी ही काही कारखान्यात कम्प्युटरवर झाली आहे ,पण ज्यावेळी कार्यक्षेत्र सोडून ऊस गाळपासाठी आणला जातो त्यावेळी ऊस नोंद आणि तोडणी वेळेवर होत असते, या सारखी अनेक कारणे आहेत.
‘‘अनेक कारखान्यांनी अमर्याद प्रमाणात गाळप क्षमता वाढविली आहे त्या प्रमाणात ऊस पिकाखालील क्षेत्र वाढले नाही आणि त्यासाठी राज्यातील काही कारखाने वगळता काही कारखान्यांनी ऊस विकास योजना राबविल्या नाहीत. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्याचे दर एकरी उत्पादन वाढले नाही; परंतु त्यांचा दर एकरी उत्पादन खर्च वाढला पर्यायाने तो ऊस उत्पादक शेतकरी ऊस लागवडी पासून खूप लांब गेला यासाठी सक्षम ऊस विकास विभाग कारखान्यांनी केला पाहिजे. त्यासाठी चांगले पगार ऊस विकास अधिकाऱ्यांना दिले पाहिजेत ,चांगले कृषी ओव्हरसीअर घेतले. अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही चांगले वेतन द्यायला हवे’’, असेही माने म्हणाले.
कारखान्याची गाळप क्षमता एका वर्षात वाढवली जाऊ शकते; पण कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढविण्यासाठी आपणास किमान 2 वर्ष लागतात आणि तेही पाऊसमान चांगले झाले तरच; अन्यथा गाळप कमी होऊन परत कारखान्याचे अर्थकारण कोलमडून जाते यात शंका नाही . म्हणून शेती खाते हे साखर कारखान्याचे खूप महत्त्वाचे खाते आहे, याचा विचार जाणीवपूर्वक होणे जरुरी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी परिषद अध्यक्ष किरणभाऊ चव्हाण, उदघाटक रघुनाथदादा पाटील, सचिन पाटील, राज्य उपाध्यक्ष ऊस संघ, महेंद्र घाटगे, लक्ष्मण सूळ, आशीष पाटील, डॉ. सुरेश उबाळे राज्य संचालक, युवराज पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष, धनाजी कदम जिल्हा उपाध्यक्ष, अमोल खोत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, ई. उपस्थित होते.