सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या असतील; मात्र बार्शी तालुक्यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्याची एक दिलासादायक घटना उघडकीस आली. या घटनेत खामगाव सरपंच, सदस्य, अधिकारी, पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन ग्रामसुरक्षा यंत्रणेचा उत्कृष्ट उपयोग केल्याचे पंचक्रोशीत विशेष कौतुकाची चर्चा होत आहे.
तालुक्यातील कुसळंब येथील शेतकरी विलास निंबाळकर यांच्या उसाच्या शेत मंगळवारी दुपारच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. ही बाब लक्षात येताच गावचे पोलिस पाटील प्रशांत पाटील यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावरून संपूर्ण गावाला माहिती दिली. काही क्षणातच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले आणि त्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवून सुमारे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश आले. गावात आतापर्यंत या यंत्रणेचा २२ वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस पाटलाच्या या सतर्कतेमुळे तब्बल पंचवीस एकर ऊस आगीपासून वाचविण्यात आल्याने पीडित शेतकऱ्याने पोलिस पाटलासह सर्व यंत्रणेचे आभार मानले आहेत.






