विठ्ठल कारखान्यासाठी अभिजित पाटलांचा महायुतीला पाठिंबा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर: विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार आहोत, असे जाहीर करणाऱ्या चेअरमन अभिजित पाटील यांनी अखेर महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना जादाची रसद मिळण्याचा अंदाज आहे.

सोलापूरच्या बालाजी सरोवर हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत करा अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितले होते. भाजप प्रवेशाची कोणतीही अट आम्हाला घालण्यात आलेली नाही. मात्र लोकसभेला आम्हाला मदत करा अशी अट घातली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांसाठी जो कुणी आम्हाला मदत करेल त्याला आम्ही मदत करू अशी माहिती अभिजित पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली होती.

शिखर बँकेनं तब्बल चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण समोर करत अभिजीत पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सोलापुरातील बालाजी सरोवर हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी दाखल झाले. शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली.दे वेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशाबाबत कोणतीही अट घातली नसून आम्ही तुमच्या कारखान्याला मदत करू, लोकसभेत तुम्ही आमची मदत करा ही अट घातली आहे. शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. निवडणुका दर पाच वर्षांनी येत असतात असं पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर केलं. त्यांच्या भूमिकेचा फटका महाविकास आघाडीला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात फटका बसू शकतो.

दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या कार्यकाळानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला घरघर लागली होती. करोना काळात भारत नाना भालके यांच्या मृत्यूनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला अभिजित पाटील यांनी सोन्याचे दिवस दाखवले. तीस हजार सभासदांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटील यांच्यामुळे राज्यभर चर्चेत आला होता. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अभिजीत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात राष्ट्रवादीची ताकद वाढवली.

राज्य सहकारी शिखर बँकेकडून जप्तीची कारवाई
राज्य सहकारी शिखर बँकेने चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण देत विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला. साखरेची जवळपास एक लाख पोती ठेवण्यात आलेलं गोदामदेखील सील केलं होतं. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केल्यानं अभिजीत पाटील जबरदस्त आर्थिक कोंडीत अडकले आहेत.
राज्य सरकारच्या मदतीशिवाय अभिजीत पाटलांसमोर पर्याय राहिलेला नाही.

पंढरपूर तालुका लोकसभेच्या दोन मतदारसंघांमध्ये येतो. पंढरपुरातील ५८ गावं माढ्यात येतात. इथल्या मतदारांची संख्या १ लाख ६० हजार इतकी आहे. तर सोलापुरात अडीच ते तीन लाख मतदान येतं. पंढरपूरमध्ये अभिजीत पाटील यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे मतदान खेचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. अडचणीत आलेल्या पाटलांनी भाजपला मदत केल्यास त्याचा फटका सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना, तर माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लढणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

Leave a Reply

Select Language »