साखर पट्ट्यात कोण बाजी मारणार?

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भागा वरखडे

Bhaga Warkhade

…………..
विदर्भ आणि कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत साखर कारखानदारांचाच वरचष्मा असतो. पूर्वी काँग्रेसचे आणि अलीकडच्या २० वर्षांत शरद पवार यांचे साखर पट्ट्यात वर्चस्व होते. गेल्या पाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने अनेक साखर कारखानदार फोडून आपल्याकडे आणले. त्यातील अनेकांनी स्वगृही परतणे पसंत केले; परंतु असे असले, तरी या वेळी साखर पट्यात महायुती आणि महाविकास आघाडीविरोधात अनेक साखर कारखानादारांनी बंड केले असून किमान पन्नास जागांवरचे निकाल ते बदलू शकतील, अशी स्थिती आहे.
………..


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारांशी निगडित अनेक ज्येष्ठ नेत्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. राज्यातील अनेक साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत सहकारी साखर कारखानदारीची विक्री, उसाचा भाव, इथेनॉल उत्पादन तसेच प्राप्तिकराचा मुद्दा जास्त चर्चेत आहे.
१२ नोव्हेंबर रोजी सोलापुरात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योग आणि इथेनॉल उत्पादनाचा मुद्दा उपस्थित करून इतर पक्षांच्या मतांत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात एका निवडणूक सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना सांगितले, की महाराष्ट्रात त्या राजकीय पक्षाच्या कार्यकाळात सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली. खासगी कारखान्यांची संख्या वाढली.

मोदी आणि शाह यांच्या पक्षातून खासगी कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांनी हे वक्तव्य केले, हे विशेष! त्यातही भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या अनेकांना सहकारी साखर कारखाने नीट चालवता आले नाहीत. राजकारणासाठीच साखर कारखाने निघाले. पुरेसा ऊस आणि पाणी आहे, की नाही, हे पाहता आपल्या समर्थकाचे राजकारण जिंवत राहावे आणि साखर कारखानदारीसारख्या संस्थात्मक संस्थांच्या कर्मचारी आणि सभासदारांच्या जीवावर विधानसभेत पोचावे, यासाठी कारखाने खिरापतीसारखे वाटले.

दुष्काळी जिल्हे असलेल्या नगर आणि सोलापूरमध्ये राज्याच्या एकूण कारखान्यांच्या २५ टक्के कारखाने या दोन जिल्ह्यात सुरू झाले, याला निव्वळ राजकारण कारणीभूत आहे. राज्यात नव्हे, तर सर्वाधिक क्षमतेचे असलेले सहकारी आणि खासगी कारखाने चालवता न आलेले महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव विखे-पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब थोरात, तात्यासाहेब कोरे, रत्नाप्पाण्णा कुंभार, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, डॉ. बाबुराव तनपुरे, शंकरराव कोल्हे, मारूतराव घुले, यशवंतराव गडाख, विलासराव देशमुख, अंकुशराव टोपे, नितीन गडकरी आदी अनेक बड्या नेत्यांच्या योगदानामुळे साखर उद्योग चांगला रुजला; परंतु नैसर्गिक स्थिती, सरकारची धोरणे आणि कारखान्यांतील पैशाचा निवडणुकीसाठी वापर यामुळे कारखाने राजकारणाचे अड्डे बनले.

वरवर पाहता शेतकरी हा कारखान्याशी संबंधित होता आणि त्या बदल्यात कारखान्याच्या संस्थापकाशीही संबंधित होता. कारखान्याचे संस्थापकच निवडणुकीत उभे राहू लागले. या विधानसभा निवडणुकीतही राज्यातील तीन डझनहून अधिक साखर कारखानदार आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याबाबत बोलायचे झाले तर विधानसभा निवडणुकीचे राजकारण साखर उद्योगाभोवती फिरत आहे.सध्याच्या निवडणुकीत डझनभर साखर कारखानदार आपले नशीब आजमावत आहेत.

साताऱ्यात बाळासाहेब पाटील, अतुल भोसले, मनोज घोरपडे, प्रभाकर घार्गे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांचे साखर कारखाने आहेत. या कारखान्यांचे काही अध्यक्ष तर काही संचालक उमेदवार आहेत. सांगलीत मानसिंगराव नाईक, संग्रामसिंह देशमुख, विश्वजीत कदम, संजयकाका पाटील, जयंत पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील सहा उमेदवार बँका व कारखान्यांचे संचालक आहेत. कोल्हापुरात के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, राहुल पाटील, राजू आवळे, अमल महाडिक, हसन मुश्रीफ, समरजीत घाटगे, विनय कोरे, राहुल आवाडे, गणपतराव पाटील, ए. वाय.पाटील, मानसिंग खोराटे, राजेंद्र पाटील साखर कारखानदारीशी संबंधित निवडणुकीत नशीब अजमावीत आहेत.

नगर जिल्हा
अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे-पाटील, रोहित पवार, वैभव पिचड, आशुतोष काळे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, ॲड. प्रताप ढाकणे, मोनिका राजळे, अमोल भांगरे, अनुराधा नागवडे, विक्रमसिंह पाचपुते, राहुल जगताप हे साखर कारखानदारीशी संबंधित निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यात बारा सहकारी आणि सहा खासगी साखर कारखाने आहेत. खेड आळंदी आणि मावळ मतदारसंघ वगळता उर्वरित आठ मतदारसंघात ११ साखर कारखान्यांचे उमेदवार आहेत. निवडणुकीत ‘शुगर बेल्ट’चा हस्तक्षेप निर्णायक ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील ‘साखर पट्ट्यात’ आमदारांच्या राजकारणाने खळबळ उडाली आहे. साखर कारखान्यांचे तीन विद्यमान अध्यक्ष आणि सहा माजी अध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे.
बारामती मतदारसंघात माळेगाव सह. साखर कारखाना आणि सोमेश्वर सह. साखर कारखान्यामध्ये चढे भाव देणाऱ्या कारखान्याचे प्रमुख अजित पवार आणि शरयू ॲग्रो कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार यांच्यात निकराची लढत आहे. आंबेगाव मतदारसंघात भीमाशंकरचे दोन माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि देवदत्त निकम यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

दौंड तालुक्यातही आमदार राहुल कुल आणि भीमा पाटसशी संबंधित नेते रमेश थोरात यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिरूर-हवेली मतदारसंघात आमदार अशोक पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असून ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्यात चुरशीची लढत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघात विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे आमदार अतुल बेनके यांच्याशी लढत आहेत. भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात राजगड साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम थोपटे यांना शंकर मांडेकर, कुलदीप कोंडे आदींनी आव्हान दिले आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी साखर कारखान्याचे अध्यक्ष व नीरा-भीमा साखर कारखान्याचे संस्थापक, छत्रपती शुगर मिलचे अध्यक्ष असून आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.

भाजपने प्रभाव वाढवला
सोलापूर जिल्ह्यात भगीरथ भालके, अभिजीत पाटील, अनिल सावंत, मोहिते पाटील, रणजीत शिंदे अशी कितीतरी मंडळी साखर कारखान्याशी संबंधित आहेत.

तिकडे मराठवाड्यात भीमराव धोंडे, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे आदी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी काहींना उमेदवारी मिळाली आहे, काहींनी बंड केले. पश्चिम महाराष्ट्रात ३६ ठिकाणी बंडखोरी असून, बंड करणारे बहुतांश साखर कारखानदार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश होतो. एकेकाळी काँग्रेस आणि अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात, भाजपला आपल्या नवीन मित्रपक्षांच्या- अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मदतीने चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात जागा आणि मतसंख्येच्या बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.तथापि, २०१४ पासून भाजपने या प्रदेशात आपली स्थिती सुधारण्यास सुरुवात केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील ७० जागांपैकी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने २७ जागा जिंकल्या आणि काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. भाजपने २० जागा जिंकल्या होत्या, तर अविभाजित शिवसेनेने पाच जागा जिंकल्या होत्या.

महाविकास आघाडीला मोठी आशा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साखर पट्यात १२ पैकी आठ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीलाही आपले स्थान आणखी मजबूत करण्याची आशा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक बारामतीमध्ये होण्याची शक्यता आहे. तिथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचेच पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे.

पुणे जिल्ह्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला ९ जागा आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११ पैकी चार जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर राष्ट्रवादीने तीन जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

कोल्हापूर जिल्ह्यात १० जागा असून त्यापैकी २०१९ मध्ये काँग्रेसने चार, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन, शिवसेनेने एक आणि अपक्षांनी ३ जागा जिंकल्या. विधानसभेच्या प्रत्येकी आठ जागा असलेल्या सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या. दोन्ही जिल्ह्यांत भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने साताऱ्यात दोन आणि सांगलीत एक जागा जिंकली होती. २०१९ मध्ये काँग्रेसने सांगलीत दोन आणि साताऱ्यात एक जागा जिंकली होती.

अहिल्यानगरमध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने सहा, काँग्रेसने दोन, भाजपने तीन, तर एका अपक्षाने विजय मिळवला होता. आता या पट्यात बंडखोर किती मते घेतात, विजयी होतात, की कुणाला पाडतात याकडे लक्ष लागले आहे. त्यातही काही बंडखोर इतके ताकदवान आहेत, की ते मतदारसंघातील गणिते बदलू शकतील. राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, रणजीत शिंदे यांच्यासह काही नावे त्यात घेता येतील.

(लेखक भागा वरखडे हे साखर उद्योग क्षेत्राचा व्यासंग असलेले अभ्यासू पत्रकार आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »