… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

गुजरात राज्यात एकही खासगी साखर कारखाना नाही. तेथे कोणत्याही प्रकारची कारखानदार व ऊस उत्पादकांची संघटना नाही. गुजरातचे ऊस उत्पादक शेतकरी तेथील सहकारी साखर कारखान्याकडे ठेवी ठेवतात. तेथे एफआरपी तीन टप्यांत दिली जाते. त्यामुळे तेथील साखर कारखानदारांना ठेवीचा पैसा साखर उत्पादनासाठी वापरता येतो. त्यांना कोणत्याही बँकेची कर्ज घेण्याची व बँकेचे व्याज भरण्याची गरज भासत नाही. गुजरातमध्ये ऊस उत्पादक व सहकारी साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वयाचे संबंध आहेत. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत गुजरात राज्यातील सहकारी साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक देतात. हे वास्तव नाकारून चालणार नाही, असे पाटील म्हणाले.

देशातील इतर उत्पादनाचे दर वाढले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखरेचे दर तितकेसे वाढले नाहीत. साखर उद्योग, ऊस शेती टिकवण्यासाठी उत्पादनावरील खर्च कमी करणे हा उत्तम पर्याय ठरेल. ऊस उत्पादनासाठी होणारा महागड्या रासायनिक खताचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पर्याय शोधले पाहिजेत. तरच साखर कारखानदारी व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यासाठी राष्ट्रीय साखर संघाच्या वतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी हर्षवर्धन पाटील आले होते. त्यानंतर ‘पुण्यनगरी’ कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी ते साखर उद्योगावर बोलत होते.

देशात आवश्यकतेपेक्षा कमी साखर उत्पादन होईल. साखरेची टंचाई भासेल; अशी शक्यता गृहीत धरून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसंदर्भात केंद्र शासनाने तात्पुरते निर्बंध घातले होते. देशाला ७७ लाख मॅट्रिक टन साखरेची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८० ते ८५ मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे साखर कारखान्यावर इथेनॉल निर्मिती संदर्भातील तात्पुरत्या स्वरूपात घातलेले निर्बंध उठवण्यासाठी आपण आग्रही आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे साखर कारखानदार व ऊस उत्पादक यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर हार्वेस्टर कटिंग हा उत्तम पर्याय आहे. मात्र, हार्वेस्टर हे अधिक क्षमतेचे असल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे देशात कमी क्षमतेचे हार्वेस्टर उत्पादन व्हावे. साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यावरही लक्ष केंद्रित करणार आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »