कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात मोठी संधी : अजित चौगुले

पुणे : कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजी उत्पादनात महाराष्ट्रामध्ये मोठा वाव आहे. कारखान्यांनी याकडे वळावे, असे प्रतिपादन ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी एका कार्यशाळेत केले.
यासंदर्भात ‘विस्मा’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेनुसार व जैव इंधन २०१८ च्या धोरणानुसार साखर उदयोगामध्ये प्रेसमड व स्पेंटवॉशपासून “बायो सीएनजी” उत्पादन प्रकल्प “सतत” या योजनेद्वारे भारत पेट्रोलियम कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे. यानुसार वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), पुणे व भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च रोजी रॉयल कनॉट बोट क्लब, पुणे येथे “कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सीबीजी) या विषयावरील परिसंवादाचे” आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांच्या २५ अधिकारी व इतर सलग्न उदयोगाचे २५ मान्यवर असे एकूण ५० प्रतिनिधी परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
सदर परिषदेमध्ये विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी उपस्थितांना संबोधन करताना सांगितले की, राज्यामधून मोठया संख्येने सीबीजीचे उत्पादन करणेस्तव खूप वाव आहे. त्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रेसमड / स्पेंटवॉश पासून सीबीजी उत्पादन घ्यावे. त्याकरिता भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्यासोबत संलग्न करार / भागीदारी करून या नैसर्गिक व प्रदूषणविरहित इंधनाचे उत्पादन करून भारत आत्मनिर्भर होण्याकरिता मोलाचे योगदान दयावे.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. च्या अधिकाऱ्यांनी सीबीजी उदयोगाचे महत्व समजावून सांगितले. आधुनिक काळाचे अत्यावश्यक व आर्थिक फायदा मिळवून देणारे इंधन असल्याचे नमूद केले. कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या गॅसच्या विक्रीबाबत ऑईल कंपन्यांकडून १०० टक्के काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे सीबीजी उत्पादनाकरीता भारत सरकारच्या Sustainable Alternative Towards Affordable Transportation (SATAT) योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सवलत व अनुदान देण्यात येते. त्यामुळे सीबीजीच्या उत्पादनामध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी सहभाग घेऊन उदयोगाची आर्थिक उन्नती करावी, असे आवाहनही केले.
परिसंवादास भारत पेट्रोलियम मुंबईचे महाव्यवस्थापक शशीप्रकाश, उपमहाव्यवस्थापक संजय ठाकूर, जीपीएस रिन्युएबलचे मिलिंद पत्के, बीपीसीएलचे संतोष निवतकर, सुरेश व रोहित यांनी तांत्रिक व आर्थिक सादरीकरणे केली. विस्माचे दिपक कांबळे यांनी परिसंवादाचे समन्वय केले. याचे साखर व औद्योगिक क्षेत्राकडून स्वागत करण्यात आले.
उपस्थितांच्या प्रश्नांना तज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करून परिषद संपन्न झाली. या परिषदेचा राज्यातील साखर कारखान्यांना व इतर उदयोगांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.