‘एकरी खोडवा उद्दिष्टे’ विषयावर कार्यशाळा

पुणे: जमिनीची सुपीकता, लागण पद्धत, रासायनिक व सेंद्रिय खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन व पीक संरक्षण या पंचसूत्रांचा अवलंब केला पाहिजे, असे कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी ‘उसाची उत्पादकता वाढ’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले.
‘साखर टास्क फोर्स कोअर कमिटी’ च्या वतीने ‘१०० टन/एकरी ऊस व ७५ टन/एकरी खोडवा उद्दिष्टे’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. १९९७ पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रिया, अथक प्रयोग, प्रयत्न व मिळालेल्या यशाचा उल्लेख करून डॉ. माने यांनी यावरील माहिती दिली.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी प्रास्ताविक केले. फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले, की साखर उद्योगापुढील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित व आर्थिक उन्नतीसाठी, ऊस तोड कामगार, कर्मचारी या सर्व स्टेक होल्डर्सचा सर्वांगीण विचार करण्यासाठी हा टास्क फोर्स कार्यरत असतो.
राजकुमार धुरगुडे पाटील अध्यक्ष, ‘अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया’ यांनी खतांचा संतुलित वापर या विषयावर मार्गदर्शन केले. कॅन बायोसिस रिसर्च अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी व अमेय जोशी यांनी जमिनीचे आरोग्य या विषयी माहिती देताना समक्ष शेतात प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवीत असल्याचे सांगितले.
या वेळी एकरी शंभर टनांपेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी खंडू भुजबळ व नितीन वरखडे यांनी त्यांची यशोगाथा सांगितली. डॉ. दीपक गायकवाड यांनी सांगितले की पाणी आणि निविष्ठांचा सढळ वापर होऊनही गेली काही वर्षे उसाच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आली नाही. त्यामुळे आता ऊसशेती तंत्र, प्रशिक्षण, पाणी, माती आरोग्य, वाफसा यांसारख्या तांत्रिक पीक व्यवस्थापन कौशल्ये ऊस शेतीत वापरणे ही काळाची गरज आहे. अजित चौगुले, कार्यकारी संचालक, विस्मा यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच या कार्यक्रमात ‘शुगरटुडे’चे संपादक नंदकुमार सुतार, महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व माजी कार्यकारी संचालक (यशवंत साखर कारखाना, थेऊर) साहेबराव खामकर यांनी आभार प्रदर्शन केले.