‘यशवंत’ची निवडणूक तब्बल १२ वर्षांनी होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : तब्बल १२ वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.

आर्थिक अनियमितेमुळे २०११ मध्ये हा कारखाना बंद पडला. काही दिवसांपूर्वी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर ११ मार्च २०२३ रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा झाली होती.

या सभेत यशवंत सुरू करण्यासाठी कारखान्याची कोणतीही मालमत्ता भाड्याने न देता अथवा न विकता तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने करावा, असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. त्यानुसार, साखर आयुक्तांना निवडणूक खर्चासाठी ४० लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सभासद शेतकरी सहकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, यशवंतच्या ताळेबंदात रक्कम शिल्लक नसल्याने निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनी निधी उभारावा या आवाहनानुसार सभासदांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडणूक होईपर्यंत सदर रक्कम डिपॉझिट म्हणून राहणार आहे. कारखाना सभासदांच्या ताब्यात गेल्यानंतर किरकोळ व्याजासह नवीन संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचे ठरले आहे.

कारखाना सुरू झाल्यावर हवेली तालुक्याला गत वैभव पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी स्थापन केलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे धुराडे तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशवंत कारखान्यासंदर्भात कारखाना बंद झाल्यापासून आजपर्यंत एकुण १२ याचिका दाखल केल्या. त्यातील एका याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »