कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती व्यवसायासाठी ऊस लागवड केला होता. हा ऊस त्यांनी कारखान्याला न देता रसवंतीसाठी ठेवला होता. ६ मे रोजी रात्री अचानक शेतात आग लागली. मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे. उसाचे पाचट वाळलेले असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले.
संपूर्ण उसाच्या पिकात आग पसरली आणि ऊस जळून खाक झाला. आग लागली त्यावेळी भिकू आडे घराकडे जेवणासाठी गेले होते. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. शेतात मदतीसाठीही कोणी नव्हते. त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले नाही. आग पसरतच गेली आणि शेतात रसवंतीसाठी लावलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले. साधारणतः एक लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आडे यांनी व्यक्त केला आहे.