साखर कारखानदारी वाढवण्यासाठी ‘एआय ‘चा पर्याय

मंत्री हसन मुश्रीफ; एकरी १०० टनांवर ऊस उत्पादन वाढवण्याची गरज
मुरगूड : केंद्र सरकारच्या सोलर पॅनलमुळे व इलेक्ट्रिक वाहनांमुळे साखर व उपपदार्थांना दराबाबत मर्यादा येऊन कारखानदारी अडचणीत आली आहे. वेगाने बदलणाऱ्या य परिस्थितीला तोंड देण्यासाठी ‘एआय’च्या मदतीने शंभर एकरांत ऊस उत्पादन वाढीचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. एकरी किमान १०० टन ऊस उत्पादन वाढवल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील रणजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या विजयोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर होते.
कागल स्मार्ट सिटी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्हा तिघांवर असल्याचे समरजित घाटगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, अमरिश घाटगे, विशाल भोपळे यांची भाषणे झाली. दत्तामामा खराडे, रणजित सूर्यवंशी, रंगराव पाटील, विश्वजित पाटील, पद्मसिंह पाटील, जीवन शिंदे, दिनकर कोतेकर, रणजित मुडकशिवाले, मनोज फराकटे, शशिकांत खोत उपस्थित होते. स्वागत आप्पाजी मेटकर, प्रास्ताविक सुनील जाधव, सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. आभार भरत लाड यांनी मानले.






