शेतकर्‍याजवळ शंभर रूपयेदेखील नसायचे!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

भास्कर घुले,
कार्यकारी संचालक, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.

ग्रामीण भागाचे अर्थकारण समृद्ध करणारा साखर कारखाना एकदा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, ‘तू माझी अनेक वर्षे सेवा केलीस, तर माझ्यासाठी आणखी एक काम कर. माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मला आता माझे मनोगत व्यक्त करायचे आहे, मला व्यक्त व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी वाचा होशील काय?’ मी क्षणभर विचार केला. कारण मी भारावलो होतो. उत्साहित झालो होतो. एक अनामिक प्रकाश माझ्या डोळ्यासमोर तरळला, त्याने मला प्रेरणा दिली साखर कारखाना होऊनच लिहिण्याची…

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारा साखर उद्योग शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले देशात साधारणपणे 1903 मध्ये साखर उत्पादनाला सुरुवात झाली. इंग्रजांनी डच लोकांच्या मदतीने भारतातील पहिला साखर कारखाना सुरू केला.

महाराष्ट्रामध्ये 1920 मध्ये हरेगाव येथे पहिला साखर कारखाना सुरू झाला. महाराष्ट्र शुगर मिल्स हा दुसरा साखर कारखाना 1926 मध्ये टिळकनगर येथे सुरू झाला. अशाप्रकारे नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला सुरुवात झाली, ती अर्थात खासगी क्षेत्रातूनच. सुरुवातीचे हे साखर कारखाने खासगी उद्योजकांनी सुरू केले.

Haregaon sugar

साखर कारखानदारीचा उदय झाला, त्यावेळी सिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या. कारखान्यांची संख्या देखील बोटावर मोजण्या इतपत होती. साखर कारखाना ऊस विकत घेतोय म्हटल्यावर शेतकर्‍यांनी उसाच्या लागवडीकडे मोर्चा वळविला. हळुहळू उसाचे क्षेत्र वाढत गेले; परंतु कारखान्याची गाळप क्षमता त्याला पुरेशी नव्हती.

शेतकर्‍यांचा ऊस पक्व झाल्यानंतर त्याची तोडणी करणे व तो ऊस गाळपासाठी कारखान्यास देणे यामध्ये फारशी सुसंगतता नव्हती.

शेतकर्‍यांचा तोडलेला ऊस अनेक दिवस शेतात पडून राहायचा व शेतकर्‍यांचे नुकसान व्हायचे. त्या काळात शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रवरानगर येथे सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची उभारणी व्हावी, हा विचार विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मनात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी तत्कालीन अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकार्याने सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली.

कारखानदारीचा कुठलाही अनुभव नसताना त्यांनी हजारो शेतकर्‍यांना एकत्र केले. त्यांच्याकडून शेअर भांडवल जमा केले. त्यानंतर बँकेचे कर्ज घेऊन कारखाना उभारणीस सुरुवात केली. त्या काळामध्ये शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना उभा करतील, ही संकल्पनाच कोणाला रुचण्यासारखी नव्हती. मात्र ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर कारखानदारी वाढली पाहिजे आणि तीही सहकारातून शेतकर्‍यांच्या मालकीची असली पाहिजे या भावनेतून महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला.

शेतकर्‍याजवळ शंभर रूपयेदेखील नसायचे
त्यानंतर सहकारी साखर कारखानदारी हळुहळू वाढत गेली. साखर कारखाना उभा करत असताना भांडवल ही पहिली गरज होती. बँकेकडून कर्ज उभारणी करताना कारखान्याकडे स्वतःचे भाग भांडवल असणे आवश्यक होते.

त्या काळामध्ये शेतकर्‍यांचे उत्पन्न फारच तोकडे होते. बँकेकडून कर्ज उभारणीसाठी किमान दहा टक्के भाग भांडवल गोळा करणे आवश्यक होते. प्रत्येकी एक हजार रुपये रकमेचा शेअर घेऊन कारखान्याचे सभासद होता येत असे. परंतु त्या काळामध्ये शेतकर्‍याकडे एक हजार रुपये देखील नसायचे. त्यावर उपाय म्हणून गावातील सेवा सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना एक हजार रुपयांचे कर्ज कारखान्याचे भाग भांडवल खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले.

एक हजार रुपयांचे कर्ज घेण्यासाठी देखील शेतकर्‍यांना शंभर रुपये प्रथम भरावे लागत होते. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली होती, की शंभर रूपयेदेखील त्यांच्याकडे नसायचे. साखर कारखाना उभा राहिल्यानंतर आपला परिसर व शेतकरी यांना सुगीचे दिवस येतील हे स्वप्न उराशी बाळगून, त्या त्या कार्यक्षेत्रातील दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने शेअर भाग भांडवल गोळा करण्याचे धाडस केले.

शंभर रुपयांसाठी भांडी विकावी लागली
शेतकर्‍यांकडून किमान शंभर रुपये घ्यायचे व सोसायटीत कर्ज प्रकरण करून एक हजार रुपये पूर्ण करून घ्यायचे आणि शेअर शेतकर्‍याला द्यायचा असा उपक्रम राबवावा लागला. सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर बँकांमध्ये कारखान्याचे खाते उघडले जात असे. तिथून पुढे कारखाना भरण्याची प्रक्रिया सुरू होत असे. ज्या काळात शेतकर्‍याकडे दोन वेळचे अन्न मिळेल याची शास्वती नव्हती, त्या काळात शेअर रूपाने भांडवल गोळा करणे हे अत्यंत कठीण काम होते.

मात्र कारखान्याचे संस्थापक चेअरमन यांच्यावर परिसरातील शेतकर्‍यांचा प्रचंड विश्वास होता. साखर कारखान्याची स्थापना करत असताना, ज्या ज्या संस्थापकांनी हे काम केले त्यांनी स्वतःची पदरमोड करून शेतकर्‍यांना एकत्र केले. त्यांना विश्वास दिला व त्यांच्याकडून भाग भांडवल गोळा केले. अनेक शेतकर्‍यांनी स्वतःची दागिने विकले. काहींनी शेळ्या-बकरीसारखे प्राणीधन विकले. तर काहींनी स्वतःच्या घरातील भांडी मोडून शंभर रुपये उपलब्ध केले व उर्वरित रक्कम सोसायटीतून कर्ज घेतले व आपला एक हजार रुपयांचा शेअर पूर्ण केला.

संस्थापकांनीसुद्धा दारोदार फिरून शेतकर्‍यांचे हित साधण्यासाठी भटकंती केली. महत्प्रयासाने शेअर भांडवल जमा झाल्यानंतर कारखाना निर्मितीसाठी जागा पाहणे व ती जागा शेतकर्‍यांकडून खरेदी करून घेणे आवश्यक होते. त्या काळामध्ये समाजाचा आपल्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास होता. समाजकार्यासाठी स्वतःचे नुकसान झाले तरी चालेल पण गावचा आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे, या उदात्त हेतूने अनेक शेतकर्‍यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी अत्यल्प दरामध्ये कारखान्यासाठी उपलब्ध करून दिल्या. त्यात काही शेतकरी भूमिहीन देखील झाले. तरीसुद्धा त्यांनी आपल्या जमिनी कारखान्यासाठी देताना डोळ्यात अश्रू आणले नाही.

शेतकर्‍यांचे दातृत्व
शेतकर्‍यांनी मोठा दानशूरपणा दाखविला आणि आपली स्वतःची ‘काळी आई’ कारखान्यासाठी दिली. एरवी इंच-इंचासाठी एकमेकांचे बांध कोरणारे, शेजार्‍यांशी भांडणारे शेतकरी, आपल्या शेकडो एकर जमिनी कारखान्यासाठी देतात. एवढे मोठे दात्तृत्व त्या भूमिपुत्रांमध्ये आले कुठून, हा आजच्या काळात प्रश्न पडतो.

मी एक शेअर घेऊन कारखान्याचा मालक होणार आहे, ही भावना त्यांच्यामध्ये होती. त्या काळामध्ये शेतकरी इतका अडचणीत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत होता. त्यामुळे त्याला पूर्ण खात्री होती की आता ‘विना सहकार, नाही उद्धार’ त्याचप्रमाणे जे नेतृत्व कारखाना उभारण्यासाठी प्रयत्न करत होते, त्या नेतृत्वावर सर्वांचा गाढा विश्वास होता व ते नेतृत्व ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या तत्वावर चालणारे होते. म्हणूनच हजारो शेतकरी एकत्र आले आणि ते सर्वजण सहकारी साखर कारखान्याचे मालक झाले.

अन् विकासगंगा वाहू लागली!
सहकारी साखर कारखाना उभा करत असताना परिसरातील शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरी मिळेल. उसाला योग्य भाव मिळेल. परिसराचा विकास होऊन उजाड माळरानाचे नंदनवन होईल, ही खात्री सर्वांना होती. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारी ग्रामीण भागात उभी राहत असल्यामुळे तेथील लोकांचा एकमेकांवर विश्वास होता. यातूनच ग्रामीण भागातील विकासची गंगा भरभरून वाहू लागली.

यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास तयार झाला. ज्या भागामध्ये कारखाना झाला, त्या भागातील शिक्षित व अशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. शेतमजुरांना हक्काचे कामाचे ठिकाण मिळाले त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला. स्थलांतर करून येणारे हजारो मजूर कारखाना कार्यस्थळावर व कार्यक्षेत्रात आल्यामुळे स्थानिक लोकांना उपजीविकेचे साधन तयार झाले. लहान-मोठे उद्योजक व्यापारी व इतर कारागिरांना उपजीविका करता येऊ लागली. छोटे सायकल दुकानदार, किराणा दुकानदार, नाभिक, फेरीवाले, पंक्चरवाले, छोटे हॉटेल मालक, मटन-मच्छी विक्रेते, पाव बटर विकणारे, भाजीपाला विक्रेते, वाहन चालक-मालक अशा अनेकांना खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध झाली.

उजळले सर्वांचे भाग्य
ग्रामीण भागातील हजारो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नोकर्‍या मिळाल्या. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात खेळता पैसा उपलब्ध झाला आणि त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बहुतेक ठिकाणी उजाड माळरानावर उभ्या राहिलेल्या भाग्यलक्ष्मीमुळे सर्वांचेच भाग्य उजळले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किमान एक लाख लोकांचे उपजीविकेचे साधन म्हणून साखर कारखाना जबाबदारी पार पाडू लागला.

70 ते 75 वर्षांपूर्वी सुरुवात झालेली ही साखर कारखानदारी आज यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली आहे. आज त्यामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. खूप चढ-उतार या साखर उद्योगाने पाहिले आहेत. कारखान्याने दारिद्र्य पाहिले, तसे वैभवदेखील पाहिले आहे. कारखान्याच्या बॉयलरमधून बाहेर पडणार्‍या काळ्या धुराबरोबर, सोन्याचा धूरदेखील निघतो हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

ऊस हे तसे जंगलात वाढणारे गवत. म्हणजे गवताळ वनस्पती. परंतु त्याच गवताळ वनस्पतीचा साखर कारखान्याने कल्पवृक्ष केला आणि याच कल्पवृक्षाने कारखाना कार्यक्षेत्रामध्ये लक्ष्मी व सरस्वतीला आमंत्रित केले. पंढरपूरला पांडुरंग विटेवर उभा राहिला. लाखो भक्तांची विठू माऊली झाला. त्याचप्रमाणे साखर कारखाना देखील कार्यक्षेत्रात उभा राहिला व लाखोंचा पोशिंदा झाला आणि म्हणूनच ‘लाख मरोत; पण हा लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे’ हीच लाखोंची अपेक्षा आहे.

आज आपण बघतो, देशामध्ये व महाराष्ट्रात अनेक मंदिरे आहेत. करोडो भाविक तीर्थयात्रा करतात देवाला नवस करतात. देव त्यांना पावतोदेखील. म्हणून आपली दैवते आपल्यासाठी श्रद्धास्थान आहेत. आपण पाहत आहोत की अनेक जागृत देवस्थाने आहेत. कुलदैवते आहेत, ग्रामदैवते आहेत. तरीदेखील पंढरपूरचा श्री पांडुरंग हा साध्या, भोळ्या वारकर्‍यांचा व भक्तांचा प्राण आहे. त्याचप्रमाणे साखर कारखाना हे दैवत नसले, तरी दैवताहून कमी मात्र नाही.

मनोभावे केलेल्या पूजाअर्चेला देव निश्चित पावतो, त्याप्रमाणे कारखानादेखील मनोभावे केलेल्या सेवेला पावल्याशिवाय राहत नाही, हे आपण सर्वजण पाहत आहोत. देशात व राज्यात अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. अरबो रुपयांचे उद्योगधंदे आहेत, नॅशनल – मल्टिनॅशनल कंपन्या आहेत.
अब्जावधी लोकांना रोजगार देणारे धंदे आहेत; पण काही कोटींमध्ये उभा राहणार साखर कारखाना ग्रामीण भागाला वैभव प्राप्त करून देणारा व लाखो लोकांची उपजीविका करणारा साखर कारखाना हा ‘आमचा पांडुरंग’ आहे.

ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदविले. चांगदेवांनी भिंत चालवली. आपण मात्र ज्ञानेश्वर व चांगदेव होऊ शकत नाही. परंतु साखर कारखाना जर म्हणाला तू माझी अनेक वर्षे सेवा केलीस, तर माझ्यासाठी आणखी एक काम कर माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मी अनेक प्रकारे समाजाचा उद्धार केला आहे. मी अनेक घाव सोसत इथपर्यंत आलो आहे. माझ्यावर अनेकांनी संशोधन केले. लेख लिहिले, व्याख्याने दिली. तसेच अनेकांनी डॉक्टरेट मिळवली.

मी ज्याप्रमाणे लाखोंचा पोशिंदा झालो, त्याचप्रमाणे लाखोंचे नेतृत्व करणारे आदर्श नेते देखील मी तयार केले. त्यातले बहुतेक जण आज देश व राज्य चालवत आहेत. मला याचा सार्थ अभिमान आहे; परंतु मला आता माझे मनोगत व्यक्त करायचे आहे, मला व्यक्त व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी वाचा होशील काय? कारखान्याने मला प्रश्न विचारला. मी क्षणभर विचार केला. कारण मी भारावलो होतो. उत्साहित झालो होतो. एक अनामिक प्रकाश माझ्या डोळ्यासमोर तरळला, त्याने मला प्रेरणा दिली साखर कारखाना होऊनच लिहिण्याची. मग संकल्प सोडला सविस्तर लिहिण्याचा आणि जन्म झाला ‘मी कारखाना बोलतोय’ या सदराचा.

यापुढे ‘शुगरटुडे’च्या प्रत्येक अंकात हे सदर क्रमशः नियमितपणे आपल्या भेटीस येईल. माझ्या पहिल्या लेखाप्रमाणे आपण या नवीन लेखमालेचे नक्कीच स्वागत कराल, या खात्रीसह धन्यवाद!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »