फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे


डॉ. सुरेश पवार,
वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-
(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
सन 2000-2001 मध्ये साधारणतः सहा लाख हेक्टरवर उसाची लागवड होत होती, ते क्षेत्र 2022-2023 मध्ये १४ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. मात्र यापुढे क्षेत्र वाढीस मर्यादा आहेत. म्हणून आहे त्या उपलब्ध क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवणे हाच मार्ग आहे. महाराष्ट्रात हेक्टरी उत्पादकता मागील १०-१५ वर्षापासून ८०-८५ मे. टना पर्यंत रेंगाळली आहे. काही शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पन्न घेतात; परंतु त्यांची संख्या मोजकी आहे.
आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाही किंवा ते वापरण्यासाठी शेतकऱ्यांना काही कारणांमुळे अडचणी येत आहेत.
ऊस लागवडीपासून आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास, उत्पादन वाढून साखर कारखाने स्वावलंबी होऊन त्याचा फायदा साखर कारखान्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, म्हणून ऊस गाळपापासून तोडणीपर्यंतच्या तंत्रज्ञानाचा उहापोह लोखात करीत आहे.
१. शाश्वत उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवून, तिचा पोत सुधारणे महत्त्वाचे…
महाराष्ट्रामध्ये बहुतेक ऊस उत्पादक शेतकरी एकच पिकाची लागवड करतात; परंतु शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जीवाणू खतांचा वापर, उसामध्ये आंतर पिकांचा वापर, सेंद्रीय खतांचा वापर, फेरपालटीच्या पिकांचा वापर असे उपक्रम एकत्र येऊन केल्यास जमिनीची गुणवत्ता वाढून ऊस उत्पादकताही वाढू शकते.
या उपक्रमाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री दत्त सह. साखर कारखाना शिरोळ (कोल्हापूर) हे आहे. या परिसरामध्ये क्षारपड जमीन सुधारण्याचा कार्यक्रम शेतकरी आणि साखर कारखाना व्यवस्थापाने एकत्र येवून केल्यामुळे हजारो एकर जमीन लागवडीखाली येऊन कारखान्याची प्रति एकर उत्पादकताही वाढली आहे.
2. आधुनिक पद्धतीने जमिनीची मशागत :
वर्षानुवर्षे एकाच जमिनीत ऊस पीक घेतल्यामुळे आणि अति पाणी वापरामुळे जमिनी टणक झाल्या आहेत. यासाठी उभी-आडवी खोल नांगरट करणे, सबसॉयलरया वापर करून जमिनीचा टणक थर मोडून जमीन भुसभुशीत केल्यास उस उत्पादकता वाढते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
3) हंगाम निहाय लागवड
महाराष्ट्रात तीन हंगामात आडसाली, पूर्व आणि सुरू हंगाम अशी उसाची लागवड केली आते. शिफारशीत कालावधीत आणि हंगाम लागवडीसाठी शिफारशीत वाणांचा वापर केल्यास, तोडणी वेळेवर होऊन उत्पादकता वाढते.
म्हणून आडसाली लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी. पूर्व हंगामी लागवड – ऑक्टोबर – नोहेंबर मध्ये करावी, तर सुरू लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत केल्यास उत्पादन वाढते.
४) लागवडीसाठी रुंद सरीचा वापर
भारी जमिनीत साडेचार ते ६ फूट, मध्यम जमिनीत साडेचार ते ५ फूट, तर हलक्या जमिनीत चार फूट रूंद सरीत उसाची लागवड केल्या एकरी ४० ते ५० हजार पक्व ऊसाची संख्या मिळते. कारण रुंद सरीमुळे उसाच्या सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळतो. ज्यामुळे कर्बग्रहण क्रिया वाढून, प्रत्येक उसाची जाडी वाढते. त्यामुळे ऊस उत्पादनातही वाढ होते. तसेच तोडणीसाठी आणि खोडवा पिकाच्या संगोपनासाठी रुंद सरीचा वापर आंतर मशागतीसाठी चांगल्या प्रकारे करता येतो.
५. ऊस रोप लागवड पद्धत :
ऊस लागवड क्षेत्राजवळच सुपरकेन नर्सरी पद्धतीने रोपे तयार करून 30 ते 30 दिवसांच्या रोपांची लागवड केल्यास ऊस बियाण्यात बचत होते आणि एकरी ५ ते ६ हजार रोपांची लागवड केल्यास, एकरी गाळण्यालायक ४० ते ५० हजार सशक्त ऊस मिळून ऊस उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.
यंत्राच्या साहाय्याने रोप लागवड करता येते. त्यासाठी शेतकरी एकत्र आल्यास वेळ आणि पैसाही वाचतो.
६) ऊस उत्पादन वाढीसाठी नवीन आणि शिफारशीत ऊस वाणांचा वापर :
कृषी विद्यापीठांनी आणि ऊस संशोधन केंद्रांनी शिफारशीत केलेल्या ऊस वाणाचाच हंगाम निहाय लागवडीसाठी वापर करावा यामध्ये :
अ) मध्यम पक्व होणारे वाण को-८६०32, फूले- ०२६५, फुले- १४०८२, फुले १५०१२ आणि व्हीएसआय ८००५
ब) लवकर पक्व होणारे वाण: फुले- – १७००१, फुले. ९०५७, फुले – ११०८२, व्हीएसआय – ४३४
या वाणांचा वापर करावा.
७) पक्वतेनुसार तोडणीचा कार्यक्रम राबवणे :
प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ४-५ ऊस वाणांचा वापर लागवडी साठी करणे गरजेचे आहे, यामध्ये 2-3 मध्यम पक्व होणारे 2-3 लवकर पक्व होणारे अशा वाणांचा वापर केल्यास पक्वतेनुसार तोडणी करता येते. यामुळे साखर उत्पादनाबरोबरच, ऊस उत्पादनामध्येही वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.
८) शुद्ध आणि निरोगी बेणे मळा लागवड कार्यक्रम
प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्रिस्तरीय बेणेमळा कार्यक्रम राबवल्यास, शेतकऱ्यांना शुद्ध आणि निरोगी बेणे उपलब्ध होते. यामध्ये मूलगुणी, मुलभूत आणि पायाभूत बेणे कार्यक्रम ऊस संशोधन केंद्रामध्ये राबवणे जरुरीचे आहे.
प्रमाणित आणि सत्य प्रत बियाणे प्लॉट साखर कारखान्याच्या क्षेत्रावर किंवा प्रगतीशील व अभ्यासू शेतकऱ्याकडे घेऊन, नंतर ते इतर शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देता येते. या मध्ये संशोधन केंद्रावर, बियाण्याला ऊष्ण बाष्प प्रकीया २-४ तास केल्यास, गवताळवाढ आणि तत्सम रोगाचा प्रादुभाव टाळता येतो. लागवडीच्या वेळी मेलेथीऑन ५० टक्के ३०० मिली अधिक १०० ग्रॅम कार्बन्डॅझिम प्रति एकर १०० लि. पाण्यात मिसळून, उसाची टिपरी १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावीत. या बुरशीनाशक व कीडनाशक औषधाच्या प्रक्रियेनंतर अर्ध्या तासाने १०० लिटर पाण्यामध्ये ऑसिटोबॅक्टर १ लिटर, अधिक १ लि. ॲझोफॉस्फरस या जीवाणूच्या मिश्रणामध्ये बियाणे अर्धा तास बुडवून लागवड केल्यास, जवळपास ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खताखर बचत होते व उत्पादकताही वाढते.
९) सुधारित पद्धतीने पाण्यात बचत आणि उत्पादन वाढीसाठी पाण्याचा आणि खतांचा वापर :
ऊस पिकाला ठिबक पद्धतीने पाणी आणि खते, अन्नद्रव्ये दिल्यास ५०% पाण्यात बचत होते, तसेच खतांची कार्यक्षमताही वाढते. यामुळे उत्पादकता वाढते हे सिद्ध झाले आहे.
आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरासाठी जमिनीवरील ठिबक किंवा जमिनीखाली पुरलेले अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत फुले जल स्वाफ्टवेअर प्रणालीनुसार प्रत्यक्ष पिकाची पाण्याची गरज मोजून वापर कोणास पाण्याची बचत होऊन उत्पन्नही वाढते.
१०) सुधारितत पद्धतीने ऊस पिकाची आंतर मशागत :
ऊसामध्ये नांग्या भरणे, बाळ बांधणी, मोठी बांधणी, निंदणी इत्यादी कामे करावी लागतात. ही सर्व कामे वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करण्यासाठी टॅक्टर चलित किंवा पावर टीलरचा वापर केल्यास, खर्चात बचत होवून परिणामी अधिक आर्थिक फायदा मिळतो.
म्हणून ऊस पिकातील सर्व कामे यंत्राच्या साह्याने करणे जरुरीचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रुप तयार केल्यास सामूहिक अवजारे वापरणे शक्य आहे.
आंतर मशागतीवेळी एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण करता येते. ऊस पीक शेतामध्ये वर्षभर राहत असल्यामुळे आणि सुरुवातीची वाढ हळू होत असल्यामुळे या पिकामधीत तणांच्या नियंत्रणासाइ खर्च जास्त येतो, म्हणून एकात्मिक पद्धतीने म्हणजे अवजारांच्या सहाय्याने तसेच शिफारसीत तणनाशकाचा वापर करून तणांचा बंदोबस्त माफक खर्चात करता येतो. यासाठी लागवडीपासून दोन महिन्यात बाळबांधणी, चार महिन्यात मोठी बांधणी, तसेच लागवडीनंतर ८ ते १० दिवसांत एकरी ६०० ग्रॅम मेट्रीब्युझीन (सेंकॉर) अधिक ५०० ग्रॅम २-४-डी ५०० लि. पाण्यात विरघळून फवारणी करावी. अशाप्रकारे एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण केल्यास खर्चात बचत होऊन, चांगल्या प्रकारे तण नियंत्रण होत आणि उत्पन्नातही वाढ होते.
११) एकात्मक पद्धतीने ऊस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन :
ऊस पीक जास्त काळ शेतात राहत असल्यामुळे त्याला अन्नद्रव्याची गरज जास्त असते. ती कमी खर्चात भागवण्यासाठी आणि उत्पन्न जास्त घेण्यासाठी एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रीय खते, सेंद्रीय पदार्थाचा जास्तीत जास्त वापर, जीवाणू खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रीय खतामध्ये शेणखत, कंपोष्ट खत, हिरवळीचे खत, पालापाचोळा तसेच उसाचे पाचट, साखर कारखान्यातील मळीपासून तयार केलेले कंपोस्ट खत इत्यादीचा जास्तीत वापर करावा.
निसर्गात तयार होणारे जीवाणू खत, तसेच तयार केलेल्या जीवाणू खतांचा वापर जसे ॲसिटोबॅक्टर आणि फॉस्फरस, पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंपासून तयार केलेले जैविक खत, त्याचप्रमाणे इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करून, ऊस पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा वापर करून, उरलेली अन्नद्रव्ये रासायनिक खताद्वारे द्यावीत.
ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतामार्फत ठिबक संचामधून दिल्यास खर्चात बचत होऊन उत्पनातही वाढ होते. म्हणून ऊस पिकाचे अन्न व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करणे गरजेचे आहे, हे व्यवस्थापन करताना माती परीक्षण करून आपणाला अपेक्षित उत्पन्नाप्रमाणे एकात्मिक खते दिल्यास फायदा होतो आणि जमिनीचा पोतही सुधारतो. जास्त पावसाच्या प्रदेशात खतांच्या गोळ्या (ब्रिकेटस्) तयार करून दिल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होते म्हणून सर्व बाबीचा विचार करून संतुलित अन्नद्रव्ये एकात्मिक पद्धतीनेच द्यावीत.
१२) ऊस पिकात अंतरपिकाचा अवलंब करावा :
ऊस पिक सुरुवातीच्या काळात हळू वाढते, म्हणून सुरवातीचे ३-४ महिने या पिकात आंतर पिके घ्यावीत, या आंतर पिकापासून आर्थिक फायदा होऊन, उसावर झालेला खर्च यातून मिळू शकतो.
ऊसामध्ये आडसाली हंगामात- सोयाबीन, भाजीपाल्याची पिके, भुईमूग आंतर पीक म्हणून हिरवळीची पिके घेता येतात, पूर्व हंगामी ऊस पिकात – कांदा, बटाटा, भाजीपाल्याची पिके, हरभरा इत्यादीची लागवड करता येते.
सुरू हंगामासाठी कलिंगड, टरबुज, काकडी, जलद वाढणारा भाजीपाला, उन्हाळी भुईमूग इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.
१३) सुधारित पद्धतीने खोडवा व्यवस्थापन :
उसाचे एक लागवडीचे आणि नंतर कमीत-कमी दोन खोडवा पिक घेतल्यास, ऊस पीक फायदेशी ठरू शकते. कारण खोडवा पिकाला लागवडीचा आणि पूर्व मशागतीचा खर्च येत नाही. खोडवा पिकाची सुधारित पद्धतीने जोपासना केली, तर त्याचेही लागवडीच्या पिकाइतकेच उत्पन्न मिळू शकते.
खोडवा पिकाचा एकंदर खर्च लागवडीच्या पिकाच्या निम्माच येतो, म्हणून कमीत-कमी दोन खाडेवा पिके घ्यावीच. खोडवा पिकासाठी, लागवडीचा ऊस तुटल्यानंतर जमिनीलगत बुडखे छाटणे, नंतर त्यावर बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करणे, नांग्या भरणे, अन्नद्रव्यांचा पहिला हप्ता १५ ते ३० दिवसात देणे जरुरीचे असते. पाचट व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण करून साडेतीन ते चार महिन्यात अन्नद्रव्यांचा दुसरा हप्ता देवून, वेळेवर पाणी दिल्यास खोडवा पीक १० ते १२ महिन्यात तोडणीस तयार होते, वेळेवर तोडणी केल्यास खोडव्याचे उत्पन्नही लागवडीच्या पिकाएवढचे मिळते. म्हणून खोडवा पिकाकडे विशेष लक्ष देऊन अधिक आर्थिक फायदा घ्यावा.
१४) पक्वतेनुसार ऊसाची तोडणी महत्वाची :
ऊस पिकाची लागवड हंगामानुसार करणे जसे महत्वाचे आहे, तसेच त्याची तोडणी पक्वतेनुसार वेळेत करणे जरुरीचे असते. यासाठी शेतकरी आणि कारखाना व्यवस्थापन यांचे एकात्मिक प्रयत्न असणे गरजेचे आहे. लागवडीच्या हंगामानुसार सर्वसाधारण आडसाली ऊस १६ ते १८ महिनते,, पूर्वहंगामी १४ ते १६ महिने, सुरू ऊस १२ ते १४ महिने आणि खोडवा ऊस ११ ते १२ महिन्यांत तोडल्यास साखर उतारा त्याचबरोबर उसाचे उत्पन्नही चांगले मिळते. उस तोडल्यानंतर गाळपी २४ तासाच्या आत झाल्यास, साखर उतारा आणि उसाचे वजनही अपेक्षित मिळते, म्हणून साखर कारखाना व्यवस्थापनाने या सर्व बाबींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
१५) प्रिसिजन फार्मिंग (सुधारित पद्धतीने पिकाला हवे तेवढेच वापरून शेती करणे महत्वाचे) :
ऊस पिकाला अन्नद्रव्य जास्त लागत असल्यामुळे जमिनीची तपासणी करून जेवढी गरज आहे तेवढीच अन्नद्रव्ये देणे जरुरीचे आहे. आपणास उत्पन्न किती घ्यावयाचे आहे आणि जमिनीत किती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, याचे गणित करून अन्नद्रव्य ठिबक सिंचन संचातून दिल्यास अपेक्षित उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे जेवढी गरज आहे तेवढेच पाणी ठिबक संचातून दिल्यास पिकाची वाढ चांगली होऊन, अपेक्षित उत्पन घेता येते. यासाठी स्मार्टफोनचा वापर करता येतो.
ऊस शेतीमध्ये शाश्वत आणि अधिक उत्पन्न, तसेच अधिक फायदा घ्यायचा असेल, तर वर उल्लेख केलेल्या सर्व १५ बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. हे मी केवळ तज्ज्ञ म्हणून नव्हे, तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणून स्वअनुभावातून सांगत आहे आणि त्यासाठी आग्रह धरत आहे.
धन्यवाद इतकी चांगली माहिती दिल्या बद्दल ऊस लागवड पद्धत आणि योग्य नियोजन उसाचे चांगले उत्पादन मिळून देते. ऊस लागवड करताना वरील माहितीचा भरपूर फायदा झाला.