जे. कृष्णमूर्ती

आज रविवार, मे ११, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक २१, शके १९४७
सूर्योदय : ०६:०५ सूर्यास्त : १९:०४
चंद्रोदय : १८:०४ चंद्रास्त : ०५:३१, मे १२
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : चतुर्दशी – २०:०१ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – पूर्ण रात्रि पर्यंत
योग : व्यतीपात – ०५:०१, मे १२ पर्यंत
करण : गर – ०६:४६ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:०१ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : १७:२७ ते १९:०४
गुलिक काल : १५:५० ते १७:२७
यमगण्ड : १२:३५ ते १४:१२
अभिजित मुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १७:२१ ते १८:१३
अमृत काल : २०:२२ ते २२:१०
वर्ज्य : ०९:३४ ते ११:२२
|| हिरण्य कश्यपू जगी मातले | धर्मावरती घालती घाले |
| निर्दालण्या त्या नरसिंहाचा | होऊ दे अवतार ||
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला असे मानले जाते.
विष्णूंनी हिरण्यकश्यपूवर क्रोध करत हा अवतार घेतला होता, तसेच क्रोधामुळे नृसिंहाचे शरीर जळतं म्हणून त्यांना थंड वस्तू अर्पित केल्या जातात. वेगवेगळे नैवेद्य दाखवल्याने वेगवेगळ्या प्रकाराचे फल मिळतं.
नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.
आज नृसिंह जयंती आहे.
तसेच आज मदर्स डे आहे.
आदि ( आद्य ) शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्कार केला. इ.स.च्या आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुर्न:स्थापना केली.
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.
या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (वेद, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.
आदि शंकराचार्य यांचा कैलास गमन दिन आहे.
|| अणु युध्दाची नौबत वाजे | भारत देशा सज्ज करू ||
१९९८: २४ वर्षांनंतर (१९७४ – पहिली अणुचाचणी ) भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.
आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे.
“ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे” म्हणजे ध्यान – जे. कृष्णमूर्ती .
ध्यानाकडे कृष्णमूर्तींनी महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी असे त्यांचे मत होते. खरे ध्यान म्हणजे “विचारांचा अंत” जो “काळापलीकडे…वेगळ्या मितीत” घेऊन जातो असे कृष्णमूर्तींचे मत होते.
जिद्दू कृष्णमूर्ती ( जे. कृष्णमुर्ती )हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते.
त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता : मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा – मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो – घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले.
पौगंडावस्थेत असतानाच तत्कालीन मद्रासमधील अड्यार इथे असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्यालयात विख्यात गूढवादी व उच्च कोटीचे ईश्वरविद (थिऑसफिस्ट) चार्ल्स वेब्स्टर लेडबीटर यांच्याशी कृष्णमूर्तींची भेट झाली. त्यानंतर अॅनी बेझंट व लेडबीटर या सोसायटीच्या तत्कालीन नेत्यांच्या देखरेखीखाली कृष्णमूर्ती वाढले. विश्वगुरू पदासाठी कृष्णमूर्ती लायक उमेदवार आहेत, अशी या नेत्यांची खात्री होती. नवयुवक कृष्णमूर्तींनी मात्र ही संकल्पना नाकारली आणि या संकल्पनेच्या समर्थनासाठी उभारलेल्या जागतिक संस्थेचे (दी ऑर्डर ऑफ द स्टार) त्यांनी विसर्जन केले. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म वा तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या-मोठ्या गटांशी चर्चा करण्यात व्यतीत केले.
त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम, दी ओन्ली रेवल्युशन आणि कृष्णमूर्तीज् नोटबुक यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी १९८६ मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले. त्यानंतर महिनाभरात ओहाय (कॅलिफोर्निया) येथे त्यांचा मृत्यू झाला.
कृष्णमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत आहेत.
१८९५ : भारतीय तत्त्वज्ञानी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म ( मृत्यू : १७ फेब्रुवारी, इ. स. १९८६)
ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. त्यांचे पती श्री केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली.
आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के. नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनीही भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते.
’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणार्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
१९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट, २००१)
- घटना :
१५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.
१८११: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४)
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
१८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.
१८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
१८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
१९४९: इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.
१९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
१९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले.
१९९९: टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.
• मृत्यू :
२००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्म: २७ मे, १९१३)
२००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर, १९१५)
- जन्म :
१९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी, १९५५)
१९५०: अभिनेता गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर, २०१४)