शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन उसाला एकरकमी एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, पीक विमा व शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यात यावी यांसह अन्य प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम काही बँक अधिकारी परस्पर वळती करून घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यापुढे असे करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याची माहितीही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी दिली.
रविकांत तुपकर म्हणाले, सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप पूर्ण केलेले नाही. येत्या पंधरा- वीस दिवसांत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले जाईल आणि मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत शेतकरी मतदानही करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झालाआहे. खरिपाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, कोअर कमिटीचे सदस्य राजेंद्र मोरे, सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, प्रज्योत हुडे, बाळासाहेब जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.