‘पंचगंगा’ची निवडणूक बिनविरोध, विरोधक कोर्टात आव्हान देणार

कोल्हापूर : अर्ज माघारीच्या दिवशी ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून २४ उमेदवारांपैकी १२ जणांनी माघार घेतल्यानंतर, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२०३० सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.
संचालकांच्या एकूण १७ जागांसाठी पी. एम. पाटील गटाचे १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली.
‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून चारपैकी दोन महिलांनी माघार घेतली. तसेच ‘ब’ वर्ग व्यक्ती सभासदांतून सहापैकी पाच जणांनी व ‘ब’ वर्ग संस्था सभासदांतून सहापैकी पाच जणांनी माघार घेतली. तर ‘अ’ वर्ग उत्पादक अनुसूचित जाती/ जमाती मतदारसंघातून भूपाल लक्ष्मण मिसाळ यांचा एकमेव अर्ज छाननीवेळी राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले होते.
संचालक पुढीलप्रमाणेः ‘अ’ वर्ग उत्पादक गटः पी.एम.पाटील (कबनूर), कुमार भूपाल खुळ (रुई), प्रताप ऊर्फ बाबा शामराव पाटील (शिरोळ), रावसाहेव बापू भगाटे (नांदणी), प्रताप नाथा नाईक (घालवाड), प्रकाश बाळकू खोबरे (तारदाळ), प्रमोद पिरगोंडा पाटील (कबनूर), महावीर श्रीकांत चौगुले (माणकापूर), बाबासाहेब आण्णासाहेब पाटील (हसूर), विशाल रघुवीर आवटी (अकिपाट), संजय तात्यासाहेब देसाई (सदलगा), बापू भागोजी मोटे (पट्टणकोडोली),
‘अ’ वर्ग उत्पादक महिला गटः रंजना लक्ष्मण निंबाळकर (हेरले), शोभा रावसाहेब पाटील (नेज).
‘ब’ वर्ग व्यक्ती गटः संतोष विश्वंभर महाजन (माणगाव).
‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी- धनगोंडा बाळगोंडा पाटील (कोथळी).
अनुसूचित जाती वर्ग उत्पादक – भूपाल लक्ष्मण मिसाळ (घोसरवाड)
पाच नवीन चेहऱ्यांना संधी
- कारखान्याच्या या पंचवार्षिक निवडणुकीत महावीर चौगुले, बाबासो पाटील, विशाल आवटी, संजय देसाई, बापू मोटे या नवीन पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर उपाध्यक्ष जयपाल कुंभोजे, एम. आर. पाटील, सुनील तोरगल या तीन विद्यमान संचालकांनी माघार घेतली. पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचवार्षिक निवडणुकीत पाचव्यांदा त्यांना यश मिळाले.
कोर्टात आव्हान देणार – रजनीताई मगदूम :
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटिल संगनमताने विरोधकांचे अर्ज बाद केल्याचा आरोप कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी हातकणंगले येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. पंचगंगा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर झाला. त्यानुसार विरोधी गटाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. मात्र, सत्ताधारी गटाने प्रशासनाला हाताशी धरून संगनमत करून विरोधी गटाचे अर्ज कसे अपात्र ठरतील, याचेच प्रयत्न केल्याचा आरोपही मगदूम यांनी केला.
रजनीताई मगदूम म्हणाल्या, ‘उमेदवार सूचक, अनुमोदक, ऊस नसणे, सभेला गैरहजरी, करारपत्र नसणे, थकबाकीदार असल्याबाबत अशा अयोग्य सबबी पुढे करून मगदूम गटाचे सर्वच अर्ज बाद केले गेले. राज्यघटनेवर ज्यांची सही आहे, त्याच देशभक्त रत्लाप्पाण्णांच्या नावाने असलेल्या साखर कारखान्यामध्ये नैसर्गिक विधितत्त्वांना तिलांजली देऊन विद्यमान संचालक मंडळाने शासकीय अधिकाऱ्यांना सामील करून आपल्या स्वार्थांसाठी शेतकरी, सभासद, कामगार यांच्या अधिकाराचे हनन केले आहे. अशा अन्यायकारक छाननी प्रक्रियेचा निषेध करून विरोधी गटाच्या तीन उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला असून छाननी प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’
पत्रकार परिषदेस पुंडलिक जाधव, अशोक पाटील, रायगोंडा पाटील, आण्णासाहेब शहापुरे, रमेश चौगुले, शोभा कोळी, मिलिंद कोले, सुकुमार गडगे, बावगोंडा पाटील, महादेव कुंभार इ. उपस्थित होते