*समृद्धी* शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याचा अभिमान : घाटगे

जालना : घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविला जातो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सोमवारी सांगितले. तसेच समृद्धी कारखान्याकडून पहिला हप्ता २५०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे अदा केला आहे. लवकरच २०० रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने गाळप झालेल्या उसाला एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे अंतिम बिल दिले. तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये देखील कारखान्यात गाळप झालेल्या उसाला उच्चांकी दर दिला आहे. दरम्यान, २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मेट्रिक टन भाव देण्याची घोषणाही समृद्धी साखर कारखान्याने चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (ता. २६) केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने ऊस उत्पादक, सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.