मुकादमांकडून 446 कोटींचा गंडा – राजू शेट्टी

चौकशीसाठी पोलिस महासंचालकाना निवेदन
मुंबई – राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी मजूर पुरवठा करत असताना १० हजार हून अधिक मुकादमाकडून गेल्या दोन वर्षात ४४६ कोटी रूपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोटयावधी रूपयाचा गंडा या मुकादमाकाकडून घालण्यात येत आहे. यामुळे फसवणूक करणा-या मुकादम यांचेवर तातडीने कारवाई करून त्यांना शोधण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने राजू शेटटी यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनी सेठ यांचेकडे केली.
ऊसाचा गळीत हंगाम सुरू होत असताना दरवर्षी ऊस तोडणी करण्यासाठी एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देण्याकरिता १० ते १५ लाख रूपयाचा अॅडव्हान्स मुकादमाकाकडून घेतला जात आहे. सदर मुकादम एका टोळीसाठी तीन ते चार वाहनधारकाकडून अॅडव्हान्स घेऊन एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देतात व उर्वरित वाहनधारकांची अॅडव्हान्स घेऊन फसवणूक करतात .राज्यात हजारो वाहनधारक या फसवणुकीचे बळी पडले असून अनेक वाहनधारकांनी यामुळे आत्महत्या करू लागले आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे.
याबाबत वाहनधारकांच्यावतीने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . माञ राजकीय वरदहस्त व गुंडागर्दी यामुळे संबंधित मुकादमावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून राज्यातील ऊस वाहतूकदार मोठया आर्थिक संकाटात सापडू लागला आहे .
वसुलीसाठी गेलेल्या वाहनधारकांना मारहाण , विनयभंग ,दरोडा , यासारख्या खोटया गुन्हयात अडकविण्यात आलेले आहे .दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालल्याने यावर तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस प्रमुखांना सुचना दिल्या. दरम्यान ज्याठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत त्या मुकादमांच्या शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश दिले.
यावेळी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार , संदीप राजोबा , प्रविण शेट्टी , शिवाजी पाटील , रावसाहेब अबदान , आनंदा फराकटे , युवराज माळी , श्रीकृष्ण पाटील , दादासो पाटील , गणेश गावडे , धन्यकुमार पाटील , विनोद पाटील यांचेसह पदाधिकारी ऊपस्थित होते.
[…] […]