साखर उत्पादन गाठणार गेल्या हंगामाची पातळी

पुणे : राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. मार्चअखेर हंगाम संपून १०५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. २२-२३ च्या हंगामातही १०५ लाख टन एवढेच उत्पादन झाले होते.
कमी पाऊस आणि अन्य कारणांमुळे यंदा महाराष्ट्रात साखर उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी घटेल, असा अंदाज प्रारंभी वर्तवण्यात आला होता. मात्र तो चुकल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामागे मध्यंतरी झालेला पाऊस असल्याचे मानण्यात येत आहे.
राज्यात आतापर्यंतचे विक्रमी १३७ लाख टन साखर उत्पादन २०२१-२२ च्या हंगामात झाले होते. २०२२-२३ मध्ये त्यात ३५ लाख टनांची घट झाली. यंदा म्हणजे २०२३-२४ मध्ये ते गतवर्षी एवढेच म्हणजेच १०५ लाख टन राहणार आहे.
साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्चअखेर राज्यातील १०३ खासगी आणि १०४ सहकारी, अशा २०७ साखर कारखान्यांनी दिवसाला सरासरी साडेआठ ते नऊ लाख टन क्षमतेने ९८६.५२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.१४ टक्के साखर उताऱ्याने १०० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदाच्या हंगामात सुरू झालेल्या २०७ कारखान्यांपैकी ४३ कारखान्यांनी आपला हंगाम संपविला आहे.
साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने २६ लाख टन उत्पादनासह आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल पुणे विभागात २१ लाख टन, सोलापूर विभागात १९ लाख टन, नगर विभागात १२ लाख टन, छत्रपती संभाजीनगर आठ लाख टन, नांदेड विभागात ११ लाख टन, अमरावती विभागात आठ हजार टन आणि नागपूर विभागात दोन हजार टन साखर उत्पादन झाले आहे. ऊसगाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.
राज्यातील यंदाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्याकडे झुकला असून, आजअखेर ९८६ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर, १०.१४ टक्के उताऱ्यानुसार १०० लाख टन साखर उत्पादन हाती आले आहे. केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाच्या धोरणात बदल केल्यानंतर राज्यात साखर उत्पादन वाढण्यास मदत झाल्याचे चित्र आहे. अद्यापही दोन ते तीन लाख टनांनी साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अद्यापही १६४ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. कारखान्यांकडून पूर्णक्षमतेने ऊस गाळप सध्या होत नसून, ऊस टोळ्यांच्या उपलब्धतेनुसार शेवटच्या टप्प्यातील ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे राज्यात काही मोजक्याच साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम १० एप्रिलपर्यंत चालण्याचा अंदाज साखर वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. साखर आयुक्तालयाच्या हंगामाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार ८८ लाख टन साखर उत्पादन, इथेनॉलकडे वळणारी १५ लाख टन साखर मिळून १०३ लाख टनाचा अंदाज होता. इथेनॉल धोरण बदलल्याने चित्र बदलून साखर उत्पादनात अपेक्षेनुसार वाढ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्र सरकारने उसाचा रस, शुगर सिरपपासून आणि बी हेवीपासून इथेनॉल उत्पादनाला बंदी घातली आहे. सी हेवीपासून इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यात वाढ होण्यावर झाला आहे. तर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काही भागांत झालेल्या पावसाचा चांगला परिणाम म्हणून उसाच्या उत्पादकतेत वाढ होऊन साखर उत्पादन वाढल्याचे दिसून येते. आणखी २ ते ३ लाख टन म्हणजे राज्यात हंगामअखेर एकूण १०३ लाख टनाच्या आसपास साखर उत्पादन होईल, असे राज्य साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी सांगितले.