ऊस गाळपात ५० लाख टनांची घसरण
१०० टक्के एफआरपी देणाऱ्या कारखान्यांची संख्या यंदा वाढली
(पाक्षिक आढावा)
पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये अधिकाधिक एफआरपी रक्कम देणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. साखर आयुक्तांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ९४ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा केली आहे. मात्र एकूण एफआरपी रक्कम तुलनेत (या तारखेपर्यंत) एक हजार कोटींनी कमी भरली आहे.
गत हंगामात १५ डिसेंबर २०२२ पर्यंत ६९ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी रक्कम दिली होती. त्यावेळी १८९ कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा आतापर्यंत १९४ कारखान्यांचे गाळप सुरू झालेले आहे.
दुसरीकडे ऊस गळिताचे प्रमाण मात्र गतवर्षीच्या तुलनेत खूपच घटले आहे. गेल्या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत २३६ लाख मे. टन ऊस गाळप झाले होते. यंदा याच तारखेपर्यंत अवघे १८६ लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. म्हणजे सुमारे ५० लाख मे. टनांची घसरण झाली आहे.
त्यामुळे एकूण एफआरपीची रक्कमही यंदा कमी आहे. गेल्या हंगामात १५ डिसेंबर पर्यंत सुमारे ४३१२ कोटी रुपयांची एफआरपी रक्कम देण्यात आली होती, यंदा हा आकडा ३३२७ कोटींपर्यंत आहे. म्हणजे सुमारे हजार कोटींची घसरण आहे.
गाळपाची कमी ऊस असल्याने यंदाचा हंगाम अपेक्षापेक्षाही लवकर संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
(टीप : एफआरपीचे आकडे १५ डिसेंबरपर्यंत आणि गाळप आकडे ३० नोव्हेंबरपर्यंतचे आहेत.)