मुकादमांची मनमानी, ९ जानेवारीला मुंबईत बैठक होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नागपूर : ऊसतोडणीबाबत मुकादमांकडून होणारी कथित मनमानी आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालक-मालकांना होणारा त्रास आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या ९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेण्याची घोषणा सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आमदार विनय कोरे लक्षवेधी मांडली. त्यावर सावे बोलत होते.

MLA Vinay Kore
Vinay Kore, MLA – File Image

गृह विभागाचे प्रतिनिधी बैठकीमध्ये असतील. यावेळी या प्रश्नावर काय उपाय करता येईल याबाबत चर्चा केली जाईल. मुकादम, ऊसतोड कामगार आणि कारखाना या तिघांचे प्रतिनिधीही बैठकीसाठी बोलावू. गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या माध्यमातूनच आपण ऊसतोड कामगार घेतल्यास नियंत्रण येईल. त्याचे अॅप तयार होत आहे. त्या ॲपच्या माध्यमातून लवकरात लवकर एखाद्या टोळीशी करार झाल्यास तो दुसरीकडे करू शकणार नाही असे अशा पद्धतीने त्यामध्ये अंमलबजावणी करण्यास सांगू, असे सावे म्हणाले.

कोरे यांनी राज्य सरकारकडे एकत्रितपणे मार्ग काढण्याची विनंती केली. मुकादमांच्या मनमानीविरोधात सगळ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात आपण व्यवस्था बनवू शकलो नाही, तर या गरीब माणसांचा सगळा उद्योग उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार कोरे यांनी लक्षवेधी मांडताना नमूद केले.

साखर कारखानासाठी ऊस वाहतुकीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मुकादमांनी करार केले, पण लाखो रुपये बुडवून हे लोक पळून गेले.

हा केवळ सहकार खात्याचा विषय नाही. गृह मंत्रालय म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था खाते, कामगार खाते आदी संबंधित खात्यांनी एकत्र येऊन तातडीने मार्ग काढायला हवा, अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसेल, असेही आमदार कोरे म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »