राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

आवडल्यास ही बातमी शेअर करा

 पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल उपस्थित झाला आहे.

 त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत उमेदवारांचा निळकंठेश्वर पॅनेल निवडणूक लढवत आहे. हा पॅनेल आपण सर्वांनी स्वीकारायचा आणि जिंकून आणायचा. या पॅनलमध्ये सर्व उमेदवार माझेच आहेत. यापुढील प्रचार काळात कोणीही नाराज व्हायचे नाही. अजितदादांसह सर्व पॅनेल शंभर टक्के निवडून आणायचा निर्धार करायचा आहे,” असे आवाहन ‘माळेगाव’चे विद्यमान चेअरमन अॅड. केशवराव जगताप यांनी केले आहे.

माळेगाव निवडणुकीत २१ जागांसाठी चौरंगी लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी कायम राहिली. या निवडणुकीत अजित पवारांचे श्री. निळकंठेश्वर पॅनेल, चंद्रराव व रंजनकुमार तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती व अपक्ष यांचे पॅनेल असे चार पॅनेल आमनेसामने आहेत. शुक्रवारी सायंकाळी चौथ्या पॅनेलचे उमेदवार जाहीर करण्यात आले.

अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये विद्यमान अध्यक्ष अॅड. जगताप यांचेही निळकंठेश्वर पॅनेलमध्ये नाव नसल्याचे स्पष्ट झाले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निळकंठेश्वर पॅनेलमध्ये इच्छुकांची नाराजी अधिक होती, सर्वजण तेवढ्याच तोलामोलाचे होते, परंतु संबंधितांना मर्यादित जागांमुळे नाइलाजास्तव थांबावे लागले’’, असा खुलासा ॲड. जगताप यांनी केला आहे…

 अजितदादांच्या ताब्यात अनेक सहकारी संस्था अथवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यापुढील काळात शक्य तितक्या इच्छुकांना त्या संस्थांवर संधी देण्याचा प्रयत्न होणार आहे. बारामती तालुक्यासह ‘माळेगाव’चा सर्वांगीण विकास अधिक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी निळकंठेश्वर पॅनेल बहुमतांनी निवडून आणणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

मीच चेअरमन

“माळेगाव कारखान्याची प्रगती पुढील पाच वर्षांत दृष्ट लागण्यासारखी होईल. कारखान्याच्या पैशांची बचत करून सभासदांना राज्यातील सर्वोच्च भाव देण्याचा माझा प्रयत्न असेल. अजित पवार हेच आगामी पाच वर्षे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत जाहीर केले.

बारामतीत शनिवारी नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ झाला, त्याप्रसंगी त्यांनी आपणच पुढील पाच वर्षे या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळणार असल्याची घोषणा करत विरोधकांच्या प्रचारातील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. पुढील पाच वर्षे राज्यातील चांगला भाव दिला नाही तर अजित पवार नाव सांगणार नाही, अजित पवार या चेहऱ्याकडे बघून सभासदांनी मतदान करावे, गटतट विसरुन जात कारखान्याच्या सर्वांगिण विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या भाषणात चंद्रराव तावरे यांचा नामोल्लेख टाळून अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “प्रचारासाठी मुद्दे नसल्याने काहीही बरळू लागले आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी मी राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी आणला त्या संस्था मी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातो. पोती भिजलेली नसतानाही ती भिजली म्हणून सांगितले जाते, कर्जच नसताना कर्जाची आकडेवारी दिली जाते. समोरासमोर येऊन चर्चा करा ना.”

शरद पवार समर्थकांचा बळीराजा पॅनल

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समर्थकांनी बळीराजा सहकार पॅनल तयार केला असून, त्याच्या प्रचाराचा शुभारंभ खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाला.

पवारसाहेबांनीही सुरुवातीपासूनच सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सहकारी साखर कारखानदारीला चालना दिली. साखर निर्मितीबरोबर डिस्टलरीसारख्या उपपदार्थ निर्मितीला शासन स्तरावर प्रोत्साहन दिले आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला, असे प्रतिपादन सुळे यांनी केले.

यावेळी युवा नेते युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे, भगतसिंग जगताप, सोपानराव आटोळे, ज्ञानदेव बुरुंगले, गणपत देवकाते, मिथून आटोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणल्या, “बारामतीकर आणि पवार यांचे नाते खूपच प्रेमाचे आणि आपुलकीचे आहे. माळेगाव कारखान्याचे सभासद मीदेखील आहे. माझ्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे आणि संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे, ही माझी व सभासदांची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे यापुढील काळात हा माळेगाव कारखाना व येथील शिक्षण संस्था उत्तम चालण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कारभार पारदर्शक होईल व कामगार भरतीमध्येही समतोल राहील. नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मार्गी लावेल.”

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीला कधी नव्हे एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही शाखांनी (गट) निवडणुकीला मोठे महत्त्व दिले आहे. अजितदादांनी तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्र्यांनी उतरण्याची ही पहिलीच वेळ असावी.

लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासून बारामतीच्या राजकारणावरील पकड आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चबांधणी केली. विधानसभा निवडणुकीत त्यांची रणनीती चांगलीच यशस्वी ठरली. मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्था आणि तालुक्यातील, तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर आपलेच वर्चस्व राहावे, या इर्षेने अजितदादा पेटले आहे. त्यातूनच राज्याचे महत्त्वाचे अर्थखाते आणि उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी असताना, त्यांना माळेगावच्या चेअरमनपदाची राजकीय भुरळ पडल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन स्वतंत्र राजकीय शाखा झाल्यानंतर, आपली ताकद कमी होऊ नये दोन्ही शाखा इरेला पेटल्या आहेत. त्यामुळेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला अभूतपूर्व महत्त्व आले आहे. त्यात छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यामुळे अजितदादांचा आत्मविश्वास वाढला आहे. माळेगावात त्यांना तावरे गुरू-शिष्य जोरदार टक्कर देत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »