‘श्री विघ्नहर’ चा विस्तारित इथेनॉल प्रकल्प यंदापासून पूर्ण क्षमतेने चालणार

वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा महत्त्वाकांक्षी विस्तारित इथेनॉल प्रकल्प गेल्याच हंगामात पूर्ण झाला असून, यंदापासून (हंगाम २०२३-२४) संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहणार आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.
कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट रोजी, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यावेळी चेअरमन शेरकर हे उपस्थित सभासद शेतकरी बांधवांना संबोधित करत होते. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास झालेल्या उसाची एफआरपीनुसार २ हजार ७५० रुपये प्रति टनाप्रमाणे बिले अदा केली असून, उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

बदलत्या काळाबरोबर सर्वांनी बदलले पाहिजे, तसेच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, ‘विघ्नहर’ची स्मार्ट शेतकरी कार्ड, स्मार्ट एम्प्लॉयी कार्ड, स्मार्ट ट्रान्सपोर्टर कार्ड ही योजना महाराष्ट्रातील पहिली संगणकीकृत योजना आहे, असेही शेरकर यांनी सांगितले.
सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ‘विघ्नहर’चे संस्थापक अध्यक्ष स्व. निवृत्तीशेठ शेरकर व माजी अध्यक्ष स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विषयपत्रिकेवर विषय कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी वाचून दाखवले, ते सर्व विषय उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूर केले.
कामकाजाविषयी बोलताना अनेक सभासदांनी अध्यक्ष शेरकर व संचालक मंडळाचे भरभरून कौतुक केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष शेरकर यांनी उत्तरे दिली. हंगाम २०२२- २३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आदींचा यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. एकरी १०७ टन उत्पादन घेणाऱे शेतकरी ऋषिकेश माणिकराव हिंगे यांचाही सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष अशोक घोलप आभार मानले..