भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत भारताने साखर निर्यात केलेल्या देशांमध्ये सोमालिया, श्रीलंका, लिबिया, जिबूती, संयुक्त अरब अमिराती, टांझानिया आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
चालू आर्थिक वर्षात झालेल्या निर्यातीपैकी, सर्वाधिक ५१,५९६ टन साखर सोमालियाला , ४८ हजार ८६४ टन अफगाणिस्तानला, श्रीलंकेला ४६ हजार ७५७, तर ३० हजार ७२९ टन साखर लिबियाला पाठवण्यात आली आहे.
भारताने जिबूतीला २७ हजार ६४ टन, संयुक्त अरब अमिरातीला २१ हजार ८२४ टन, टांझानियाला २१ हजार १४१ टन, बांगलादेशला ५ हजार ५८८ टन आणि चीनला ५,४२७ टन साखरेचा निर्यात केली आहे, असे ‘एआयएसटीए’ने स्पष्ट केले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ‘एआयएसटी’ ने सांगितले की, भारतातून साखरेची निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचा परिणाम साखरेच्या किमतींवर दिसून यावा, कारण इथेनॉल हे वाहतूक इंधनात एक प्रमुख घटक आहे.