कृष्णराव फुलंब्रीकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, जानेवारी २०, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष


युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज पौष ३०, शके १९४४
सूर्योदय : ०७ :१५ सूर्यास्त : १८ :२४
चंद्रोदय : ०६ :४३, जानेवारी २१ चंद्रास्त : १६ :४४
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी – ०९ :५९ पर्यंत
क्षय तिथि : चतुर्दशी – ०६ :१७, जानेवारी २१ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १२ :४० पर्यंत
योग : व्याघात – १८ :५७ पर्यंत
करण : वणिज – ०९ :५९ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि – २० :१० पर्यंत
क्षय करण : शकुनि – ०६ :१७, जानेवारी २१ पर्यंत
सूर्य राशि : मकर
चंद्र राशि : धनु
राहुकाल : ११ :२६ ते १२ :४९
गुलिक काल : ०८ :३८ ते १० :०२
यमगण्ड : १५ :३७ ते १७ :०१
अभिजित मुहूर्त : १२ :२७ ते १३ :१२
दुर्मुहूर्त : ०९ :२९ ते १० :१३
दुर्मुहूर्त : १३ :१२ ते १३ :५६
अमृत काल : ०५ :२८, जानेवारी २१ ते ०६ :५२, जानेवारी २१
वर्ज्य : ११ :१५ ते १२ :४०
वर्ज्य : २१ :०४ ते २२ :२८

नट व गायक कृष्णराव फुलंब्रीकर-

आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘एकच प्याला’ यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.

गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. ‘सावित्री’, ‘मेनका’, ‘आशा-निराशा’, ‘अमृतसिद्धी’, ‘संगीत कान्होपात्रा’ यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.

मास्तर कृष्णरावांनी ‘धर्मात्मा’, ‘वहाँ’, ‘गोपाळकृष्ण’, ‘माणूस’, ‘अमरज्योती’, ‘शेजारी’ यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले.

त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या ‘वसंतसेना’ चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या ‘कीचकवध’ चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी ‘भक्तीचा मळा’ व ‘मेरी अमानत’ चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले.

त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे.

ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले ‘झिंजोटी’ रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे ‘वंदे मातरम्’ वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

‘वंदे मातरम्’ हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

नेहरूंनी आधीच ‘जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत (NATIONAL ANTHEM) म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु ‘वंदे मातरम्’ ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (NATIONAL SONG) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.

या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
१८९८ : नट व गायक कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्म. (मृत्यू : २० ऑक्टोबर , १९७४)

उद्योजक – कस्तुरभाई लालभाई-

भारतातील एक प्रसिद्ध दानशुर उद्योगपती. अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात ते शिक्षण घेत असताना १९१२ साली अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि शिक्षण अर्धवट टाकून ‘रायपूर मॅन्युफॅक्चरिंग कं. लि.’ या कुटुंबाच्या मालकीच्या कापड उद्योगाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागली.

त्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाखाली रायपूर कापडगिरणीची प्रगती चालू राहिली. कापसाचा दर्जा ओळखण्याचे उपजत ज्ञान त्यांना होते आणि कापूस पिकविणाऱ्या प्रदेशांना स्वतः भेटी देऊन उत्तम कापूस खरेदी करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. १९२० साली ‘अशोक मिल्स लि.’ आणि १९३० मध्ये ‘अरविंद मिल्स’ या आणखी दोन कापडगिरण्या त्यांनी स्थापन केल्या.

दरम्यान १९२४ साली डबघाईला आलेली ‘सारसपूर मिल्स लि.’ ही कापडगिरणी त्यांनी ताब्यात घेतली आणि १९२८ मध्ये ती नव्याने सुरू केली. ‘अरूणा’, ‘नूतन’, आणि ‘अहमदाबाद न्यू कॉटन मिल्स’ या आणखी तीन कापड उद्योगांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आले.
‘अनिल स्टार्च प्राडॅक्ट्स’ कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे निर्माण करणारी ‘अमित प्रॉडक्ट्स’ रंग, रसायने तयार करणारे बलसाड येथील ‘अतुल प्रॉडक्ट्स’ या सर्व कंपन्या कस्तुरभाईंच्या कुशल नेतृत्वामुळे लवकरच नावारूपाला आल्या.

ऐन तारुण्यात त्यांचा महात्मा गांधी, सरदार पटेल आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांशी संबंध आला. भांडवलदार हे संपत्तीचे केवळ विश्वस्त आहेत, या गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या जीवनावर खोल परिणाम झाल्याचे दिसते.
कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवाद नेमण्याचा ते आग्रह धरीत. आपल्या कारखान्यांत त्यांनी कामगारकल्याणासाठी सरकारी संस्था काढल्या, कारकून वर्गासाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली आणि पाळणाघरे सुरू केली. त्या वेळी तशी कायदेशीर तरतूद नसतानाही त्यांनी ते केले हे महत्त्वाचे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून ते १९३७ मध्ये निवडून आले आणि त्या पदावर १९४९ पर्यंत राहिले. पुन्हा याच बँकेवर त्यांनी संचालक म्हणून १९५७ ते १९६१ पर्यंत काम केले. अनेक संस्थांची अध्यक्षपदे कस्तुरभाई ह्यांनी भूषविली.

‘अहमदाबाद मिलओनर्स असोसिएशन’ (१९३३-३५), ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (१९३४-३५), ‘इंडियन कॉटन मिल्स फेडरेशन’ (१९५६-६०) ह्या त्यांपैकी काही महत्त्वाच्या संस्था होत. कैरो येथील आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेस (१९४३) ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या बैठकांना ते भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून आवर्जून जात असत.

सार्वजनिक कामाची त्यांना मनापासून आवड होती. गुजरातमध्ये १९१८ पासून ज्या ज्या वेळी दुष्काळ पडत असे, त्या त्या वेळी स्वतः पुढे होऊन ते निधी उभारीत. ‘गांधी मेमोरियल फंड’चे ते अध्यक्ष होते. १९३७ साली स्थापन झालेल्या ‘अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी’चे ते प्रारंभापासून अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे विविध ज्ञानशाखांची महाविद्यालये उघडण्यासाठी त्यांनी स्वतः लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या, तसेच गुजरात विद्यापीठाची भव्य वास्तु बांधण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला.

भारत सरकारच्या प्रत्यक्ष कर सल्लागार समितीचे ते सदस्य होते. पंचवार्षिक योजनांचा पाठपुरावा करताना खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत श्रम घेतले. १९६८ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अहमदाबाद येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.
• १९८० : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म : १९ डिसेंबर, १८९४)

घटना :
१७८८ : इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१८४१ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९३७ : फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
१९४४ : दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.

१९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
२०१९ : जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाजो नोनाका यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ११३ वर्षांचे होते. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. मसाजो यांचा जन्म २५ जुलै १९०५ रोजी झाला होता.

जन्म :
१८६१ : मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू : ३० जानेवारी , १९४८)
१८७१ : टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू : ५ सप्टेंबर, १९१८)
१८८९ : महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.

मृत्यू :
• १९५१ : समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म : २९ नोव्हेंबर१८६९)

आपला दिवस मंगलमय जावो

मनोहर नामदेव वानखडे (जन्मः २० जानेवारी १९२४; निधनः १ मे १९७८)

व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्‌मयीन-सांस्कृतिक चळवळींचे द्रष्टे नेते. अमरावती जिल्ह्यातील थुगाव येथे त्यांचा जन्म झाला. शालेय व महाविद्यालयीन जीवनात कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. इंग्रजी हा विषय घेऊन १९४५ साली ते बी.ए. झाले. इंग्रजीत सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल त्यांना ‘माधवराव चांदोडकर सुवर्णपदक’ देण्यात आले.

१९४५ – ४७ ह्या काळात भारत सरकारची शिष्यवृत्ती (गव्हर्न्‌मेंट ऑफ इंडिया ओव्हरसीज स्कॉलरशिप) मिळवून ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेले. तथापि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे तेथील अभ्यासक्रम ते पूर्ण करू शकले नाहीत. १९५० साली ते एम्. ए. झाले. १९५१ ते १९६२ ह्या कालखंडात औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. इंग्रजीचे ते विभागप्रमुखही होते.

त्याच-प्रमाणे १९५८– ६२ ह्या काळात मिलिंद कला महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. १९६२ साली फुलब्राइट-स्मिथ-मड् शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. अमेरिकेतील विद्यापीठांतून त्यांनी इंग्रजीचे अध्यापनही केले.

त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात ⇨ वॉल्ट व्हिटमन ह्या अमेरिकन कवीवरील भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव, या विषयावर त्यांनी संशोधन केले. १९६३ साली ए.एम्. व १९६५ साली त्यांनी पीएच्.डी. मिळविली. १९६६ मध्ये ते पुन्हा मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी आले व इंग्रजी विभागप्रमुख म्हणूनही काम पाहू लागले.

मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) कलाशाखेचे अधिष्ठाते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य व अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे तसेच साहित्य अकादमीचेही ते सदस्य होते. अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्यात तेथील गोऱ्या लोकांचे सुखीसमृद्ध जीवन एकीकडे, तर ‘घेटो’ त जखडलेल्या निग्रो लोकांचे बकालपण दुसरीकडे, हे दृश्य त्यांना अंतर्मुख करण्यास कारणीभूत झाले. तेथील निग्रोंच्या वाङ्‌मयीन चळवळीचाही त्यांनी सखेल अभ्यास केला.

मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असताना त्यांनी दलित, उपेक्षित आणि बौद्ध विद्यार्थ्यांच्या व लेखकांच्या अस्मितेला फुंकर घातली. अस्मिता (नंतरचे अस्मितादर्श) हे त्रैमासिक रा. ग. जाधव, गंगाधर पानतावणे,डॉ. म. ना. वानखडे.रायमाने इत्यादींच्या साहाय्याने सुरू केले (१९६७).

दलित साहित्यावरील विविध प्रश्नांची चर्चा त्यातून केली गेली. दलित साहित्याच्या घटनासिद्धीच्या प्रक्रिये-तील १९ व २४ नोव्हेंबर १९६७ रोजी झालेली आद्य चर्चा (‘महाराष्ट्रातील आज उद्याचा सांस्कृतिक संघर्ष आणि वाङ्‌मयीन समस्या’) रा. ग. जाधव, वा. ल. कुळकर्णी, मे. पुं. रेगे आणि म. भि. चिटणीस ह्यांच्यासह त्यांनीच घडवून आणली. विद्रोही साहित्य लिहिण्याची हाक त्यांनी दलित साहित्यिकांना दिली.

वानखडे यांचे अभ्यासपरिपूर्ण, मौलिक व मूलगामी अशा स्वरूपाचे लेखन अनेक ठिकाणी विखुरलेले आहे. मिळवता आलेल्या त्यांच्या सर्व लेखनाचा तसेच त्यांच्या भाषणांचा संग्रह दलितांचे विद्रोही वाङ्‌मय (संपा. वामन निंबाळकर, यशवंत मनोहर) ह्या नावाने प्रसिद्ध झाला आहे (१९८१). दलित साहित्याच्या प्रेरणा, विद्रोहाचे सत्त्व आणि सामर्थ्य, बौद्ध जीवननिष्ठा, निग्रो वाङ्‌मयाची प्रेरकता, दलित मिथ्यकथांची निर्मिती ह्यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील त्यांचे मौलिक विवेचन ह्या संग्रहातून उपलब्ध होते.

तथापि त्यांची वाङ्‌मयदृष्टी केवळ दलित साहित्यापुरतीच मर्यादित नव्हती. टी. एस्. एलियटच्या द वेस्ट लँड ह्या प्रसिद्ध काव्याचे मार्मिक रसग्रहणही त्यांनी केले. दलित साहित्याची चळवळ ही मूलतः सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ असून पारंपारिक भारतीय समाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रक्रियेत ती आघाडीची चळवळ मानली पाहिजे, अशी भूमिका घेऊन दलित साहित्याला त्यांनी एक व्यापक भारतीय संदर्भ प्राप्त करून दिला.

त्याचप्रमाणे दलित हे केवळ बौद्ध वा मागासवर्गीय नसून पिळवणूक झालेले सर्व जे जे श्रमजीवी आहेत, ते सर्व दलिताच्या व्याख्येत समाविष्ट होतात, हा विचार मांडला दलित साहित्य हे माणसाला केंद्रबिंदू मानते, माणसाच्या सुखदुःखांशी समरस होते आणि माणसाला सम्यक क्रांतीकडे घेऊन जाते ते माणसामाणसांत वैरभाव न पसरविता प्रेम पसरविते, ही आपली धारणा असल्याचे त्यांनी सांगितले. जुनी मूल्ये आणि परंपरा ह्यांच्या विरोधात पोटतिडिकेने बंडखोरी केली पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.

भुसावळ येथे १९६७ साली झालेल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे आणि १९७६ साली नागपूर येथे भरलेल्या दलित साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. अमेरिकेतील ह्यूस्टन शहरी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

(केशव मेश्राम.)

अजित डोभाल

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा आज वाढदिवस, जन्मः २० जानेवारी १९४५.

अजित डोवल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करून पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक स्पष्ट संदेश दिला होता. ‘सुशासन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’ हे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशात शांततेचे वातावरण निर्माण करून प्रगतीच्या मार्गात असलेल्या बाह्य आणि अंतर्गत समस्यांवर मात करण्याचा मोदी सरकारचा निर्धार यामधून दिसून आला. केरळ केडरचे IPS अधिकारी असलेले डोभाल हे प्रथमदर्शनी सामान्य सरकारी अधिकाऱ्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या डोळ्यातली अद्भुत जरब आणि ऒठांवरचं गूढ हसू पाहताच समजतं की हे काहीतरी वेगळं पाणी आहे.

भारताचे सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असा लौकिक असलेल्या या नावाभोवती गेल्या ४५ वर्षात गूढतेचं एक अद्भुत वलय तयार झालंय ज्यामध्ये असंख्य कथा गुंफल्या आहेत.. काही वास्तविक, काही अकल्पित तर काही कल्पनातीत!!


डोभाल सर्वप्रथम १९६४ साली प्रकाशात आले ते त्यांच्या मिझोराममधील यशस्वी कामगिरीमुळे. लालडेंगा याच्या नेतृत्वाखालील मिझो नेशनल फ्रंटने ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या आणि सरकारच्या चर्चेचे प्रस्ताव ते सतत फेटाळून लावत होते. डोभाल तिकडे गेले आणि लालडेंगाच्या सहा महत्त्वाच्या साथीदारांना आपल्या बाजूस वळवले.

लालडेंगा नाक मुठीत धरून शरण आला, एवढंच नव्हे तर सरकारच्या सर्व अटी मान्य करून मुख्य प्रवाहात सामील झाला. एकेकाळी अशक्य वाटणारी ही गोष्ट डोभालांनी लीलया साध्य करून दाखवली. सिक्कीमचे भारतातील विलीनीकरणाचे अत्यंत अवघड कामही त्यांनी अगदी अलवार करून दाखवले.

१९७४ साली अणूस्फोट घडवून भारत एक अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यानेही अण्वस्त्रे बनवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू केले. या काळात डोभाल एकदमच गायब झाले. तब्बल ७ वर्षं त्यांचा ठावठिकाणा काही मोजक्या लोकांनाच ठाऊक होता. नंतर समजलं की डोभाल चक्क पाकिस्तानातील लाहोर शहरात रहात होते.

या ७ वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रचंड अडथळे आणले आणि सर्व गुपिते भारतीय गुप्तहेरयंत्रणांना पुरवली. या ७ वर्षात एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतली असती, पण हा महान देशभक्त आपल्या प्राणांची पर्वा न करता हे अतिधोकादायक काम सतत ७ वर्षे करत राहिला. या काळात त्यांनी पाकिस्तानात RAW चे मजबूत जाळे विणले आणि कसलाही पुरावा मागे न ठेवता भारतात परत आले. ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोचली नाही, पण ती सर्व देशांच्या हेरगिरी संघटनांना समजली आणि पाकिस्तानच्या ISI संघटनेची सर्व जगात चांगलीच छी-थू झाली. तेव्हापासून डोभाल हे ISI चे क्रमांक १चे शत्रू बनले.

१९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सुरूवात झाली होती. हा दहशतवादी आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारला पुन्हा एकदा डोभाल यांची आठवण झाली. काश्मीरमधील हा धर्माधिष्ठीत दहशतवादी केवळ शस्त्रबळाने चिरडल्यास तात्पुरते यश मिळेल पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील हे डोभाल यांनी ओळखले आणि एक वेगळीच चाल खेळली. काश्मिरीमधील गावागावातून दहशतवादी संघटनांमधे सहभागी झालेल्या तरुणांवर त्यांनी बारीक नजर ठेवली आणि या तरूणांचा brainwash करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सर्व मार्ग वापरले.

अशा brainwash केलेल्या तरुणांची एक दहशतवादविरोधी संघटना उभी करून त्यांनी पाकप्रणीत दहशतवादास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी बनलेले हजारो तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. पुढे पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि सर्व जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली.

भारतीय सैन्य, BSF, काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षादले यांच्यामध्ये काटेकोर समन्वय साधून डोभाल यांनी एक अत्यंत कार्यक्षमता यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचा success rate ९९% आहे, म्हणजे १०० पैकी ९९ दहशतवादी कारवाया या होण्याआधीच थांबवल्या जातात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे डोभाल याना ‘कीर्तीचक्र’ हा पुरस्कार देण्यात आला.

विशेष म्हणजे हा पुरस्कार फक्त लष्करी अधिकारी अथवा सैनिकांना मिळतो. गेल्या ७० वर्षात हा पुरस्कार मिळालेले डोभाल हे एकमेव पोलिस अधिकारी आहेत.
२००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि डोभालांनी निव्रुत्ती घेतली. पण या काळातही RAW, IB, NIA या संघटनांचे प्रमुख त्यांचे मार्गदर्शक घेतच राहिले.

दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.
भारतातील सामान्य जनतेस डोभाल यांच्याविषयी फारशी माहिती नाही, पण पाकिस्तानी लष्कर, ISI, सर्व राजकीय पक्ष, इतकंच नव्हे तर जनताही डोभाल यांचा प्रचंड तिरस्कार करते.

पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तपत्रात डोभाल यांच्या विरोधातील लेख नियमितपणे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मेडीयामधे त्यांच्याविरोधात गरळ ऒकली जाते, इतकंच नव्हे तर ट्विटरवर अशी शेकडो पेजेस आहेत ज्यावर केवळ डोभालविरोधातील लिखाणच केले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि वजिरीस्तान या भागातील पाकविरोधी दहशतवादी संघटनांचे संचालन डोभाल करतात अशी पाक सरकारची पक्की खात्री आहे. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचे डोभाल हेच बाप आहेत असं पाकिस्तानातील सामान्य जनतेसही वाटतं.

हा माणूस पाकिस्तानात कुठेही काहीही करु शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना डोभाल यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की जर पाकिस्तानने पुन्हा २६/११ सारखा हल्ला केला तर त्यांना कदाचित बलुचिस्तान गमवावा लागेल. या एका वाक्याने संपूर्ण पाकिस्तानात अक्षरशः वादळ निर्माण केले होते. पाकविरोधी सर्व संघटनांचे डोभाल हेच संचालक आहेत हा समज अधिकच ठाम झाला. पण आजवर पाकिस्तानला डोभाल यांच्याविरूद्धचा एकही पुरावा मिळालेला नाही.

शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैधरीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते.

पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला.

त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतवाद्यांच्या जागा, त्यांची संख्या, एवढंच नव्हे तर सुवर्ण मंदिराचा संपूर्ण नकाशाच ब्रार यांच्याकडे सोपवला. या अमूल्य माहितीच्या आधारेच हे Operation यशस्वी झाले. नंतर समजले की ज्याने ही माहीत पुरवली तो पाकिस्तानी गुप्तहेर नव्हताच, तो होता भारतीय गुप्तहेर संघटना RAW चा अधिकारी .. “अजितकुमार डोभाल ”

(-संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३)

सर रतनजी जमशेटजी टाटा

(जन्मः २० जानेवारी १८७१; निधनः ५ सप्टेंबर १९१८). जमशेटजींच्या या द्वितीय मुलाचा जन्म मुंबईत झाला. वडिलांच्या सर्व परंपरा त्यांनीही पुढे चालविल्या. टिस्कोच्या स्थापनेत त्यांचाही मोठा वाटा होता.

रतनजी यांचा बुद्धीमंतांकडे अधिक ओढा होता आणि कलाविषयांमध्ये त्यांना विशेष रस होता. मृत्यूनंतर त्यांचा मोठा कलावस्तुसंग्रह प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयास देण्यात आला. पाटलिपुत्राजवळील एका पुरातत्त्वीय संशोधन मोहिमेसाठी त्यांनी ७५,००० रु. दिले. रतनजींनी म. गांधींना द. आफ्रिकेच्या प्रचार दौऱ्‍यासाठी सव्वा लाख रु. दिले होते.

नामदार गोखले यांच्या कार्याविषयी रतनजींना अपार श्रद्धा वाटत होती म्हणूनच अनेक वर्षे भारत सेवक समाजाला देणग्यांच्या रूपाने त्यांनी सतत मदत केली. दारिद्र्य व तदानुषंगिक सामाजिक समस्यांच्या अभ्यासाकरिता रतनजींनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲड पॉलिटिक्स’ या संस्थेत एक रतन टाटा निधी व अध्यासन स्थापन केले.

रतनजींनाही ‘सर’ हा बहुमान लाभला. कॉर्नवॉल (इंग्लंड) येथे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी रतनजी निधन पावले. मृत्यूसमयी त्यांच्या नावे उभारण्यात आलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट या न्यासाकडे त्यांनी आपली सर्व वैयक्तिक संपत्ति दिली.

त्या वेळी या न्यासाजवळ ८१ लक्ष रु. होते. ह्या न्यासाची बहुउद्देशीय कार्ये असून आतापर्यंत त्याने सु. दोन कोटी रुपयांचा विनियोग जनहितार्थ केला आहे त्यांपैकी जमशेटपूरच्या राष्ट्रीय धातुविज्ञान प्रयोगशाळेस ११·७५ लक्ष रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »