‘क्रांतीअग्रणी’ला पर्यावरण संवर्धनाचा पुरस्कार

पुणे : कुंडल येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धनासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांना नुकताच प्रदान करण्यात आला. आ. लाड यांनी आपल्या टीमसह पुरस्कार स्वीकारला.
कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर यांच्या नावाने ‘व्हीएसआय’च्या वतीने दरवर्षी इतर पुरस्कारांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठीही पुरस्कार देण्यात येतो.
गेल्या वर्षीही कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. या यशाबाबत ‘शुगरटुडे’शी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अरूण लाड यांनी आनंद व्यक्त केला. आमचा कारखाना दरवर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवत आहे. आमचे सोळा हजार सभासद आणि कर्मचारी-कामगार यांचे योगदान यामागे आहे. कै. जी. डी. बापू लाड यांच्या आदर्शावर चालत राहून आम्ही आणखी चांगले काम करत राहू, अशी प्रतिक्रिया आ. लाड यांनी व्यक्त केली.
आमदार अरूण लाड यांची प्रतिक्रिया पाहा
