एफआरपी आता ३०५0 रुपये

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२२-२३ या साखर हंगामसाठी, आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ३०५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी (म्हणजे टनाला 3050 रुपये दर ) निश्चित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची एफआरपी (Fair Remunerative Price) वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकार ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ अंतर्गत एफआरपी निश्चित करते. एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १५ रुपयांनी वाढ करण्याची कॅबिनेट नोट यापूर्वीच जारी करण्यात आली होती. यापूर्वी उसाचा भाव (एफआरपी) २९० रुपये प्रतिक्विंटल होता तो आता ३०५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे. सरकारने गेल्या आठ वर्षांत एफआरपीमध्ये ३४ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. याचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
यंदाचा गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या किमतीत वाढ करण्याबरोबरच केंद्राने अतिरिक्त १.२ दशलक्ष टन (MT) साखर निर्यातीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या चालू हंगामातील उत्पादनाने अंदाजे देशांतर्गत उत्पादन ओलांडल्यामुळे हा निर्णय घेण्यात येऊ शकतो..