कर्मचाऱ्यांना योग्य व वेळेवर पगार हवा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योगामधे महाराष्ट्रात सध्या अंदाजे दीड लाख कर्मचारी काम करीत आहेत. अलीकडे आपण ऐकतो की, संपूर्ण साखर उद्योगात कुशल मनुष्यबळ व कार्यक्षम अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक आठवडयात एक किंवा दोन कारखान्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या दिसतात. तोच धागा पकडून या विषयाचे मी सविस्तर विवेचन करणार आहे.

प्रथम आपण पाहू की हा तुटवडा का निर्माण झाला?

पहिले कारण :- गेल्या १५-२० वर्षात कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच बरोबर, आहे त्या कारखान्यांच्या क्षमता वाढल्या, बायप्रोडक्टस् मध्ये वाढ झाली. त्यामुळे मनुष्यबळाची मागणी वाढली.

दुसरे कारण :- साखर उद्योग हंगामी असल्यामुळे व ग्रामीण भागात असल्यामुळे नवीन उमेदवार साखर उद्योगात यायला तयार नाहीत.

तिसरे कारण :- काही कारखान्यात पगार कमी असणे, पगार वेळेवर न मिळणे, कित्येक महिन्यांचे पगार थकणे, वेळच्या वेळी प्रमोशन न मिळणे इ. कारणामुळे संपूर्ण साखर उद्योगाबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत.

परंतु, अशा कारखान्यांची संख्या खूप कमी आहे. चांगल्या कारखान्यांची संख्या जास्त आहे.

चौथे कारण : शहरातील नोकऱ्यांमधील पगारांचे भरगच्च पॅकेजेस, उच्च राहणीमान यांच्याशी साखर उद्योगाची झालेली तुलना.

अशावेळी शहरातील नोकरदार, व्यावसायिक यांची होणारी आर्थिक, शारीरिक, मानसिक ओढाताण याचा विचार केला जात नाही.

पाचवे कारण:- ३५-४० वर्षांपूर्वी जी पिढी कारखान्यात नोकरीला लागली. ती आता जवळपास निवृत्त झाली आहे. त्यामुळे रिक्त जागांची पोकळी निर्माण झाली आहे.

आपल्याला कोरोनाच्या साथीने दाखवून दिले आहे की, संकटकाळात सुद्धा कृषी क्षेत्रानेच आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारले आहे. कोरोना काळात साखर उद्योगाच्या कामकाजावर कुठलाही विपरीत परिणाम झाला नाही. साखर उद्योगासारख्या कृषी माल प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे.

साखर उद्योग आता ऊर्जा निर्मिती उद्योग म्हणून पुढे आला आहे. साखर उद्योगाचे भवितव्य अत्यंत चांगले असणार आहे. अर्थातच सध्या निर्माण झालेल्या काही अडचणींवर आपल्याला मात करून पुढे जावे लागणार आहे.

सध्या ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. खरे तर शहराकडे जाण्याचे आकर्षण हे एक प्रकारचे मृगजळच आहे. उच्च शिक्षित व चांगल्या कंपन्यांमधे शहरात नोकरी करणारे स्थिरावले आहेत हे खरे आहे. पण सामान्य नोकरी असणाऱ्या सामान्य तरूणांची शहरात होणारी ओढाताण, त्यांचा गावाशी तुटणारा संपर्क या बाबी पुढच्या पिढयांसाठी धोकादायक ठरणार आहेत.

उपाय काय?

आतापर्यंत आपण कारणांचा उहापोह केला, आता आपण उपाययोजनांकडे वळू या.

प्रथमतः कारखाना व्यवस्थापनाने कारखाना हा व्यावसायिक दृष्टीने चालवायला हवा. राजकारणाची झळ कारखान्याला पोहोचू नये याची दक्षता घ्यावी. व्यवस्थापनाने उत्पादन खर्च कमी करावा व जास्तीत जास्त बायप्रॉडक्टस् काढावेत.

साखर उद्योगात उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना चांगले दिवस आलेले आहेत. डिस्टिलरी, CO₂ प्लांट, CBG प्लांट, खत प्रकल्प असे प्रकल्प ऊभारता येऊ शकतात. तसेच सोलर, एसएएफ, ग्रीन हायड्रोजन सारखे प्रकल्प येऊ पाहत आहेत. व्यवस्थापनाने कारखाना जास्तीत जास्त दिवस चालावा म्हणून ऊस विकासावर भरीव काम करावे.

कारखान्याशी संलग्न डिस्टिलरीज जास्त दिवस चालाव्यात म्हणून हंगाम संपल्यावर मका, तांदुळ सारख्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती करावी. तसेच हंगाम सुरू होण्यापूर्वी गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करावी. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. महत्वाचं म्हणजे हा रोजगार प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरूणांना उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांना योग्य पगार व तेही वेळेवर मिळतील. तसेच इतर सुविधाही मिळतील त्यामुळे कर्मचारी वर्ग समाधानी राहील व टिकून राहील. महत्वाचे म्हणजे साखर उद्योगाला व कर्मचाऱ्यांना जो ‘हंगामी’ पणाचा शिक्का बसलेला आहे तो पुसून काढण्यास मदत होईल.

कारखान्यामधे नवीन कर्मचारी सुरवातीला कामावर शिकाऊ म्हणून एक वर्षासाठी घेण्यात यावा. त्यानंतर त्याच्या क्षमतेनुसार त्याला विशिष्ट पदाची जबाबदारी देण्यात यावी व तीन वर्षांनंतर त्याला त्या पदाचा हुद्दा देऊन कायम अथवा हंगामी कायम करण्यात यावे. तसेच वेळोवेळी रिक्त जागांवर पात्र उमेदवारांना बढती देण्यात यावी. त्यामुळे रिक्त जागांवर बाहेरून कर्मचारी घेण्याची गरज भासणार नाही.

नवीन कर्मचाऱ्यांची शिकाऊ म्हणून भरती करताना विविध ट्रेडमधील आयटीआय, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, कृषी पदविका, B.E., B.SC/M.SC, B.SC Agri, B.A., B.Com/M.Com, MBA, CS अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या अॅप्रेंटिस योजनेमुळे उमेदवारास एक वर्षाचे मानधन शासनाकडून मिळते. आपल्या महाराष्ट्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे), राजाराम बापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी ( इस्लामपूर) या सारख्या विविध कोर्सेस चालवणाऱ्या व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील तरूण साखर कारखान्यात नोकरी करून त्याची स्वतःची शेती सुधारित पद्धतीने करून उत्पन्न वाढवू शकतो. त्यामुळे त्याचे कुटुंब प्रदूषणरहित वातावरणात शांततेने व समाधानाने जगू शकते. प्रत्येक कारखान्यात स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ८०% पर्यंत असायला हवी. त्यामुळे कर्मचारी निवृत्त होईपर्यंत काम करीत राहतील. कारखाने सोडून जाण्याचे प्रमाण आपोआप घटेल. निवृत्तीनंतरही सक्षम व कुशल कर्मचाऱ्यांना काही कारखाने नोकरीची संधी देऊ शकतात.

श्रीनाथ मस्कोबा कारखान्याचे मॉडेल

आमच्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने अध्यक्ष मा. पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व संकल्पनांचा वापर केलेला आहे. त्यामुळे आमच्या कारखान्यात पुरेसा कुशल कर्मचारी वर्ग उपलब्ध असून, कर्मचारी वर्षानुवर्षे काम करत आहेत.

आमचे व्यवस्थापन आमच्या अधिकाऱ्यांची काळजी घेते व आमचे अधिकारी आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतात. त्यांना सन्मानाची वागणूक देतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कारखान्याबद्दल आपुलकी वाटते. परिणामी कारखाना सोडून जाण्याचे प्रमाण नगण्य झाले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आम्ही सीबीजी प्रकल्प नव्याने सुरू केला त्यावेळी, एकही अनुभवी कर्मचारी बाहेरून घेतला नाही. आहे त्याच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून प्लँट चालवला जात आहे. आमच्या श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे आणखी एक योजना राबवली जाते, ती म्हणजे, आमच्या एच. आर.  विभागातील अधिकारी जवळपासच्या, आयटीआय सेंटर्स, आर्टस्, कॉमर्स व सायन्स् कॉलेजेस, पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग कॉलेजेस, अॅग्रीकल्चर कॉलेजेस यांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांचे शंका निरसन करून साखर उद्योगात येण्याचे फायदे समजावून सांगतात. त्यामुळे देखील तरूण साखर उद्योगात येऊ लागले आहेत.

सध्या मुली ज्या प्रमाणे शेतकरी नवरा नको म्हणतात, या परिस्थितीवर कवी संदीप जगताप यांनी लिहिलेली सुंदर कविता वाचून प्रेरित होऊन एक उच्च शिक्षित तरूणी शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार झाली. तसंच तरूणांचे साखर उद्योगाविषयीचे गैरसमज दूर झाल्यास तरूण साखर उद्योगाकडे वळतील व त्यांच्याशी विवाहाकरिता मुलीही तयार होतील. कवी संदीप जगताप यांच्या कवीतेतून प्रेरणा घेऊन सुचलेली एक कविता…

sugar industry

म्हणूनच सांगतो पोरा!

आय टी मधल्या, मोठमोठ्या पॅकेजला,

उगीचच तू भुलू नकोस।

वर्क फ्रॉम होम करताना,

वजन वाढवून आजारांना निमंत्रण देऊ नकोस||

चांगली डिग्री मिळवून मोठ्या कंपनीत,

नोकरी लागली म्हणून हुरळू नकोस।

कारण तुला माहीत असायला हवं की,

तू कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतोस ||

शहराच्या नादी लागून ओढाताण होताना,

गावाशी नाळ तोडू नकोस।

खोटी माहिती सांगून एखाद्या मुलीचे,

आयुष्य बरबाद करू नकोस||

त्यापेक्षा तुझ्या जवळचा साखर कारखाना

निवड अन् नोकरी कर|

 मोकळ्या वेळात घरची शेती कर,

शेतकऱ्याची छानशी मुलगी करून सुखाचा संसार कर||

सचोटीने कारखान्यात काम करून,

प्रमोशनसाठी पात्र हो।

आई-बापांजवळ राहून,

त्यांच्या म्हातारपणाची काठी हो||

म्हणूनच सांगतो पोरा,

तू साखर कारखान्यात नोकरी कर।

तू साखर कारखान्यात नोकरी कर ||

हम भी कुछ कम नही

Aditi, Sanket, Pankaj

साखर कामगार आता म्हणू लागले आहेत, ”हम भी कुछ कम नही !” हे त्यांनी आता सिद्धही करून दाखवले आहे. अलीकडेच, 22 एप्रिल 2025 रोजी जाहीर झालेल्या “युपीएससी “च्या निकालात यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील साखर उद्योगामधील कर्मचार्‍यांच्या मुलांनी झेप घेतल्याचे आपणास माहीत आहेच.

जयसिंगपूरच्या आदिती चौगुले (आय.ए.एस. – रॅंक 63) या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चिफ इंजिनियर संजय चौगुले यांच्या कन्या आहेत. तर संकेत शिंगटे हे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे लेबर ऑफिसर अरविंद शिंगटे यांचे सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे डॉ. पंकज आवटे हे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी सुरक्षा अधिकारी कर्नल आवटे यांचे सुपुत्र आहेत. या सर्वांचे खूप अभिनंदन!

आनंदाचा निर्देशांक

जसं जगामधे फिनलँड या देशाचा ‘आनंदाचा निर्देशांक’ (Happiness Score) सर्वात जास्त आहे. त्याप्रमाणे साखर उद्योगातील कर्मचाऱ्यांचा आनंदाचा निर्देशांक इतर उद्योगाच्या तुलनेत सर्वात जास्त असेल, असं मला वाटतं.

त्यामुळे आपण आपल्या कुटुंबातील, नात्यातील, गावातील तरूणांना साखर उद्योगात येण्याचे फायदे समजावून सांगून, साखर उद्योगाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे.

(लेखक डी.एम. रासकर हे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »