उसाचे बिल न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : कारखान्याला ऊस घालून दोन महिने झाले, तरी उसाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन केले. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून केलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
तात्यासाहेब हरिभाऊ पौळ ( ४०, रा. लुखामसला- गेवराई ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पौळ यांनी त्यांचा दोन एकर ऊस अहमदनगर तालुक्यातील पियुष शुगर लि. ला दिला. मात्र, अनेक वेळा मागणी करून सुध्दा त्यांना पैसे मिळाले नाहीत. डोक्यावर कर्ज असल्याने ते व्यथित होते. नैराश्यातून मंगळवारी त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. माहिती मिळताच त्यांना बीड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते
विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर पौळ यांनी एक व्हिडिओ काढला बनवला होता. माझे उसाचे बिल आले नाही, डोक्यावर कर्ज आहे. आता द एंड करतो, असे पौळ म्हणताना व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी असा परिवार आहे.