शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे : पवार

पुणे : सध्या पाण्याची चिंताजनक परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक वापर आणि नियोजन करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी (दि. २२) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
‘एआय’संदर्भात ते म्हणाले की, शेतीमध्ये या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही आहोत. राज्यात उसासह आणखी पाच पिकांमध्ये या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीर केले आहे. त्याची सुरुवात उसापासून तरी झाली आहे. या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये औत्सुक्याची भावना निर्माण झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे उसाला ३० टक्के खत आणि पाणी कमी लागणार आहे. जमिनीचा पोत देखील कायम राहणार असल्याने उत्पादनातही चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला होणार आहे.
जनतेच्या कामांसाठी सरकार सोबत बोलणे हे चुकीचे नाही
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत पवार म्हणाले की, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. मी त्यांच्याशी या विषयावर बोललेलो नाही. तर अजित पवार यांच्या सोबत सातत्याने होणाऱ्या बैठकांबाबत शरद पवार म्हणाले की, जनतेच्या कामांसाठी सरकार सोबत बोलणे हे चुकीचे नाही.