गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली. साखरआयुक्तालयाच्या सध्याच्या अहवालानुसार साखर उताऱ्यात कोल्हापूर, सांगलीचे वर्चस्व आहे.
गाळपात पुणे जिल्ह्यातील ‘बारामती अॅग्रो’ने पहिले, ‘जरंडेश्वर’ने दुसरे, तर ‘दौंड शुगर’ने तिसरे स्थान पटकावले आहे. साखरनिर्मितीत ‘जवाहर’ने पहिले, ‘सोमेश्वर’ने दुसरे, तर ‘कृष्णा’ने तिसरे स्थान पटकावले आहे.
साखर कारखाने किमान १५० ते १६० दिवस चालले तरच आर्थिकदृष्ट्या परवडत असते. मात्र चालू हंगामात बहुतांश कारखाने शंभर दिवसांच्या आतच बंद झाले. या हंगामात एकूण ८५२ लाख टन ऊस उपलब्ध होता. काहींची गाळपक्षमता अजस्त्र झाल्याने शंभर दिवसांच्या आत ऊस संपला आहे. सद्यःस्थितीत दोनशे कारखाने दररोज ९ लाख ७० हजार टन ऊस गाळप करत आहेत. या क्षमतेने १००० लाख टन ऊस शंभर दिवसात संपणार आहे. अजून चौदा कारखान्यांचे विस्तारीकरण होणार आहे. यामुळे तीन महिन्यांचा हंगाम आणि उरलेले नऊ महिने नुसताच खर्च असे सूत्र होऊन सगळ्यांचेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.