AI चा वापर करणारा नॅचरल शुगर पहिला कारखाना : ठोंबरे

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील ऊस पीक संगोपन – परिसंवाद शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
‘एआय’ तंत्रज्ञानाची माहिती व त्याचे फायदे शेतकऱ्यांना व्हावेत म्हणून हा शेतकरी मेळावा येथे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी घेण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक भोईटे, डॉ संजीव माने, प्रगतशील शेतकरी डॉ. बाळकृष्ण जडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी ठोंबरे म्हणाले, नॅचरल उद्योगाने नवनवीन व आधुनिक तंत्रज्ञान कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळावे व त्यांचे उत्पानामध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक उन्नती करणेचा कसोशिने प्रयत्न केलेला आहे. ऊस पिकासाठी एआय (कृत्रिम बुध्दिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनामध्ये ३० टक्के पर्यंत वाढ व २५ टक्क्यानी खर्च कमी होऊ शकतो. येत्या ऊसलागवड हंगामासाठी नॅचरल शुगरचे कार्यक्षेत्रात किमान १ हजार शेतकऱ्यांचे शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. जडे यांनी मका पिकाचे माहिती देताना सांगितले की, मका पिकाची उत्पादन क्षमता ही एकरी २०४ क्विंटल आहे. आम्ही एकरी १०० क्विंटल उत्पादन घेतलेले आहे. येत्या वर्षात १५० क्विंटल उत्पादन घेणार आहोत. यावेळी डॉ. संजीव माने यांनी उन्हाळयातील ऊस पीक संगोपन व एकरी १०० टन उत्पादन घेणेसाठीचे तंत्रज्ञान याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
डॉ. भाईटे यांनी एआय तंत्रज्ञान (कृत्रिम बुध्दीमत्ता) या विषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. सूत्रसंचालन कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले, तर किशोर डाळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी संचालक, प्रवर्तक, शेतकरी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.