हताश शेतकऱ्याने ऊस पेटवला, नंतर संपवलं स्वत:चं जीवन

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न
बीड : जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये घडली आहे. नामदेव आसाराम जाधव रा. हिंगणगाव ता. गेवराई जि. बीड असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नामदेव जाधव यांच्याकडे एकूण दोन एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये २६५ जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र, हा ऊस आता तोडणीला येऊन देखील परिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हत. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी नामदेव जाधव हे कारखान्याकडे फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. त्यामुळे नैराश्यात असलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनला असून जवळपास ३० ते ४० हजार मेट्रिक टन ऊस अद्यापही बीड जिल्हा शिल्लक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे एकीकडे अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असताना देखील कारखानदार मात्र मनमानीपणा करत आहेत. परजिल्ह्यातील ऊस आयात करत आहेत. यामुळे तळहाताच्या फोडासारखा जपलेला ऊस कुठे घालावा? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय.
त्यामुळे आता संतप्त आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांकडून, टोकाचं पाऊल उचलल जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झालं आहे. त्यामुळे आता साखर कारखाना आयुक्त आणि सरकारने यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.