‘माळेगाव’च्या निमित्ताने अजितदादांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रेमाचा इशारा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी उतरणारच आहे, माझ्या पॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे’, असे उद्‌गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ‘काही जण मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन काहीबाही बोलत आहेत; तर मलाही इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल’, असं मी मुख्यमंत्र्यांना म्हणणार आहे, असा इशाराही दादांनी दिल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दादांसारख्या नेत्याची शेरेबाजी कोणत्या टोकला जाते, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मी सगळ्यांशी बोलून चाचपणी केली. पण, काहींचा हट्ट आड येतो आहे. ते हट्टी असतील, तर मीसुद्धा दुप्पट हट्टी आहे. मग मलाही एकदा बघायचेच आहे काय होते ते,’ असा शब्दांत अजितदादांनी ‘माळेगाव’मधील मुख्य विरोधक तावरे गुरू-शिष्याला आव्हान दिले आहे. ‘माझे पॅनेल सर्वपक्षीय असेल. ज्यांना कोणाला यायचे, त्यांचे स्वागत आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीतील राष्ट्रवादी भवनात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे या विरोधकांवर जोरदार टीका करीत स्वतःच्या संचालक मंडळाच्या कारभाराचेही वाभाडे काढले. काही गोष्टी चुकल्याची कबुली देत त्या दुरुस्त केल्या जातील, असा शब्द दिला.

काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन येथे काहीबाही सांगत आहेत. पण, मीसुद्धा मुख्यमंत्र्यांना सांगेन की, मग मलाही इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल, हा माझा मतदारसंश आहे. तेव्हा असं कसं चालेल, असे म्हणत पवार यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिला. त्यांचा रोख माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे या गुरू-शिष्याच्या जोडीकडे होता.

या दोघांचा थेट नामोल्लेख टाळत ते म्हणाले, काहींचे वय झालेय; पण तरीही मलाच पाहिजे, असा हट्ट सुरू आहे. अशाने इतरांना संधी कधी मिळणार? यातील एक जण तर पाच वर्षे संचालक मंडळाच्या बैठकीलाच आले नाहीत, दुसरे अडीच वर्षे फिरकले नाहीत. मी फक्त राष्ट्रवादीचे पॅनेल करणार नाही. ‘छत्रपती’प्रमाणे सर्वपक्षीय पॅनेल असेल. इतर पक्षांतील चांगल्या लोकांचेही स्वागत केले जाईल.

माळेगाव’च्या निवडणुकीसाठी काहींना चैनच पडत नव्हती. ते रोज मुंबईला हेलपाटे घालत होते. पण, सहकार खाते आमच्याकडे आहे. आम्हीसुद्धा महायुतीत काम करतो, हे ते विसरले. इथे अमित शहा यांचे नाव घेऊन काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. अरे शहाण्यांनो, तुम्हाला अमित शहा ओळखतात तरी का? असा टोला अजित पवार यांनी तावरे गुरू-शिष्यांना लगावला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात आजवर झाले नाही एवढे काम पुढील पाच वर्षांत करून दाखवणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या योजनांचा फायदा सभासदांना करून देणार आहे. कारखान्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत. सुरुवातीला बाळासाहेब तावरे व त्यानंतर केशवराव जगताप यांनी चांगले नेतृत्व केले, असा दावा पवार यांनी केला.

एफआरपी सॉफ्ट लोनची परतफेड केली आहे. मागच्या काळातील रजेच्या पगारापोटी आम्ही 3 कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून माळेगाव हार्वेस्टरवर आणण्याचा माझा प्रयत्न राहील. ’माळेगाव’ने 16 कोटी आरोग्य विमा हप्ता भरला. त्यातून 27 कोटींचा लाभ सभासदांना झाला. साखरनिर्मिती, डिस्टिलरी, वीजनिर्मिती, संजीवनी खतनिर्मिती प्रकल्प, यामुळे चांगला ऊसदर देता आला. खोडकी बिलाचा ठराव आधीच करून ठेवल्याने आचारसंहिता लागली, तरी ती रक्कम सभासदांना मिळेल.

श्री छत्रपती’प्रमाणे प्रचार शुभारंभावेळीच 13 जूनला मी चेअरमन कोण होणार? हे जाहीर करणार आहे. अन्य पाच गटांना प्रत्येकी एक वर्ष याप्रमाणे उपाध्यक्षपद दिले जाईल. कारखान्यात नोकरभरती करताना मी आता कोणाचे लाड करणार नाही. कोणी कोणी काय काय उद्योग केले? हे माझ्या कानावर आले. त्याचा परिणाम मी ऊसदरावर होऊ दिला नाही, असेही अजितदादा म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »