शेतकऱ्यांनो, ऊसउत्पादन वाढविण्यासाठी पुढे या!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे आवाहन

इस्लामपूर : क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गाताडवाडी येथे राजारामबापू साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्पाच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचा पथदर्शी सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली प्रकल्प क्षारपड जमिनी सुधारणेमधील महत्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, रणजित पाटील, प्रदीपकुमार पाटील, रमेश खोत, मधुकर खोत, सचिन खोत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने १०० टक्के अनुदानावर क्षारपड जमिनी सुधारणा कार्यक्रम हाती घ्यावा

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सरकारमध्ये असताना क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी शासनाच्या वतीने आपल्या काही गावामध्ये ८०-२० ची योजना आणली होती. यामध्ये शासनाने ८० टक्के तर, लाभार्थी शेतकऱ्यांनी २० टक्के रक्कम भरावयाची होती. मात्र २० टक्के रक्कम गोळा होऊ शकली नाही. राज्य शासनाने १०० टक्के अनुदानावर क्षारपड जमिनी सुधारणा कार्यक्रम हाती घ्यावा, असे पत्र मी सरकारला दिले आहे. मात्र यामध्ये काही काळ जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिंमतीवर क्षारपड जमिनी सुधारणा करण्यासाठी पुढे यायला हवे.  भैरवनाथ या छोट्या संस्थेने संस्था उभारणीच्या कर्जाची परतफेड करुन हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प क्षारपड जमिनी सुधारणेमध्ये दिशादर्शक ठरेल.

प्रतीक पाटील म्हणाले, काही वर्षांपूर्वी आपल्या शेतीस पाणी नाही, हा एक प्रश्न होता. मात्र सध्या शेतातील पाणी बाहेर कसे काढायचे? हा गंभीर प्रश्न बनला आहे. आम्ही गेल्या वर्षापासून राजारामबापू सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजना राबवित आहोत. शेतकऱ्यांनी रुपये १० हजार भरल्यास त्यांना रुपये ७० हजाराचे कर्ज उपलब्ध करुन देत आहोत. या रक्कमेची परतफेड निश्चितपणे वाढीव उत्पादनातून होऊ शकते.  सचिन खोत यांनी स्वागत केले. सुहास खोत यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »