जगदीश खेबुडकर

आज शनिवार, मे ३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १३ , शके १९४७
सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:०२
चंद्रोदय : ११:१५ चंद्रास्त :००:५६, मे ०४
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ०७:५१ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – १२:३४ पर्यंत
योग : शूल – ०१:४१, मे ०४ पर्यंत
करण : तैतिल – ०७:५१ पर्यंत
द्वितीय करण : गर – १९:२८ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मिथुन – ०६:३७ पर्यंत
राहुकाल : ०९:२२ ते १०:५९
गुलिक काल : ०६:०९ ते ०७:४६
यमगण्ड : १४:१२ ते १५:४८
अभिजितमुहूर्त : १२:१० ते १३:०१
दुर्मुहूर्त : ०६:०९ ते ०७:०१
दुर्मुहूर्त : ०७:०१ ते ०७:५२
अमृत काल : १०:१३ ते ११:४७
वर्ज्य : २०:४० ते २२:१८
ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः’
गंगा यांचा जन्म वैशाख शुक्ल सप्तमीच्या शुभ दिवशी झाला होता, म्हणून ही पवित्र तारीख गंगा सप्तमी म्हणून साजरी केली जाते. गंगा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान केल्यास सात्त्विकता आणि योग्यता प्राप्त होते. वैशाख शुक्ल सप्तमीचा दिवस संपूर्ण भारतभर श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो. गंगा जन्माची कहाणी स्कंदपुराण, वाल्मिकी रामायण इत्यादी ग्रंथांत वर्णन केलेली आहे.
भारतातील बऱ्याच धार्मिक संकल्पनांमध्ये, गंगा नदीला देवी म्हणून दर्शविले गेले आहे. गंगा नदीच्या काठावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. गंगा नदीची पूजा भारताच्या पवित्र नद्यांपैकी सर्वात पवित्र म्हणून केली जाते. असे मानले जाते की गंगा स्नान केल्याने मानवाची सर्व पापं दूर होतात. लोकांना गंगा तिरी मृत्यु यावा किंवा मरणानंतर, गंगामध्ये त्यांची राख विसर्जीत करणे मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानले जाते. गंगा घाटावर लोक प्रार्थना करतात आणि ध्यान करतात.
आज गंगा सप्तमी आहे.
आफ्रिका खंडातील पत्रकारांनी नामीबियातील विंडहोकमध्ये २८ एप्रिल ते ३ मे १९९१ या कालावधीत झालेल्या परिषदेत वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. माध्यमांचे स्वातंत्र्य, विविधता आणि बाह्य हस्तक्षेपापासून मुक्तता ही तत्त्वे त्याच्या केंद्रस्थानी होती. या दिवसाचे स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने १९९८पासून हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली.
काळाचे ओघात माध्यमांचे स्वरूप तंत्रज्ञानाच्या अंगानेही बदलले आहे. छापील वृत्तपत्रे ते डिजिटल व्यासपीठे असे त्यांचे स्वरूप बनले आहे. त्यातून सामान्य नागरिकांना परस्परांशी संवाद साधण्याची सोय झाली आहे आणि एकत्रित कृती करण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. मुख्य प्रवाहातही विधायक व समुदायाधारित पत्रकारितेचे (कम्युनिटी जर्नालिझम) काही प्रयोग आकार घेत आहेत. या दोन्हींचा मेळ साधला, तर नैसर्गिक साधनसामग्रीच्या समन्यायी वाटपापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततापूर्ण सहजीवनाचे स्वप्न साध्य करण्यासाठी माध्यमांची शक्ती सत्कारणी लागू शकेल.
आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे.
१९६९: भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८९७)
“ वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. “
हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत.
संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे ‘दुर्गा आली घरा’ हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे.
त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता.
त्यांच्या कारकीर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले
त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित केले गेले.
२०११: गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: १० मे , १९३२)
- घटना :
१७१५: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये दिसले.
१८०२: वॉशिंग्टन (डीसी) या शहराची स्थापना झाली.
१९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
१९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
१९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
१९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली.
१९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत.
१९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला.
• मृत्यू :
• १९१२: उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचे निधन.
१९७१: प्रसिध्द अर्थशास्त्र धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल , १९०१)
१९७७: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर , १९३२)
१९७८: लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे पुणे येथे निधन. (जन्म: १७ जानेवारी, १८९५ )
१९८१: पद्मश्री पुरस्कार सन्मानित हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन. १९५८ मध्ये पद्मश्री पदवीने भारत सरकारने नर्गिस यांना सन्मानीत केले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या.
(जन्म: १ जून, १९२९)
१९९६: व्यंगचित्रकार वसंत गवाणकर यांचे निधन.
२०००: जेष्ठ समाजसेविका पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी , १९०६)
२००६: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर, १९४९)
२००९: जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९३१)
- जन्म :
१८९६: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर , १९७४)
१९५१: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा जन्म.
१९५९: भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म.