अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा : अजित पवार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

‘श्री छत्रपती’ला अडचणीतून बाहेर काढणार; श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

बारामती : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मी भागच घेणार नव्हतो. परंतु, अडचणीच्या वेळी रणांगण सोडणे हा पळपुटेपणा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘श्री छत्रपती’च्या  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानीनगर येथील भवानीमातेच्या मंदिरामध्ये श्री जय भवानीमाता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

सोमेश्वर कारखान्याप्रमाणे छत्रपती कारखान्यालाही अडचणीतून बाहेर काढावे लागणार आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्व प्रकारे साथ देण्याची आपली तयारी असून, ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे आश्वासनही यावेळी पवार यांनी दिले.

याप्रसंगी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वर कारखान्याची अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल उभे केलेले आहे. पृथ्वीराज जाचक म्हणाले, श्री छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. आपल्या कारखान्याची निवडणूक होण्यासाठी जून उजाडणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर आम्ही खुल्या दिल्याने शत्रुत्व केले व मित्रत्वही केले. आगे आगे देखो होता है क्या, असा टोला पृथ्वीराज जाचक यांनी विरोधकांना लगावला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »