प्रदीर्घ अनुभवी पी. आर. पाटील राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी

मुंबई : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून ५४ वर्षे संचालक आणि ३० वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा दीर्घ अनुभव पाटील यांच्या पाठीशी आहे.
मावळते अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडून पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
उपाध्यक्षपदी प्रकाशराव सोळंके आणि प्रतापराव ओहोळ यांची निवड करण्यात आली. सोळंके हे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, तर ओहोळ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
मुंबईत महासंघाच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. राजारामबापू पाटील यांनी १९६८ मध्ये साखराळेत स्थापन केलेल्या वाळवा तालुका (सध्याचा राजारामबापू) सहकारी साखर कारखान्याच्या प्रवर्तक मंडळात पहिल्यांदा पी. आर. पाटील यांचा समावेश झाला.
पहिल्या संचालक मंडळापासून ते आजअखेर ५४ वर्षे ते संचालक, तर गेल्या ३० वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. मोहनराव कदम, आ. मानसिंग नाईक यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार केला.
निवडणूक निर्णय अधिकारी, सहकारन उपनिबंधक पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन महासंघ संचालकांची बैठक झाली. स्व. विलासराव देशमुख सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी पी. आर. पाटील यांचे नाव सुचवले. त्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अनुमोदन दिले.
पी. आर. पाटील अनुभवी नेतृत्व
वाटेगाव-सुरुल शाखेची स्थापना, सर्वोदय कारखान्यासोबतचा करार आणि त्याचे राजारामबापूकडे स्वामित्व घेणे यासह जत-तिप्पेहळ्ळी येथील कारखाना खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण विस्तारीकरणामध्ये पाटील यांच्या नेतृत्वगुणांची छाप पडली.
साखराळे शाखेचे अत्याधुनिक आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी, अर्कशाळा प्रकल्पाचा विस्तार आणि आधुनिकीकरण अशा सर्व कामांमध्ये त्यांचे योगदान आहे. साखर उद्योगातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.