साखर कारखान्यात रोजंदारी कर्मचारी ते कार्यकारी संचालक (MD)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कारखान्यात काम करत असताना शिस्त हा घटक खूप महत्त्वाचा आहे.. सर्व कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्याआधी मी एक प्रयोग केला. इतर सर्व कामगारांनी ज्या पद्धतीने शिस्त पाळणे व कामकाज करणे अपेक्षित आहे, असे वाटत होते, ती शिस्त आणि नियम मी सर्वात आधी मला लावून घेतले.

पहाटे साडेचार वाजता माझा दिवस चालू होतो. रोज सुमारे दीड तास चालून झाल्यावर, थोडा व्यायामही करतो. सकाळी साडेसात वाजता मी ऑफिसला जायला तयार असतो. ऑफिसच्या वेळेआधी आणि इतर सर्व कर्मचार्यांच्या अगोदर मी कार्यालयात उपस्थित होतो. प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अगदी लहान गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालतो
………

श्री. भास्कर घुले यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आणि दृष्टी इतरांसाठीही मार्गदर्शक आहे. त्यांच्या कारकीर्दीस ‘शुगरटुडे’च्या शुभेच्छा!

साखर कारखानदारी मध्ये कार्यकारी संचालक महत्त्वाची भूमिका व जबाबदारी पार पाडत असतो. तुमचा संपर्क ऊस तोडणी मजूर, ट्रक ड्रायव्हर, तोडणी व वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, कारखान्याचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालक मंडळ, चेअरमन, शासकीय अधिकारी, ऑडिटर्स, सप्लायर्स, कन्सल्टंट, नॅशनल फेडरेशन, सहकारी साखर संघ, शासनाचे विविध विभाग, केंद्र व राज्य शासनातील संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदय यांच्याशी संपर्क येत असतो.

Bhaskar Ghule, MD Vighnahar Sugar

गेली तीस वर्षांहून अधिक काळ मी साखर कारखान्यांमध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला सिव्हिल विभागात ‘डेली वेजेस’वर काम करायला सुरुवात केली. सुपरवायझर म्हणून काम करताना तसा कारखान्याच्या अंतर्गत कामकाजामध्ये फारसा सहभाग नसायचा.

साखर कारखान्यामध्ये स्थापत्य विभाग हा काही फार महत्त्वाचा भाग नव्हता; तरीदेखील साखर कारखान्यात काम करतोय म्हटल्यावर मी सिव्हिल विभागात काम करता करता, इतर विभागांशी संपर्क साधत असे. साखर कारखान्यामध्ये कामकाज कसे चालते? इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, अ‍ॅग्रीकल्चर, अकाउंट व प्रशासन या विभागांशी मी संपर्क साधत होतो. त्या विभागांतील प्रत्येक गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न करत होतो.

ते माझे क्षेत्र नसले तरी काही नवीन शिकण्याची इच्छा मला प्रत्येक विभागाकडे घेऊन जात होती. सुरुवातीच्या काळामध्ये खाते प्रमुखांशी बोलणे होत नसे. त्यामुळे त्या त्या विभागातील ज्युनिअर अधिकारी व कर्मचार्यांशी संपर्क साधून मी प्रत्येक विभागाची माहिती घ्यायचा प्रयत्न करत असे. अशा प्रकारे कामकाज करत असताना माझे असे लक्षात आले, की कारखान्यामध्ये महत्त्वाची खाती इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, अ‍ॅग्रीकल्चर, अकाउंट आणि प्रशासन हेच आहेत. तुलनेने सिव्हिल विभाग फारसा महत्त्वाचा नव्हताच. त्यामुळे सिव्हिल विभागात काम करून कारखान्याच्या बाबतीत फार काही शिकणे शक्य नव्हते.

आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपण योग्य दिशेने वाटचाल करायला हवी आणि त्यासाठी मी प्रयत्न करायचे ठरवले. रोजंदारीवर काम करणारा सिव्हिल सुपरवायझरचा सिव्हिल इंजिनियर झालो. मग मात्र मला सिव्हिल ऐवजी कारखान्याच्या मेन प्रवाहात काम करण्याची तीव्र इच्छा झाली आणि माझ्या सुदैवाने मला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली.


असा झालो कार्यकारी संचालक
माझ्या झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळें मला सिव्हिल विभागातील कामाबरोबरच इतर विभागातील कामांची जबाबदारी थोड्या फार प्रमाणात मिळू लागली. माझ्या कामामुळे व वरिष्ठांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासामुळे मला सेक्रेटरीपदी बढती मिळाली. सेक्रेटरी झाल्यामुळें माझे क्षेत्र बदललेले व मी प्रशासनात काम करू लागलो. सेक्रेटरी पदावर काम करत असताना कारखान्यातील प्रत्येक विभागाशी माझा संबंध येऊ लागला व प्रत्येक विभागाच्या कामकाजाची सखोल माहिती व ज्ञान मला प्राप्त झाले.

माझे शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदविका असल्यामुळे मला कार्यकारी संचालक होता येणार नव्हते. कारण कार्यकारी संचालकासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे हे आवश्यक होते. त्यासाठी मी बी.ए.ची पदवी घेतली व नंतर एम.बी.ए. देखील केले. पुढे कार्यकारी संचालकांच्या परीक्षेसाठी पात्र झालो. शासनाच्या कार्यकारी संचालकांच्या पॅनलवर माझी निवड झाली.

आतापर्यंत महाराष्ट्रात नावाजलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात काम करण्याचा प्रचंड मोठा अनुभव माझ्या पाठीशी होता. सेक्रेटरी म्हणून काम करत असताना अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्नदेखील केला; परंतु आता मी स्वतः कार्यकारी संचालक झाल्याने मला स्वतःच्या जबाबदारीवर सर्व गोष्टी करायच्या होत्या. कारखान्यात काम करण्याचा पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने, मला कार्यकारी संचालक म्हणून काम करणे सोपे झाले होते.

कार्यकारी संचालक कसा असावा?
कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना तुम्हाला सर्वप्रथम चेअरमन आणि संचालक मंडळांचा विश्वास संपादन करणे अत्यावश्यक असते. संचालक मंडळांच्या पाठिंब्याशिवाय कोणताच कार्यकारी संचालक प्रभावीपणे काम करू शकत नाही. संचालक मंडळांचा विश्वास मिळवायचा असेल, तर तुम्हाला अतिशय काटेकोरपणे काम करावे लागते. तुमच्या कामांमध्ये शुद्ध हेतू, प्रामाणिकपणा, निष्ठा, वक्तशीरपणा, आलेल्या संकटांना तोंड देण्याची क्षमता, कामातील सातत्य, आचार-विचार-विहार या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि तीच तुमची पहिली पात्रता असते.

तुम्ही पास झालात की मग बाकीच्या गोष्टी करणे आपल्या हातात असते. या सर्व गोष्टींचे मी काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळे मला माझ्या कामात बर्यापैकी स्वातंत्र्य मिळाले आहे आणि त्याचमुळे मी तन-मन-धनाने माझे कर्तव्य पार पाडतोय.

साखर कारखानदारी मध्ये कार्यकारी संचालक महत्त्वाची भूमिका व जबाबदारी पार पाडत असतो. तुमचा संपर्क ऊस तोडणी मजूर, ट्रक ड्रायव्हर, तोडणी व वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, कारखान्याचे कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालक मंडळ, चेअरमन, शासकीय अधिकारी, ऑडिटर्स, सप्लायर्स, कन्सल्टंट, नॅशनल फेडरेशन, सहकारी साखर संघ, शासनाचे विविध विभाग, केंद्र व राज्य शासनातील संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री महोदय यांच्याशी संपर्क येत असतो. तसेच कामगार युनियन, शेतकरी संघटना, ऊस तोडणी मजुरांच्या संघटना, ऊस वाहतूकदार संघटना या सर्व घटकांची प्रत्यक्ष संबंध येत असतो. या सर्वांशी समन्वय साधून कारखान्याचे कामकाज करणे हे फार सोपे नसले, तरी अशक्य देखील नाही. कारखान्याचे काम सुलभ व्हावे म्हणून तुम्हाला सर्वांशी समन्वय साधून आपली कामे करून घ्यावी लागतात.

ऊस विकास योजनांना प्राधान्य
आपला कारखाना उत्तम पद्घतीने चालावा यासाठी सर्वात प्रथम कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध असणे आवश्यक आहे. जर पुरेसा ऊस असेल, तर शेतकर्यांमध्ये कारखान्याविषयी आपुलकीची भावना असायला हवी. ऊस उत्पादक व सभासदांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असते. त्याप्रमाणे मी ऊस विकास योजनांना प्राधान्य दिले. त्यात शेतकर्यांना उच्च प्रतीचे बियाणे वेळेवर व उधारीने देण्याची व्यवस्था केली.

शेतकर्यांना ऊस पिकातून जर योग्य मोबदला मिळवून द्यायचा असेल तर प्रथम त्याचे एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देणे गरजेचे होते. त्यासाठी ऊस विभागामार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन व पिकाविषयी माहिती, एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान, उसाच्या योग्य जाती, उसाचे जातवार व हंगामवार योग्य नियोजन करून लागवड करणे यावर भर दिला.

शेतकर्यांनी एकरी जास्तीत जास्त उत्पादन काढावे म्हणून त्यांना प्रशिक्षण देणे, ऊस विकास मेळावा घेणे व कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान शेतकर्यांना उपलब्ध करून दिले. जे शेतकरी जास्तीत जास्त लागवड करतील व एकरी जास्तीत जास्त एकरी उत्पादन घेतील त्या शेतकर्यांना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन सन्मानाने पारितोषिके देण्यात येतात. उसाची लागवड करताना ऊस नोंद अतिशय पारदर्शकपणे केली.

सत्यशीलदादांच्या संकल्पनेतून ऊसनोंदणी
आमच्या कारखान्याचे चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांच्या संकल्पनेतून कारखान्याचे ऊस नोंद करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले. त्याद्वारे कारखान्याचा फिल्ड स्टाफ शेतकर्यांच्या बांधावर जाऊन अचूकपणे त्याची मोजणी करतो. शेताचा फोटो घेऊन बांधावरून मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करतो. सदरची नोंद मध्यवर्ती डेटा सेंटरमध्ये संरक्षित केली जाते.

गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर त्याच नोंदीच्या आधारे ‘हार्वेस्टिंग प्रोग्राम’ राबविला जातो. त्यामुळे ‘हार्वेस्टिंग प्रोग्राम’ करताना शेतकर्यांच्या तक्रारी राहत नाहीत व ऊसतोड मागे-पुढे होत नाही. ज्याने जशी लागवड केली त्याप्रमाणे ऊस नोंद केली जाते व ‘हार्वेस्टिंग प्रोग्राम’ अचूकपणे पार पडतो. संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत असल्यामुळे, त्यात कोणताही फेरफार करता येत नाही. त्यामुळे शेतकरीही समाधानी आहेत. शेतकर्यांना आपल्या ऊसाच्या नोंदी ऊस वजन, ऊस बिले, साखर कार्ड इ. माहिती तात्काळ मिळण्यासाठी ‘डिजिटल स्मार्ट शेतकरी कार्ड’ तयार करण्यात येऊन, महाराष्ट्रात प्रथमच डिजिटल सिस्टीमचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वीरीत्या करण्यात आला.

‘गेमचेंजर’ ठरले स्मार्ट कार्ड
‘स्मार्ट शेतकरी कार्ड’मुळे शेतकर्यांना घरबसल्या त्यांच्या ऊसाची नोंद, ऊस वजन, ऊस बिले इ. माहिती तात्काळ उपलब्ध होऊन ऊस वजन स्लीप व उस बिले डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच सभासद व ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरातील साखर वाटप, शिल्लक साखर माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी मदत झालेली आहे.


‘स्मार्ट ऊस तोडणी/ वाहतूकदार कार्ड’ कारखान्याचे कामकाज पेपरलेस होणेसाठी शेतकी फिल्ड स्टाफसाठी मोबाईल प्लिकेशन तयार करण्यात येऊन, ऊस तोडणी/वाहतूकदारांना स्मार्ट कार्ड देण्यात आले. सदर स्मार्ट कार्डवरील क्यु-आर स्कॅन केल्यावर ऊस तोडणी/ वाहतूकदारांना त्यांची ऊस वाहतुकीचे वजन, ऊस बिले, तसेच त्यांनी ऊस वाहतुकीसाठी घेतलेले डिझेल इ. माहिती पाहणे सोयीस्कर झालेले आहे.

स्मार्ट कर्मचारी कार्ड
कारखाना कर्मचार्यांसाठी स्मार्ट कर्मचारी ओळखपत्र तयार करण्यातत आलेले असून, फक्त ओळखपत्र असा उपयोग न करताना, त्यावरील डिजिटल क्यूआर कोड स्कॅन करून, त्यांना पगार स्लिप, सवलतीच्या दराने पेट्रोल वाटप, तसेच सवलतीच्या दरातील साखर वाटप, पगार स्लिप डाऊनलोड करणे इ. सुविधा देण्यात आल्या आहोत.

स्मार्ट संचालक कार्ड
कारखाना व्यवस्थापनाला दैनंदिन गळीताची माहिती तात्काळ उपलब्ध होणेसाठी स्मार्ट संचालक ओळखपत्र कार्ड तयार करण्यात आलेले असून, सदर कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वरील सर्व माहिती संचालक मंडळाला उपलब्ध होऊ लागली आहे.

डिजिटल नंबर ट्रॅकिंग सिस्टीम
कारखाना कार्यस्थळावर उसाने भरलेल्या वाहनांचा नंबर लावण्यासाठी स्वयंचलित नंबर ट्रॅकिंग सिस्टीम उभारण्यात आली असून, प्रत्येक ऊस वाहतूक वाहनाला आर.एफ.आय.डी टॅग लावला आहे. केनयार्डमधील ऑटोमॅटिक नंबर ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे, नंबर आलेल्या वाहनांची माहिती डिजिटल एलईडी स्क्रीनवर उपलब्ध करून देणेत आलेली आहे. सदर डिजिटल तंत्रज्ञानामुळें कारखान्याचे कामकाज जलदगतीने व बिनचूक होण्यास मदत झाली आहे.

शेतकर्‍यांसाठी अ‍ॅप
चेअरमन साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही शेतकर्यांसाठी अ‍ॅप बनवले आहे. त्याद्वारे शेतकर्यांना उसाची नोंद, ऊस तोडणी प्रोग्राम, उसाबद्दलची अद्ययावत माहिती, त्याचप्रमाणे उसाचे काट्यावर वजन झाल्याबरोबर शेतकर्याला मेसेज जातो. आज आलेला व आजपर्यंत आलेल्या उसाची टनेजची माहिती तात्काळ व अचूक मोबाईलवर पुरवली जाते.
कारखान्याच्या प्रत्येक सभासदास व ऊस उत्पादकास ‘स्मार्ट शेतकरी कार्ड’ दिले आहे. त्या कार्डद्वारे शेतकर्याला ऊस बिल, साखर वितरण व त्यांच्याशी संबंधित बिले व इतर माहिती घरबसल्या प्राप्त होते. त्यासाठी कारखान्यावर येण्याची गरज पडत नाही.

कारखान्याच्या प्रत्येक सभासदाचा डेटा कारखान्याकडे असल्यामुळें प्रत्येकाला वाढदिवसाच्या निमित्ताने व इतर वेळी शुभेच्छा देण्यासाठी चेअरमन यांचा शुभेच्छा संदेश प्राप्त होतो. प्रत्येक सभासद व ऊस उत्पादकाची वाढदिवसाची नोंदसुद्धा घेतली जाते. ऊस उत्पादक व सभासद हा कारखान्याचा आत्मा आहे, असे समजून विघ्नहर परिवाराकडून सभासदांना सेवा पुरविली जाते. ज्या ज्या वेळेला सभासद कारखाना कार्यस्थळावर येतात त्यावेळी प्रत्येकाचे मान-सन्मानाने आदरातिथ्य केले जाते.

प्रेमाचे नाते
वार्षिक सभेच्या वेळी प्रत्येक सभासदाला घरपोच अहवाल दिला जातो. जेणेकरून कारखाना व सभासद यांच्यामध्ये प्रेमाचे अतूट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व ऊस उत्पादक व सभासद यांना हा कारखाना माझा आहे. तो चांगला चालला पाहिजे, त्यासाठी मी ऊस लागवड केली पाहिजे व लागवड केलेल्या ऊस कारखान्यात दिला पाहिजे ही भावना तयार झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रात आवश्यक तेवढे ऊस उत्पादन होते व तो कारखान्यास पुरविला जातो. त्यामुळे प्रत्येक गाळप हंगाम कारखाना पूर्ण क्षमतेने करत असतो.

मजुरांची समस्या
सध्याच्या काळामध्ये ऊस तोडणी मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यावर उपाय म्हणून हार्वेस्टरची मदत घेतली जाते. काही प्रमाणात हार्वेस्टरनेही ऊस तोडला जातो; परंतु आज तरी ऊस तोडणीसाठी संपूर्ण यांत्रिकीकरण झालेले नाही. त्यामुळें मजूर भरती करावीच लागते. बर्याचदा मजूर भरती करत असताना मोठ्या प्रमाणावर अ‍ॅडव्हान्स घेतात व ऊस तोडणी मजूर कामावर हजर होत नाहीत. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान होण्याबरोबर ऊस तोडणी प्रोग्रामवरही गंभीर परिणाम होतो. मजुरांअभावी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

म्हणून ऊस तोडणी मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांना अ‍ॅडव्हान्स देताना योग्य ती काळजी घेण्यात येते. कारखान्याकडे आवश्यक ते मजूर उपलब्ध होण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी आम्ही करतो. ऊस मजूर कारखान्यावर आल्यानंतर त्यांची राहण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांच्यासाठी लाईटची व्यवस्था जनावरांसाठी आवश्यक ती पाणी व निवार्याची व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांचे लसीकरण या गोष्टी कारखाना करत आहे.

कारखान्यावर आलेल्या प्रत्येक टोळी मुकादम व त्याचे मजूर या सर्वांशी शेती कर्मचार्यांमार्फत संवाद ठेवला जातो. कामगारांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी शेतकी अधिकारी व त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या साह्याने मदत केली जाते. प्रत्येक कामगाराच्या आजारपणात त्याला वैद्यकीय मदत पुरवली जाते, ऊस तोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिरे घेऊन त्यांना मोफत तपासणी व औषधोपचार केला जातो. वादळ, पाऊस किंवा साथीचे रोग या आपत्तीच्या काळामध्ये प्रत्येक कामगाराची काळजी घेतली जाते. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी साखर शाळा, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल इ. ठिकाणी सोय केली जाते. त्यांना शाळेत जाण्यासाठीची व्यवस्थादेखील केली जाते.

या सर्व गोष्टी करण्याबरोबरच काही लहान-सहान गोष्टी आहेत की ज्यामुळे मोठा फरक पडतो, उदाहरणार्थ आपण गव्हाण पूजन किंवा इतर गोष्टी करत असताना एखादा ऊस तोडणी गाडीवान याला जवळ बोलून घेणे. त्याला टोपी टावेल देऊन सन्मानित करणे व त्याच्या हाताने पूजा करणे या गोष्टी केल्यामुळे मजुरांमध्ये कारखान्याविषयीची आपुलकीची भावना तयार होते,
कार्यकारी संचालक म्हणून मी जेव्हा ऊस तोडणी मजुरांची संपर्क साधतो, त्यांच्या अड्ड्यावर जातो, त्यांची विचारपूस करतो, त्यांच्या मुलाबाळांची आस्थेने चौकशी करतो. त्यामुळेही कारखाना आणि ऊस तोडणी मजूर यांच्यात जिव्हाळ्याचे वातावरण तयार होते. त्याचा निश्चितपणे फायदा कारखान्यास होतो.

साखर कारखाना म्हटले की फॅक्टरी इमारत, कारखाना स्थळ, परिसर, गाडीतळ, ट्रकयार्ड हा सर्व परिसर गर्दीने गजबजलेला असतो. या ठिकाणी हजारो लोकांची वर्दळ असते. कारखान्यातही हजार- कराशे कामगार काम करत असतात. त्यामुळे हा परिसरात अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता असते. कारखाना परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आमचा कारखाना परिसर व कारखान्यातील आतील भाग रोजच साफसफाई करून स्वच्छ ठेवला जातो.

हिरवाईवर भर
त्याच प्रमाणे कारखाना परिसर व आजूबाजूला वृक्षारोपण करुन निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कारखाना साईटवर आले की प्रसन्न वाटते आणि उत्साहाने काम करता येते. त्याचबरोबर कारखान्याचे व रहिवासी कॉलनीच्या सांडपाण्याची शास्त्रशुद्धपणे विल्हेवाट लावून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धोरणाप्रमाणे ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. कारखान्याच्या जमिनीमध्ये आंबा, पेरु, चिकू, सिताफळं, नारळं या फळझाडांची लागवड केली असून. त्याद्वारे चांगले उत्पन्न घेत आहोत. शेतक-यांना दर्जेदार ऊस बियाणे मिळावे म्हणून सीडफार्म तयार केले आहे. त्यातून उच्च प्रतीच्या ऊस बेणे प्लॉटची निर्मिती करुन ते शेतकर्यांना पुरवित आहोत.

.सर्वांना विमा संरक्षण
ऊस तोडणी मजुरांना त्यांच्या घरापासून कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आणि गाळप हंगाम संपल्यानंतर त्यांना पुन्हा घरी सुरक्षित पोहोच करेपर्यंतची सर्वस्वी जबाबदारी कारखान्याची आहे, असे समजून त्यांचा अपघात विमा उतरवला जातो, त्यांची बैल व इतर जनावरांचाही इन्शुरन्स केला जातो. ऊस तोडणी मजुरांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी सहभागी होतो.
कारखाना कार्यस्थळावर व कार्यक्षेत्रात असताना त्यांचे जे जे धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम होतात, त्या प्रत्येक कार्यक्रमाला कार्यकारी संचालक म्हणून मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आमचे शेतीचे कर्मचारी व अधिकारीदेखील त्यांच्या सर्व कार्यात सहभागी असतात. एखादा अपघात घडल्यास विनाविलंब वैद्यकीय मदत पुरवली जाते.
ऊस तोडणी मजूर देखील आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे अशी वागणूक त्यांना देण्यात येते त्यामुळे आमच्याकडे ‘अ‍ॅडव्हान्स’ वाटप केलेली रक्कम शंभर टक्के वसूल होते. ऊस तोडणी मजूर प्रामाणिक व गरीब असल्यामुळें या सर्व सुविधांबरोबरच त्यांच्याशी आपुलकीने गोड बोलणे हे त्यांच्यासाठी लाखमोलाचे असते. ऊस तोडणी मजूर ते कॉन्ट्रॅक्टर कोणीही व्यक्ती माझ्या कार्यालयात किंवा कुठेही मला भेटू शकतो. त्यामुळे त्या सर्वांना खात्री असते की, आपल्याला वेळंप्रसंगी कुठलीही मदत करण्यासाठी कारखाना मागे-पुढे पाहत नाही. म्हणून आपणही कारखान्याला फसवून चालणार नाही, तर कारखाना हेच आपले दैवत आहे असे समजून विश्वासाने आपण कारखान्यावर आले पाहिजे व कारखान्याला सेवा दिली पाहिजे ही भावना प्रत्येक मजुरामध्ये दृढ झालेली आहे. यामुळें आमच्या कारखान्यास मजूर कमी पडत नाहीत व जादा ‘अ‍ॅडव्हान्स’ देण्याची गरज पडत नाही. त्याचा निश्चितपणे फायदा कारखान्याला होत असतो.

ज्याप्रमाणे शेतकरी व ऊस तोडणी मजूर महत्त्वाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यात प्रत्यक्ष काम करणारा कर्मचारी हा अतिशय महत्त्वाचा आहे. ऊस पिकविण्याचे व कारखान्यास पुरवठा करण्याचे काम शेतकरी करत असतो. ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार कारखान्यास ऊस पुरवठा करत असतात. कारखान्यात आलेल्या उसावर प्रक्रिया करून त्यापासून साखर, वीज, अल्कोहोल, इथेनॉल, कंपोस्ट खत तयार करण्याचे काम कारखान्याचा कामगार करत असतो.
साखर तयार होते ती शेतकर्याच्या शेतातील ऊसामध्ये. कारखान्यात आलेल्या ऊसातील साखर कुठेही वाया न जाऊ देता गोडाऊनमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी ही साखर कामगाराची असते. त्यासाठी इंजिनिअरिंग, रसायन, डिस्टिलरी व को-जन विभागातील कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी साखर कारखानदारीमध्ये नवीन तंत्रज्ञान अभावानेच आत्मसात केले जात होते. कारखान्यांमध्ये फारशी स्पर्धा नव्हती आणि आजच्यासारखा ‘एफआरपी’चा कडक कायदा अस्तित्वात नव्हता. खर्च वजा जाता राहिलेले पैसे शेतकर्यांना ऊस दराच्या रूपाने दिले जात होते.

आधुनिक तंत्रज्ञानाची कास
आता काळ बदलला आहे. सहकारी साखर कारखान्यांना खाजगी कारखान्यांशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळें कारखाना चालवताना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. कुठल्याही परिस्थितीत चांगले रिझल्ट मिळवावे लागतात. चांगली रिकव्हरी मिळवण्यासाठी मिल, बॉयलर, टर्बाइन, बॉयलिंग हाऊस, पॅनसेक्शन, शुगर हाऊस याकडे जातीने लक्ष द्यावे लागते. त्याचप्रमाणे डिस्टिलरी विभागातील रिझल्टकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते.

थोडक्यात काय तर ‘उत्तम रिझल्ट’ मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे व ते आपल्या फॅक्टरीत वापरणे अतिशय गरजेचे आहे. साखर कारखान्याच्या मशीनरीमध्ये सध्या आमूलाग्र बदल होत आहेत. ते स्वीकारून नवीन तंत्रज्ञानानुसार आलेली मशीनरी बसवणे आवश्यक असते. त्याप्रमाणे आम्ही पावर सेविंग डिव्हाइसेस. प्लॅनेटरी गिअर बॉक्स, वायर रोप कपलिंग, असे अनेक बदल केले आहेत.

सन 2021-22 मध्ये नवीन मिलमध्ये केन कॅरिअर स्प्लिटिंगचे काम केले व इनलाईन फ़ायबरायझर बदलून हेड ऑन फ़ायबरायझर टाकल्यामुळें केन कॅरिअर व फ़ायबरायझरचे स्टॉपेजेस कमी झाले आहेत. एकसारखा ‘क्रशिंग रेट’ राखता आल्याने गाळप क्षमतेत प्रतिदिन 400 ते 500 मे.टन वाढ करता आली. जुन्या डिस्टिलरीमध्ये बदल करून, क्षमता 40 केएलपीडी केली. बी-हेवी मोलॅसेस डिस्टीलरीमध्ये वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन क्रशिंग रेट मध्ये 400 ते 500 मे.टन / प्रतिदिन वाढ केलेली आहे. सध्या असलेल्या 40 केएलपीडी डिस्टिलरीच्या विस्तारीकरणचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर ‘सीएच’ मोलॅसेसवर क्षमता 85 केएलपीडी व ‘बीएच’ मोलॅसेसवर 100 केएलपीडी क्षमता होईल.

      नवे बदल करत असताना कामगारांना पारंपरिक पद्धतीने काम करायची सवय लागलेली आहे. ती सवय लवकर मोडत नाही. त्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन प्रशिक्षण देऊन तयार करावे लागते. यासाठी आम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) पुस्तक सर्व कामगारांना दिले आहे. शिवाय त्याचा अभ्यास करून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची सुविधादेखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे तेच कामगार आता नवीन तंत्रज्ञानावरही सहजपणे काम करत आहेत. केवळ तांत्रिक काम करणार्या कामगारांना प्रशिक्षण दिले म्हणजे संपले, अशातला भाग नाही. तर इतर विभागातसुद्धा अनेक बदल झालेले आहेत. पूर्वी अकाउंट विभागामध्ये 70 ते 80 कर्मचार्यांची गरज लागायची, आता संगणकीकरणामुळे कर्मचार्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. 

हे सर्व करायचे असेल, तर प्रथम कार्यकारी संचालकांनी स्वतःची कामकाज पद्धत बदलली पाहिजे आणि त्यानुसार मी माझ्या कार्यशैलीत अनेक बदल केले.

सर्वप्रथम खाते प्रमुख व विभाग प्रमुख यांची दर आठवड्याला समन्वय बैठक घेण्यात येते. त्यात सर्व विभागाच्या प्रमुखांच्या मताचा व सूचनांचा आदर करून सर्वांबरोबर खुलेपणे चर्चा करण्यात येते. प्रत्येक बाबीवर साधक-बाधक चर्चा करून निर्णय केले जातात. कारखान्याचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी या कॉर्डिनेशनचा अर्थात समन्वयाचा चांगला उपयोग होतो.

मी बदललो
कारखान्यात काम करत असताना शिस्त हा घटक खूप महत्त्वाचा आहे.. सर्व कर्मचारी वर्गाला शिस्त लावण्याआधी मी एक प्रयोग केला. इतर सर्व कामगारांनी ज्या पद्धतीने शिस्त पाळणे व कामकाज करणे अपेक्षित आहे, असे वाटत होते, ती शिस्त आणि नियम मी सर्वात आधी मला लावून घेतले.

पहाटे साडेचार वाजता माझा दिवस चालू होतो. रोज सुमारे दीड तास चालून झाल्यावर, थोडा व्यायामही करतो. सकाळी साडेसात वाजता मी ऑफिसला जायला तयार असतो. ऑफिसच्या वेळेआधी आणि इतर सर्व कर्मचार्यांच्या अगोदर मी कार्यालयात उपस्थित होतो. प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अगदी लहान गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष घालतो

प्रत्येक गोष्ट वेळेवर होण्यासाठी माझ्याकडून ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या मी प्रथम करतो मग इतरांना सांगतो. माझ्या स्वयंशिस्तीमुळे इतर कोणालाही काही सांगायची गरज पडत नाही. प्रत्येक जण आपापले काम वेळेत करतो. वेळेत ऑफिसला येतो कुठल्याही स्वरूपाची कामे प्रलंबित राहत नाहीत. हा मोठा फायदा त्यातून मिळतो. माझी स्वतःची प्रत्येक कृती व निर्णय हे संस्थेच्या हिताचीच असतात. काही निर्णय घेताना मनाची संभ्रमावस्था होत असेल, तर मी माझ्या सहकारी अधिकार्यांशी चर्चा करतो.

त्याचप्रमाणे मा. चेअरमन यांचाही सल्ला घेतो. त्यातही काही राहिल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी सल्लामसलत करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन माझे निर्णय करतो. त्यामुळे निर्णय चुकत नाहीत व सहकार्यांना विश्वासात घेतल्यामुळे तेही त्या निर्णयाची अंमलबजावणी सहजपणे करतात. कामगारांच्या बाबतीत माझी ‘मॅनेजमेंट’ व मी अतिशय सजग असल्यामुळे कामगारांची कोणतीही देणी, त्यांचा पगार, बोनस व इतर गोष्टी अगदी वेळेवर अदा करण्यात येतात.

कार्यकारी संचालक म्हणून कामगारांना शिस्त लावण्यासाठी, योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार मला निश्चितपणे आहे; पण तो अधिकार अपवादानचे वापरला जातो. कारवाई करून शिस्त लावण्यापेक्षा, सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताचा व सूचनांचा आदर करून काम केले, तर ते जास्त प्रभावी होते असा माझा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने मी कामकाज करतो.

मागणीआधीच पूर्तता
आपला कारखाना हे आपले कुटुंब आहे व त्या कुटुंबाचे आपण प्रत्येक जण सदस्य आहोत, ही भावना सर्वांमध्ये रुजवण्यामध्ये मला यश आले आहे. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन, त्या सोडविल्या जातात. कामगारांच्या पाल्यांना त्यांच्या शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत जे-जे सहकार्य करता येईल ते निश्चितपणे केले जाते. कारखान्यातील प्रत्येकाची काळजी घेतली जाते. शिवाय कोणत्याही प्रकारचे ‘ग्रुपीझम’ नाही. त्यामुळे सर्व विभागांतील व सर्व स्तरांतील कामगार एकसंध आहे. कामगार व युनियन यांना कोणतीही गोष्ट मागण्याची वेळ येत नाही. त्यांचे सर्व प्रश्न मागणी करण्यापूर्वी व वेळेवर सोडवले जातात. त्यामुळे कामगार व त्यांचे कुटुंबीयदेखील समाधानी आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामकाजावर होतो व त्यांच्याकडून कारखान्यासाठी अधिकाधिक योगदान दिले जाते. कारखान्याची ‘ऑफ सिझन’ची कामेसुद्धा वेळेत पूर्ण केली जातात. शिवाय सीझन चालू असतानाही कमीत कमी ‘स्टॉपेज’ होतात. त्यामुळे कारखान्याचे नुकसान टळते.

उच्च दर्जाचे प्रशिक्षण
कारखान्यात काम करणार्या प्रत्येक कर्मचारी व कामगाराला प्रशिक्षित करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणार्या संस्था व व्यक्तींकडून प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक प्रशिक्षणाबरोबर कामगारांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायला हवी, त्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मानसिक स्वास्थ्यदेखील योग्य राहील याची दक्षता घेण्यात येते. तुमचा कामगार आणि सहकारी कर्मचारी जेवढे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतील तेवढे आपल्या कामाला न्याय देतील व त्याचा फायदा निश्चितपणे संस्थेला होईल. म्हणून कारखान्याच्या कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, योगासने, व्यायाम व करमणुकीची साधनेदेखील उपलब्ध करून दिली आहेत.

त्याचबरोबर कोणताही कामगार कर्मचारी व अधिकारी तणावग्रस्त राहणार नाही, याची दक्षता घेत आहोत. सर्वांची आरोग्य तपासणी नित्य नियमाने केली जाते. त्यामुळे पुढे येणार्या शारीरिक व मानसिक व्याधींपासून ते मुक्त राहू शकतात. साखर कारखान्यामध्ये करिअरला हवा तेवढा वाव मिळत नाही, म्हणून नवीन पिढी साखर कारखानदारीमध्ये यायला तयार नाही.

त्यांच्याही आम्ही गंभीरपणे विचार करतो. चांगले काम करणार्या व क्षमता निर्माण करणार्यांना पदोन्नती देण्यासाठी प्रयत्न केले जातात. कामगारांचे पगार कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेतच अदा केले जातात. कारखान्याच्या कामगारांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन व नवीन नोकरभरती करण्यापेक्षा, आहे त्या कामगारांच्या क्षमतेचा विचार करून, त्यांना वरच्या पदांवर काम करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. अशा प्रकारे अकुशलतेकडून कुशलतेकडे समाधानकारक वाटचाल सुरू आहे.

कारखान्याशी सबंधित प्रत्येकाला मदत करण्याचे सामर्थ्य मला या पदामुळे मिळाले आहे, हे माझे भाग्य आहे, असे समजून मी सेवा करतो. मी कार्यकारी संचालक स्वतःसाठी झालेला नसून, या सर्व घटकांना योग्य न्याय व योग्य मदत करण्यासाठी झालेलो आहे. मा. चेअरमन व संचालक मंडळाने माझ्यावर प्रचंड मोठा विश्वास ठेवून मला सर्व अधिकार दिलेले आहेत.

याचा वापर मी प्रामाणिकपणे करतो. कुठेही शंकेला वाव मिळणार नाही, याची दक्षता घेतो. बर्‍याचदा कामाच्या व्यापामुळे, आपण आपल्या सहकार्यांवर विनाकारण चिडतो किंवा वेळप्रसंगी त्यांना शिक्षाही करतो. त्यावेळी जर संबंधितांची चूक नसेल आणि चुकून अन्याय झाला असेल, तर मोठ्या मनाने आपल्या पदाचा विचार न करता लहान माणसाची सुद्धा क्षमा मागण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे. तरच आपण या सर्वांच्या विश्वासाला पात्र होऊ.

माझ्या कामाचा व्याप हे माझ्यावरील दडपण नाही, तर ते एक माझे भक्तीचे साधन आहे आणि त्यात मला आनंद मिळतो आणि या सगळ्या कामातून मी गरजू लोकांना मदत करू शकतो. माझे काम मी निष्ठेने करत असल्यामुळे त्याचा फायदा कारखान्यावर अवलंबून असलेल्या लाखभर लोकांना मिळतो. हे मोठे पुण्याचे काम मी करत आहे. याचा अभिमान व समाधान इतर कुठेही मिळणार नाही, म्हणून माझे काम उत्स्फूर्तपणे व उत्साहीपणे करत आहे. आपण केलेल्या कामामुळे व प्रयत्नांमुळे कारखान्याचा फायदा होताना पाहून आपले उर आनंदाने भरून येते. यासारखे समाधान दुसरे कोणतेच नसते.

कार्यकारी संचालकाला यशस्वी व्हायचे असेल, तर त्याने देणारे व्हावे; घेणारे होऊ नये. जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न केल्यामुळे इतरांच्या चेहर्यावर हसू फुलले, तर तुम्ही कृतज्ञ झाला; परंतु आपल्या अकार्यक्षमतेमुळे जर कारखान्याचे नुकसान झाले, व्यवस्थित नियोजन झाले नाही, कारखाना अडचणीत आला, तर सर्वजण अडचणीत येतील आणि यासारखे दुसरे पाप कुठलेही नाही. त्यासाठी आपले सकारात्मक विचार आपल्याला तारून नेतील. फक्त आपला हेतू शुद्ध असायला हवा. त्यात स्वार्थीपणा दडलेला नसावा. असे केल्यास आपण निश्चितपणे यशस्वी होऊ, यात तीळमात्र शंका नाही.

कार्यकारी संचालक म्हणून काम करताना मी यापूर्वी झालेल्या आदर्श कार्यकारी संचालकांच्या कार्यकाळांचा अभ्यास केला. त्यांनी ज्या पद्धतीने आपली कारकीर्द यशस्वी केली, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही प्रयत्न केले; परंतु आता काळ बदललाय. म्हणूनच माझ्या कार्यशैलीत बदलत्या काळानुसार आवश्यक ते बदल केले आहेत.

मी आता कार्यकारी संचालक झालोय, आता मला सर्व समजते.. माझे सर्व निर्णय योग्य असतात आता मला कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही मी स्वयंपूर्ण झालोय आणि मी योग्य तेच करतोय अशा अभिनिवेशात जर आपणा वागलो, तर हवेने दिवा विझतो तसे आपले होईल. म्हणून मी नेहमी शिकत राहतो. नवीन गोष्टी आत्मसात करतो. मॅनेजमेंटचे धडे घेत राहतो.

सध्याच्या काळामध्ये खूप नवीन गोष्टी व नवीन तंत्रज्ञान वेगाने येत आहे. त्या वेगाने मी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. कारण कोणताच माणूस कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याला अखेरपर्यंत ज्ञानाची व शिक्षणाची गरज असते. म्हणून मी स्वतःतील विद्यार्थी कधीच बाजूला केला नाही. ज्ञानाची आस कायम ठेवली. आईस्क्रीम आणि मेणबत्ती या दोन्ही वितळणार्‍या गोष्टी आहेत. आईस्क्रीम लवकर खाल्ले नाही, तर ते वितळून जाईल; पण आईस्क्रीम खाताना ती फक्त एकट्याला समाधान देईल, मग आपण आस्क्रीमसारखे न होता मेणबत्तीसारखे व्हावे.

तीही वितळणार आहे; परंतु वितळण्याआधी ती इतरांना प्रकाश देत राहते. ही संधी आपणाला चालून आलेली आहे. म्हणून आपण दिवा होऊन जगा इतरांच्या जीवनात प्रकाश येईल व त्यांचा अंधार दूर होईल ही क्षमता आपल्यात नेहमी ठेवा.

कारखान्याच्या वाटचालीमध्ये कार्यकारी संचालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे म्हणून कार्यकारी संचालक झाल्यानंतर त्या पदाची प्रतिष्ठा आणि शान जपण्याची जबाबदारी मी कधीही विसरणार नाही. कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना. मी एक ‘टीम लिडर’ आहे आणि मला जिंकायचे नाही, तर माझ्या टीमला जिंकायचे आहे. अशा पद्धतीने टीमवर्क करतो. कारखान्याच्या प्रत्येक घटकाला वाटले पाहिजे की ‘एमडी साहेब’ आहेत.

आपण काळजी करण्याचे कारण नाही. त्यांच्या असल्याने आम्ही निश्चित आहोत. ते असतील तर माझ्या कोणत्याही संकटाच्या काळामध्ये माझ्यामागे ते खंबीरपणे उभे राहतील. हा विश्वास मी माझ्या सहकार्यांना देत आहे. त्यामुळे माझ्या सहकार्‍यांना माझी दहशत वाटत नसून. आदर वाटतो. तसेच आदरयुक्त भीतीसुद्धा वाटते. अन्यथा आपण शिस्त लावू शकणार नाही. प्रत्येक कामगाराला असे वाटले पाहिजे की मी चांगलं काम करतोय. मला भीती नाही. मी काम केले नाही किंवा चूक केली तर माझे काही खरे नाही.

कारखाना परिसरामध्ये औद्योगिक शांतता नांदते. माझ्या कृतीमध्ये व वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वशिलेपणा नसून मी सर्वांना समान न्याय देण्याची जबाबदारी पार पाडतो. कार्यकारी संचालक म्हणून काम करत असताना माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये, मी माझ्या सर्व सहकारी अधिकार्यांची किमान आठवड्यातून एकदा ‘कोऑर्डीनेशन मीटिंग’ घेतो.

त्यावेळी प्रत्येक खाते प्रमुखांकडून त्यांच्या सूचना घेतो. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो आणि त्याच्यामध्ये जर योग्य वाटले तर त्याची अंमलबजावणी करतो. काही दुरुस्ती असेल, तर त्या सहकारी अधिकार्याला विश्वासात घेऊन दुरुस्ती करतो. माझ्या बरोबर काम करताना त्याला कधीही असे वाटायला नको की, मी श्रेष्ठ आहे आणि तो कनिष्ठ आहे. त्याच्या मनामध्ये माझ्या मताला किंमत आहे.

त्याने सांगितलेल्या सूचना मी ऐकतो व त्याच्या सूचनांचा आदर करतो, ही भावना त्याने ठेवली तर प्रत्येक खातेप्रमुख आपणास सकारात्मक सूचना देतील आणि त्याचा फायदा पर्यायाने कारखान्याला होईल. पण त्याच्या सूचनांमध्ये असलेला हेतू व प्रामाणिकपणा आपणास ओळखता यायला हवा. त्यामध्ये स्वार्थ नसावा म्हणून मी कारखाना चालवत असताना मला प्रत्येक विभागाचे आवश्यक तेवढे ज्ञान आत्मसात करतो.

प्रत्येक विभागातील निर्णयांचे फायदे-तोटे आपणास समजायला हवेतच, अन्यथा आपल्या अज्ञानाचा फटका संस्थेला बसू शकतो. म्हणून मी अज्ञान लपून न ठेवता जिथे गरज पडेल तिथे इतरांचा सल्लाही घेतो. निर्णयामध्ये कोणती चूक होऊ नये म्हणून निर्णय घेताना शंभरवेळा विचार करतो; पण एकदा निर्णय घेतल्यावर त्यात बदल करत नाही, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो. अधिकार्यांबरोबरच सर्व विभागातील कामगारांच्या छोट्या-छोट्या टीम तयार केल्या आहेत. मी त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. काम करताना येत असलेल्या त्यांच्या अडचणी समजून घेतो व त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि कामांमध्ये सुधारणा कशी करता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांना विश्वासात घेऊन निर्णय केल्यास माझ्या निर्णयास ते शिरसावंद्य मानून अमलात आणतात. एखादा निर्णय कितीही चांगला असला, तरी त्याच्याशी संबंधित असलेल्या शेवटच्या माणसालासुद्धा विश्वासात घेऊनच तो निर्णय घेतल्यामुळे त्याची अंमलबजावणी सहजासहजी होते.
मी कारखाना कार्यस्थळावर वावरत असताना, माझ्याकडे हजारो नजरा लागलेल्या असतात. माझ्या प्रत्येक गोष्टीचे कोणी तरी निरीक्षण करत असते. म्हणून मी एक स्वतःचा ‘प्रोटोकॉल’ तयार केला आहे. त्याच्या बाहेर मी कधीही जात नाही. आपली प्रतिमा, आपला आत्मविश्वास आणि आपली देहबोली या सर्व बाबीही खूप महत्त्वाच्या आहेत.

मी ज्यावेळी ‘टीम लीडर’ म्हणून काम करतो. त्यावेळी आवश्यक ती नीतीमूल्ये जोपासण्याची जबाबदारी माझी स्वतःची असते. कार्यकारी संचालक पदाला प्रतिष्ठा देण्याचे काम माझ्या हातून घडल्यानेच मी सक्षमपणे काम करत आहे. माझ्या आदेशांचे पालन माझे सर्व सहकारी करतात. माझ्या हेतूबद्दल जर शंका निर्माण झाली, तर मात्र मला ‘टीम लीडर’ म्हणून काम करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणून मी नीतिमूल्ये कटाक्षाने जपत आहे.

(‘शुगरटुडे’च्या प्रिंट अंकातून),

प्रिंट आवृत्तीत इतरही वाचनीय मजकूर, वर्गणीदार होण्यासाठी खालील क्रमांकावर व्हॉट्‌सॲप संदेश पाठवा, किंवा आम्हाला इमेल लिहा.

8999776721/ sugartodayinfo@gmail.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

2 Comments

  1. Two officer from DR बाबासाहेब ambedkar sugar factory killed in accident is a very bad news..for sugar industry..May their soul rest in peace
    Regards
    Bhagavan karande

Leave a Reply to BhagavanCancel reply

Select Language »