फक्त 14 कारखाने सुरू, हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कालच्या आकडेवारीनुसार केवळ 14 कारखाने सुरू आहेत आणि १८६ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. आतापर्यंत एकूण 843.85 लाख टन उसाचे गाळप होऊन, 9.46 टक्के उताऱ्यासह 79.80 लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, गाळप संपलेल्या कारखान्यांमध्ये पुणे विभागातील 27, अहिल्यानगर विभागातील 24, छत्रपती संभाजीनगर विभागातील 21, नांदेड विभागातील 26 तसेच अमरावती विभागातील 3 कारखान्याचा समावेश आहे.
मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 1050.81 लाख टन उसाचे गाळप करून 107.33 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 10.21 टक्के इतका होता. एकूण 149 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.
कोल्हापूर विभागातील 40 कारखान्यांनी (14 खाजगी व 26 सहकारी) मिळून 202.42 लाख टन उसाचे गाळप करून 11.09 टक्के साखर उताऱ्यासह 22.44 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
पुणे विभागात 31 कारखाने कार्यरत होते. त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या विभागात 203.54 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 195.31 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.6 टक्के आहे. या विभागातील 27 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
सोलापुर विभागातील सर्व 45 साखर कारखान्यांनी (17 सहकारी आणि 28 खाजगी) मिळून एकूण 130.36 लाख टन उसाचे गाळप करून 8.11 टक्के उताऱ्यासह 10.57 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
अहिल्यानगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 113.47 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 100.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.89 टक्के आहे. या विभागातील 24 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 13 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 80.32 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 64.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 8.01 टक्के आहे. या विभागातील 21 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
नांदेड विभागात 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 98.65 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.66 टक्के साखर उताऱ्यासह 95.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 26 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 11.45 लाख टन उसाचे गाळप केले असून, 10.24 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.94 टक्के आहे. या विभागातील 3 साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.
नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 3.64 लाख टन उसाचे गाळप करून 1.84 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.05 टक्के इतका आहे.
कमी उत्पादन आणि गाळप क्षमता वाढल्याने कारखान्यांनी या हंगामाच्या सुरुवातीलाच कामकाज बंद केल्याचे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळणे आणि उत्पादनात घट यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी झाले आहे.