‘एआय’साठी प्राधान्य देणार : घाटगे

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते.
श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यावतीने ‘कृत्रिम बुद्धिमता आधारित ऊस उत्पादन तंत्र’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी राज्य साखर संघाच्या संचालिका व कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इच्छुकांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करावी
स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी संशोधन केंद्रातील अद्यावात तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याची निर्माण केलेली परंपरा त्यांच्या पश्चात अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाहू’ने कायम राखली आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून शाहू कारखाना परिसरातील ‘ऊस लागवड क्षेत्रात या एआय तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणार आहोत. इच्छुक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहनही यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे म्हणाले, ‘एकीकडे उसाचा उत्पादन खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ऊसशेती किफायतशीर न होता तोट्याची बनत चालली आहे. ऊस उत्पादनवाढीच्या अचूक नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्वमशागतीपासून तोडणीपर्यंतचे अचूक नियोजन उपग्रह प्रणालीद्वारे करता येते. त्याच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था व तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत.’
यावेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील, शिवानंद माळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.