‘एआय’च्या वापरातून ऊस उत्पादनात वाढ : कोल्हे

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी
कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकरी ऊस उत्पादनांत निश्चित वाढ होत असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, प्रगतशील शेतकरी कैलास माळी यांच्या शेतावर कृत्रिम बुध्दीमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे नुकतीच करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
बिपीन कोल्हे म्हणाले की, ऊस लागवडीखालील क्षेत्रफळात जगात भारत देश सर्वात मोठा आहे, मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेत आपण मागे आहोत. तामिळनाडूपेक्षा महाराष्ट्र राज्य उस उत्पादनांत पिछाडीवर आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे चित्र बदलण्यांस मदतच होणार आहे. शेतक-यांनी या प्रभावी तंत्रज्ञानाच्या वापरातुन प्रति एकरी ८० मे. टन उसाचे उत्पादन घ्यायचेच आहे असा चंग बांधावा.
प्रारंभी प्रगतशील शेतकरी अशोकराव भाकरे यांनी प्रास्तविक केले. कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व संचालक सहका-यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रति एकरी उसउत्पादनांत वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यांत आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कैलास माळी यांनी आभार मानले.