२५ किमी अंतराची अट रद्द करा : सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई _ दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द व्हावी, यासाठी अॅड. अजित काळे, अॅड. साक्षी काळे आणि अॅड. प्रतीक तलवार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांना पंधरा दिवसांत शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.
राज्य सरकारने २०११ मध्ये २ साखर कारखान्यांमधील किमान अंतर २५ किलोमीटर ठरवले. या तरतुदींमुळे ठरावीक राजकीय नेत्यांच्या हातात असणाऱ्या जुन्या साखर कारखान्यांची मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. नवीन साखर कारखाना सुरू करणे जवळजवळ अशक्य झाले आहे, असा दावा याचिकेत केला आहे.
या याचिकेसंदर्भात पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात साखर क्षेत्राची मोठी व्याप्ती असल्याने संपूर्ण राज्याचे या याचिकेकडे लक्ष लागले आहे.
तरतुदीचा दुरुपयोग करून व कुठलेही यथोचित कारण न देता राज्य शासनाने संपूर्ण राज्यात दोन कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर इतके केले आहे. हे केंद्र शासनाच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे, असे अॅड. अजित काळे यांचे म्हणणे आहे.