को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल

महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे.

गेल्या २५ वर्षांतील या उद्योगाची वाटचाल आणि ऊस शेतीकडील शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. या २५ वर्षांच्या कालावधीमध्ये ऊस पिकाच्या क्षेत्रामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ऊस लागवड क्षेत्रामध्ये आणि उत्पादन वाढीमध्ये महत्त्वाचे योगदान हे ऊस वाण निर्मितीचे आहे.
मागील २५ वर्षांपूर्वी लागवडीसाठी वापरण्यात येणारे उसाचे वाण पूर्णपणे बदलले आहेत. पूर्वी उशिरा पक्वता, कमी उत्पादकता व कमी साखर उतारा, तसेच रोग व किडींना बळी पडणाऱ्या वाणांमध्ये सुधारणा करून नवीन अधिक ऊस व साखर उत्पादन देणारे वाण ऊस पैदासकारांनी निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. परिणामी उसाची उपलब्धता आणि उत्पादकता वाढल्यामुळे साखर कारखान्यांची संख्या आणि त्यांची गाळप क्षमताही वाढली आहे.
सन १९९६ मध्ये म्हणजेच बरोबर २५ वर्षांपूर्वी ऊस शेतकऱ्यांसाठी कोइम्बतूर आणि पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रानी को ८६०३२ या सर्वगुण संपन्न ऊस वाणाची शेतकऱ्यांसाठी उपलब्धता करून दिली. गेल्या २५ वर्षांमध्ये या वाणाने ऊस शेती आणि साखर उद्योगासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
महाराष्ट्रात आज सुमारे ५० ते ६० टक्के ऊस क्षेत्र याच वाणाच्या लागवडीखाली आहे. सर्व हंगामागाच्या लावगडीसाठी योग्य, अधिक ऊस आणि साखर उत्पादन क्षमता, बहुसंख्य रोग व किडींना प्रतिकारक आणि उत्तम खोडवा पीक वाढ क्षमता असल्यामुळे हे वाण ऊस शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या पसंतीला पडले आहे. या वाणामध्ये आणखी सुधारणा करून अनेक चांगले वाण तयार करण्याचे काम २५ वर्षांत झाले आहे.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे २००७ मध्ये क्षारपड जमीन लागवड क्षेत्रासाठी आणि अधिक ऊस व साखर उत्पादन क्षमता असणारे उसाचे वाण फुले ०२६५ लागवडीसाठी शिफारस करण्यात आले. हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहे. त्याचे महाराष्ट्रातील लागवडीखालचे क्षेत्र सुमारे ३५ ते ४० टक़्के आहे.
उशिरा पक्व होत असल्यामुळे आणि किंचित साखर उतारा कमी असल्याने साखर कारखानदार या वाणाच्या तोडीस कमी प्राधान्य देतात म्हणून या वाणामध्ये बदल करून लवकर पक्व होणारे आणि अधिक साखर उतारा देणारे वाण निर्मितीचा उपक्रम पाडेगाव येथील संशोधन केंद्राने सुरू केला आहे. सन १९९६ ते २०२२ या २५ वर्षांमध्ये संशोधन केंद्राने तयार केलेले ऊस वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि साखर उद्योगासाठी भरीव लाभ देणारे ठरणार आहे.
पूर्वी महाराष्ट्रासाठी संशोधक कोइम्बतूर येथून निर्माण झालेल्या वाणाची शिफारस करत असत. किंवा तेथे जाऊन वाण निर्माण करून त्याची महाराष्ट्रासाठी शिफारस करत होते. परंतु आता आपण आपल्या पाडेगाव येथे तसेच व्हीएसआय, पुणे ही संस्था कोल्हापूर जवळील आंबोली येथे आपल्यासाठी आणि भारतासाठी वाण संशोधानाचे काम करत आहेत.
या चांगल्या वाणांच्या संग्रहामधून संकर करून अनेक नवनवीन वाण निर्माण केले आहेत. यामध्ये मध्यम पक्वता, लवकर पवक्ता, वेगवेगळ्या हंगामासाठी, जमिनीच्या प्रतवारीनुसार लागवडीसाठी योग्य, (वेगवेगळ्या उपयोगासाठी जसे, साखर, गूळ, रसवंती) असे वाण निर्माण केले आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानारांना लागवडीसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत.
नं. | उसाचे वाण | संकर | प्रसारित वर्ष | लागवड हंगाम | वाणाची वैशिष्ट्ये |
१ | को ८६०३२ निरा | को ६२१९८ x को.सी. ६७१ | १९९६ | आडसाली, पूर्वहंगाम, सुरू | अधिक ऊस व साखर उत्पादन, सर्व हंगामासाठी योग्य, उत्तम खोडवा व बहुसंख्य रोग आणि किडीस प्रतिकारक |
२ | फुले ०२६५, कोएम ०२६५ | को ८७०४४ जी.सी. | २००७ | आडसाली, पूर्वहंगाम, सुरू | अधिक ऊस व साखर उत्पादन, क्षारपड जमिनीसाठी योग्य, उत्तम खोडवा |
३ | फुले १०००१, एमएस १३०८२ | कोएम ०२६५ X एमएस ६०२ | २०१७ | पूर्वहंगाम, सुरू | लवकर पक्वता, अधिक ऊस आणि साखर उत्पादन, क्षार सहनशील, उत्तम खोडवा |
४ | फुले ९०५७ (कोएम १२०८५) | को ९४०१२ पीसी | २०१९ | पूर्वहंगाम, सुरू | अधिक साखर उतारा, गूळ आणि साखरेसाठी योग्य |
५ | कोएम ११०८२ पीडीएन (११०८२) | को ८६००२ जी.सी. | २०२० | पूर्वहंगाम, सुरू | अधिक उतारा आणि लवकर पक्वता |
६ | फुले १३००७ एमएस (१४०८२) | कोएम ०२६५ X कोएम ०२५४ | २०२१ | पूर्वहंगाम, सुरू | लवकर पक्वता, अधिक उत्पादन व साखर उतारा |
७ | फुले १५०१२ पीडीएन १५०१२ | कोएम ०२६५ X को ९४००8 | २०२२ | आडसाली, पूर्वहंगाम, सुरू | सर्व हंगाम लागवडीसाठी योग्य, अधिक आणि साखर उत्पादन, रसवंतीसाठी उत्तम |
सन १९९६ पासून मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने एकूण ७ जाती विकसित करून लागवडीसाठी शिफारस केली आहे. या ऊस वाणांमुळे ऊस शेतकरी आणि साखर कारखानादारांना पर्याय मिळाले आहेत. या ऊस वाण निर्मितीमध्ये २५ वर्षांत काम करणारे ऊस पैदासकार, ऊस विशेषतज्ज्ञ आणि या ठिकाणी काम करणारे वेगवेगळ्या विषयांचे शास्त्रज्ञ यांचे मोठे योगदान आहे.
त्यात या लेखाचे लेखक डॉ. सुरेशराव पवार यांचाही समावेश आहे. त्यांनी तब्बल १७ वर्षे पाडेगाव येथे संशोधन केले आहे. त्यांचे नियोजन, कल्पकता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्यामुळे या ७ वाणांची निर्मिती होऊन महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि साखर कारखानदार डॉ. पवार यांचे आजही आदराने नाव घेतात.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव बरोबरच ऊस पीक आणि साखर उद्योगातील वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करणाऱ्या व्हीएसआय (वसंतदादादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी पुणे) या संस्थेनेही को ९८०५, व्हीएसआय ४३४, व्हीएसआय ३१०२, व्हीएसआय ८००५ आणि कोव्हीएसआय १८१२१ ही वाण संशोधित केल्यामुळे त्यांचाही उपयोग ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारीला झाला आहे.
मागील २५ वर्षांतील ऊस वाण निर्मिती आणि ऊस तंत्रज्ञान शिफारशी यामुळे ऊस पिकाची महाराष्ट्राची उत्पादकता वाढली आहे. पूर्वी हेक्टरी ७० ते ८० टनांपर्यंत मिळणारी राज्याची उत्पादकता, आता ९५ ते १०० टनांपर्यंत गेली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दोनशे कारखान्यांची गाळप वाढून महाराष्ट्र देशात नंबर १ वर पोहचला आहे. यामध्ये ऊस पिकवणारे शेतकरी आणि संशोधकांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. सुरेशराव पवार, नामवंत ऊस तज्ज्ञ
पुणे
(लेखक पाडेगाव संशोधन केंद्रातील निवृत्त ऊस संशोधक आहेत)
उसाला खूप पाणी लागते, आळशाचे पीक इ. ऊस पिकाबाबतचे गैरसमज दूर करणारा डॉ. सुरेशराव पवार यांचा लेख ‘शुगरटुडे’ मासिकाच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे, तो खालील लिंकवर आवर्जून वाचा (पान ६४)
[dflip id=”3288″][/dflip]
खूप खूप माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद पवार साहेब
Dhanyawad