एक लाख ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्रे प्रदान

प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण : डॉ. नारनवरे
पुणे : राज्यातील ऊसतोडणी कामगारास प्रत्येकी पाच लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यादृष्टीने गेल्या दीड वर्षापासून ऊसतोड कामगारांची नोंदणी सुरू असून, आतापर्यंत 3 लाख 50 हजार कामगारांची नोंदणी झाली, तर एक लाख कामगारांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
ऊसतोडणी मजुरांना विविध सुविधा व सवलती मिळाव्यात, यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाचे कामकाज समाजकल्याण विभागांतर्गत सुरू आहे.
राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर यांसह जिल्ह्यातील अनेक नागरिक ऊसतोडणी करण्यासाठी राज्यातील विविध साखर कारखान्यांवर जात असतात. मात्र, या कामगारांना कोणत्याही सुविधा आतापर्यंत नव्हत्या, त्या महामंडळाच्या माध्यमातून दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात सुमारे 10 लाखांच्या आसपास ऊसतोड कामगार असून, त्यांची नोंदणी ग्रामसेवकांमार्फत करण्याचे काम सुरू आहे.

संबंधित कामगारांकडून कोणतीही रक्कम अथवा फी घेण्यात आली नाही. याउलट राज्यात कार्यरत असलेल्या ऊस कारखान्यांकडून प्रति टनामागे दहा रुपये या महामंडळास अदा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्यातील बहुतांश कारखान्यांकडून या महामंडळास ठरवून देण्यात आलेली रक्कम साखर आयुक्तालय यांच्या माध्यमातून अदा करण्यात येत आहे.
ऊसतोड कामगारांना अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास पाच लाख रुपये कुटुंबास अदा करण्यात येणार आहेत. तसेच, अपघातात जायबंदी झाल्यास नियमानुसार उपचारांसाठी रक्कम देण्यात येणार आहे.
या कामगारांना पाच लाखांचे विमासंरक्षण, मुलांसाठी स्थानिक शाळेत शिक्षण तसेच ज्या भागात काम करतात त्याच ठिकाणी स्थानिक रेशनिंग दुकानांमधून रेशन देण्याची सुविधा दिली आहे, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
ऊसतोड कामगार कार्ड