तर तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल : गायकवाड

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: भविष्यामध्ये राज्यातील शेतीला सोन्याचे दिवस येतील, त्यासाठी शेतीची व्याख्या बदलणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्यास शेतीपासून दुरावत जाणारी तरुण पिढी निश्चितपणे शेतीकडे वळेल, असा विश्वास ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी येथे व्यक्त केला.

‘अॅग्रोवन’च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शाश्वत शेती परिषदे’च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. गायकवाड यांनी खुमासदार शैलीत ग्रामीण भागातील विविध प्रथांविषयी भाष्य केले.

ते म्हणाले, “अलीकडच्या काळात शेतीपासून युवावर्ग दुरावत आहे. त्यामुळे स्वतःची घरची शेती किती आहे. त्यातील समस्या काय आहेत, याकडे तो गांभीर्याने पाहत नाही. तो अन्य क्षेत्रांत असल्याने त्याला घरातील वडिलधाऱ्यांकडून शेतीबद्दलची पूर्ण माहिती दिली जात नाही, यामुळे पुढच्या पिढीला शेती सांभाळणे दिव्य ठरते. हे टाळण्यासाठी नवी पिढी कोणत्याही क्षेत्रात असली तरी शेतीचे बांध, त्यातील समस्यांच्या माहितीबाबत पुढील पिढीशी संवाद साधणेच गरजेचे आहे, असे झाले तरच पुढे शेतीचा सांभाळ होऊ शकतो. अन्यथा, वाईट प्रवृत्तींकडून शेती बळकावण्याचा धोका आहे,” असेही ते म्हणाले.

शेतीला कॉर्पोरेट लूक दिल्यास शेतीला सहजपणे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. माझ्या अभ्यासानुसार जळगावपासून कोल्हापूरपर्यंतचा पश्चिम महाराष्ट्राचा सगळा पट्टा आणि उत्तर महाराष्ट्र आज जवळ जवळ युरोप सारखा तयार होईल. मराठवाडा विदर्भामध्ये शेती सुधारणा मोठ्या प्रमाणात होईल. मोठ्या प्रमाणात शेती व सिंचनाचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने आधुनिक शेती या भागात सहजपणे होऊ शकते. रस्त्यांचे, विमानतळाचे जाळे तयार होण्याची शक्यता असल्याने दळणवळणाच्या सोयीही तयार होतील, असे सांगताना ‘यशदा’च्या वतीने देशात एकाच पद्धतीचा सात-बारा आणण्याचा प्रकल्प सुरू आहे, अशी महितीही त्यांनी दिली.

श्री. गायकवाड म्हणाले, “अलीकडे मनुष्यबळाअभावी शेती करणे अडचणीचे ठरत आहे. शेतीला माणसे हवी असतील, तर शेतीला उद्योगाचे स्वरूप देऊन शेतीचा प्रसार करणे गरजेचे आहे.

आदिनाथ चव्हाण यांनी आभार मानले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »